आवरा सावर



   
#आवरा_सावर
©️ अंजली मीनानाथ धस्के

      बाळराजेंनी खोली आवरायला घेतली. पण एकट्याने होईल इतकं सोपं हे काम नाही याचा अंदाज आल्याने त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. खरं तर आवरा आवरी करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण आता मदती केली नसती तर नीटनेटके पणाच्या संस्काराला कायमच मुकावं लागलं असतं. नाईलाजाने का होईना मीही कामाला लागले. बघता बघता त्या खोलीतल्या पसाऱ्याचा एक भाग झाले.
सगळ्या पसाऱ्यात काय चांगलं, काय खराब हा भेद मला कळेनासा झाला. बाळराजेंनी आवरून ठेवलेल्या कप्प्यात मी पसाऱ्यात सापडलेल्या अनेक वस्तू भविष्यात कामाला येतील असे वाटून त्या    एक एक करून पुन्हा ठेवू लागले.
तसा बाळराजेंचा पारा चढला. " तू मदत करायला आली आहेस की पसारा आहे तसाच उचलून ठेवायला आली आहेस ?"
मी  तत्परतेने उत्तर दिलं," अरे मदतच करतेय .... तू अनेक वस्तू कामाच्या नाहीत म्हणून बाहेर ठेवायच्या पसाऱ्यात टाकल्या आहेत. त्या फक्त उचलून जागच्या जागी ठेवते आहे".
बाळराजे गरजले," त्यापैकी एकही वस्तू माझ्या कामाची नाही . मी भविष्यातही त्यांचा वापर करण्याची शक्यता नाही. तुला येवढ्याच त्या आवडल्या असतील तर तुझ्या कपाटात नेवून ठेव."
मी घाबरून ," नाही... अजिबात नाही माझ्या कपाटात सुई ठेवायला जागा नाही ".
बाळराजे ," अग त्या वस्तू दिसायला चांगल्या दिसतात पण प्रत्यक्षात मी एकही कधीच वापरत नाही.  ही काही खेळणी ही मी आता खेळणार नाही . जो कोणी या वस्तूंचा वापर करणार असेल त्याला देवून टाक ."
पटापट सगळं जास्तीच सामान त्याने एका पिशवीत भरले आणि ती पिशवी माझ्या हातात दिली.
मी उदास नजरेने त्याच्या आवरलेल्या आणि रिकामं रिकामं वाटणाऱ्या कप्प्याकडे बघत बोलले," तुला नक्की नकोय यातलं काही .... किती रिकामा दिसतोय कप्पा "
त्यावर बाळराजे समजावणीच्या सुरात बोलले," जुन्या  वस्तू ठेवून उगाच भरून ठेवायचा आहे का हा कप्पा ? ....अग रिकामा केला तरच नवीन गोष्टींसाठी जागा होईल न ..... तू जा बरं... आधी ही पिशवी ठेवून ये बाहेर नाहीतर पुन्हा त्या वस्तूंनी सगळी जागा व्यापून टाकशील"
     मी जमा केलेला सगळा पसारा बाहेर ठेवून आले. हे करतांना डोक्यात त्या वस्तुबद्दलच्या अनेक आठवणी आठवून लागले. उगाच वाटू लागलं की *आपल्या मनाचनही असंच आहे. अनेक गोष्टींची गरज असो नसो आपण त्या साठवून ठेवतो. इतक्या साठवून ठेवतो की  त्याचा ताण यायला लागतो. मानाचा कप्पाही असाच आवरून ठेवायला हवा. चांगल्या आठवणी, अनुभव ठेवायचे . बाकी  सगळे बाहेर  काढून टाकायचे. केलेल्या चुकांबद्दल  अपराधी भावना जपत बसण्यापेक्षा त्या चुका टाळण्यासाठीचे प्रयत्न करायला हवे. मनात राग ठेवण्यापेक्षा आनंद ठेवता यायला हवा. मन मोठं करून अनेक गोष्टी सोडून द्यायला हव्या*
            विचारांच्या तंद्रीत बाळराजेंच्या खोलीत पोहचले. खोलीत नेहमीचाच प्रकाश पण आज खोली एकदम उजळून निघाल्यासारखी भासत होती. या हवा पण आज जणु ती खोलीत मुक्तपणे  बागडत होती.

खोलीतली जागाही तेवढीच पण आज खोली मोठी झाल्यासारखी भासत होती.

      कळत  नकळत आज एक गोष्ट मी ही शिकले होते,"  मनात भावनांची अडगळ करण्यापेक्षा काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि नवीन चांगल्या अनुभवासाठी मन कायम तयार ठेवायचं"

   खोली आवरल्या गेली याचा आनंद बाळराजेंच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

     बाळराजेंची खोली तर आवरून झाली होती. ते निवांत पंख्याची हवा खात बसले. मी मात्र  कामाला लागले होते. मनातील अनेक कप्पे एक एक करून रिकामे करायचे होते.

©️ अंजली मीनानाथ धस्के



टिपः

      मला  मन शांत करायचे असले की डोळ्यांना शीतल वाटणाऱ्या.... मनाला आणि हाताला गुंतवून ठेवणाऱ्या  गोष्टी मी करत असते.

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या चेहऱ्याकडे बघितले की  त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान , शांती हळूहळू आपल्या मनात झिरपत जाते आहे  असा  भास मला होतो . बुद्ध पौर्णिमेनिमित्त  त्यांची ही छबी रांगोळीत रेखाटण्याचा मोह मला अनावर झाला.

रांगोळी काढून आणि तयार झालेले त्यांचे  हे रूप पाहून माझं मन तर शांत झालं ..... रांगोळी बघून तुम्हालाही असाच अनुभव होतोय का?

©️ अंजली मीनानाथ धस्के

 लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी  कायद्याने गुन्हा आहे.




No comments:

Post a Comment