बदलाची सुरुवात स्वतःपासूनच : शिव जयंती (२०२०)

#बदलाची_सुरुवात_स्वतःपासूनच

               शिवाजी महाराजांचा जन्म १९/२/१६३० ला झाला असला तरी त्यांच्या विचारांची गरज आजही आहेच. ते जीजाऊंसाठी शिवबा, बाळ संभाजींसाठी आबा साहेब, प्रजेसाठी जाणता राजा, मोघलांसाठी शिवा तर इतिहास कारांसाठी युग पुरुष आहेत.

              अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना..... फक्त जयजयकार.....,  फक्त मिरवणुका..... पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. त्यांच्या  ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.

      पण दुर्दैव *' शिवाजी जन्मावा ते शेजारच्या घरी '* असं आपण म्हणतो. शिव राज्यातले फायदे हवेत पण त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या यातना नकोत.  समाजात चांगले बदल व्हायला हवेत अशी आपण चर्चा करतो पण त्या बदलांची सुरवात आपल्या पासूनच करावी असा निश्चय करण्यात कमी पडतो.
आजची स्त्री सुशिक्षित झाली आहे पण सुरक्षित नाही . कारण  पर स्त्रीमधे माता, भगिनी बघणारे शिव संस्कार हरवले आहेत. आई, बहिणीवरच्या शिव्या देण्यात आपण धन्यता मानतो.
          आजही वंशाला दिवा हवाच असा आग्रह अनेक घरी असतो पण त्याच क्षणी त्या वंशाच्या दिव्याला वाढवतांना घरातील आईने जिजामाता सारखे संस्कार त्यावर करण्याचा आग्रह मात्र कोणीच धरत नाही.
       
 "भगवा " आपला तर मानतो पण महाराजांना अपेक्षित असलेले राज्य निर्माण करता येत नाही. सगळ्या जाती धर्मांना एकत्र आणून शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा आपण जातीच, रंगाचं ही राजकारण करतो.
     आज गल्ली बोळात शिव जयंती निमित्त कार्यक्रम होतात. पण शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर पोवाडे सादर करण्याऐवेजी फावल्या वेळेत फिल्मी गाणी वाजवली जातात तेव्हा काळीज तुटतं.
बाईकवर.... कारवर शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे घेवून ... कपाळावर चंद्र कोर काढून .... नवीन कोरे भगवे कपडे घालून फिरतांना काही तरुण विसाव्यासाठी म्हणून  पान पट्टीवर थांबून घुटका खातात .... तोंडातला घुटका रस्त्यावर इथे तिथे थुंकतात तेव्हा काळीज तुटतं.
त्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या काही मुली केवळ जिजामाता सारखी वेशभूषा करण्यात समाधान मानतात तेव्हा काळीज तुटतं.


  मी इतिहासाची अभ्यासक नाही.....तरी मला वाटतं भगवा म्हणजे एकी....... भगवा म्हणजे सुखी प्रजा.... भगवा म्हणजे स्त्रियांचा आदर..... भगवा म्हणजे सगळे समान......भगवा म्हणजे विरक्ती...... भगवा म्हणजे रयतेचे हित आधी मग राजाचे...... भगवा म्हणजे राज्य विकासाचा ध्यास..... भगवा म्हणजे अन्यायाची चीड.....

            आज आपण फक्त रंगात गुरफटलो आहे. महाराजांचे विचार मात्र विसरत चाललो आहे.
 शिव मूर्ती पूजेचं स्तोम करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याची ..... भावी पिढीवर तसे संस्कार करण्याची नितांत गरज आहे. 
जिजामाता होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. आपण त्यांच्या सारखी फक्त वेशभूषा करू शकतो. विचारांनी त्यांची बरोबरी करणे केवळ अशक्य .....
मात्र महाराजांचे विचार आत्मसाद केले तर त्यांना अपेक्षित असलेले निष्ठावान मावळे आपण नक्कीच बनू शकतो.

आज शिव जयंती निमित्त महाराजांच्या विचारांची आठवण ठेवून....... त्यांच्या विचारांना अंगिकारून वर्तन करत खऱ्या अर्थाने  मना मनात शिव ज्योत लावू या.......
 ही रांगोळी शिव चरणी अर्पण.......
जय भवानी... जय शिवाजी....

 ©️ अंजली मीनानाथ धस्के
(लिखाण आवडल्यास नावा सहितच शेयर करावे)

जगण्याची मिळालेली एक संधी

 
   
      #१००शब्दांचीकथा 

#जगण्याची_मिळालेली_एक_संधी

       मित्रांसोबत बाईक रेसिंगचा प्लॅन ठरवलेला. घरी कल्पना न देता फक्त  'आई येतो गं' म्हणत घराबाहेर पडला.
           ती हाक ऐकून बाहेर येणाऱ्या आईचे लक्ष समोर पाडलेल्या हेल्मेटकडे गेलं. त्वरेने तिने ते त्याच्या हातात दिलं.
            वेगात गाडी चालवतांना मोठा अपघात झाला. मित्रांनी दवाखान्यात दाखल केले.
           दहा दिवस कोमात गेलेला तो शुद्धीत आला. केवळ हेल्मेट होत म्हणून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
   महिनाभर रोज त्याच्या काळजीने काळवंडलेल्या आईवडिलांना बघून त्याने आज एक निश्चय केला.
              २९ फेब्रुवारी या वर्षातला एक जास्तीचा दिवस. मलाही देवाने जगण्याची एक जास्तीची संधी दिली. इथून पुढे मी स्वतः वेगावर नियंत्रण ठेवणारच पण इतरांनाही सुरक्षिततेची काळजी घ्यायला प्रेरित करणार.
©️ अंजली मीनानाथ धस्के
कथा आवडल्यास नावा सहित शेयर करावी.

मुरलेल्या नात्याचा व्हॅलेंटाईन डे

#मुरलेल्या_नात्याचा_व्हॅलेंटाईन_डे



        काय गंमत आहे ना .....
निसर्गात झाडांची पानगळती सुरू होते आणि मना मनात मात्र प्रेमाचा वसंत फुलतो.
लग्नाआधी 'दिलं तो पागल है' मधल्या माधुरी सारखं रात्री १२ वाजेपर्यंत जागून व्हॅलेंटाईन  मिळेल या आशेने जागण्याचा प्रयत्न केला होता पण नाही जमल तेव्हा स्वतःच सांत्वन करून घेतल की ," आपलेही दिवस येतील ..... जेव्हा चॉकलेट डे, टेडी बिअर डे , रोझ डे , प्रपोज डे .... विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डे  आपण दणक्यात साजरा करू "
           लग्न ठरलं आणि माझे दिवस आले ......
चॉकलेट , टेडी .... गुलाब सगळं कसं न मागता मिळालं . रोज येणार पार्सल आणि त्यातल्या भेट वस्तू बघून सगळ्यांनी खूप चिडवलं . पहिल्यांदाच सगळे आपल्याला चिडवतं आहे आणि आपल्याला मनात गुदगुल्या होतात आहे ..... अगदी डेरी मिल्कच्या जाहिराती सारख्या " मन में लड्डू फूटा" असं वाटलं.
           लग्न झालं .... डोक्यावर अक्षदा सोबत संसाराच्या जबाबदाऱ्या ही पडल्या. रोजच छोट्या मोठ्या गोष्टीतून प्रेम व्यक्त होवु लागलं . खास एका दिवसासाठी काही राखून ठेवणं  जड जावू लागलं.
त्याने कधी चॉकलेट आणलं तर ," येवढं मोठ चॉकलेट 😲😲😲😲 हे खावून माझं वजन किती वाढेल "अशी ओरड मी करण्याआधीच मुलाने  ते माझ्या हातून हिसकावलेल असे.
टेडी आणला तर ," घरात माणसापेक्षा टेडी च जास्त झालेत. "
गुलाब आणला तर ," दोन दिवसात सुकून जातात रे ..... नंतर बघवत नाही त्यांच्याकडे , फेकण्याची इच्छाही होत नाही "
ग्रीटिंग कार्ड, शो पीस म्हणजे निव्वळ पैशाचा अपव्यय.
अशी तक्रार माझ्याकडून केली जावू लागली.
त्याने आवडीने ड्रेस किंवा साडी आणावी. त्या कापडाचा रंग, पॅटर्न पाहून .... लपवू म्हटलं तरी कपाळावरची आढी लपवता येत नसे.
 
          तरीही मी पेपरमधे WhatsApp वर आलेल्या पोस्ट वाचून त्याला म्हणतेच, " लग्नाआधी कसा होतास तू मी नको नको म्हणत असतांनाही प्रेम व्यक्त करण्याची एक संधी सोडत नव्हता. आता मात्र तुझं प्रेमाचं नाही माझ्यावर ..... म्हणून सारखं बोलून दाखवतो ," रोजचं व्हेलेंटाईन डे मानणाऱ्यासाठी असं एका दिवसाचं प्रेम नसतं कधी ....
 प्रत्यक्षात मात्र नुसता छळतोस मला "
            हे ऐकल्यावर तोही बोलायला मागे राहत नाही....
काय?????  मी छळतो तुला...
तुझा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत जावा  म्हणून घर भर मुद्दाम माझं सामान पसरवून जातो. ते आवरताना तुला माझी आठवण रहावी हाच उद्देश . तू आवरल्यावर माझी एक वस्तू मला कधी वेळेवर मिळत नाही तरी मी कसलीच तक्रार करत नाही. ती सापडावी म्हणून प्रयत्न करतांना तुझ्यासाठी  पुन्हा घरभर वस्तू पसरवतो.
बाहेर गावी असलो की तिथे जावूनही जेवतांना न चुकता तुला फोन करतो.... तिथल्या चांगल्या चुंगल्या पदार्थाचं  वर्णन करतो जेणे करुन तू प्रेरणा घेवून नेहमी काही तरी नवीन करत रहावं हाच उद्देश.
तू सांगितलेली अनेक छोटी मोठी कामं विसरतो जेणे करुन माझ्यावर अवलंबून न राहता तू तुझं नियोजन अधिक चांगलं करावं.
तू कामात असताना मी पेपर वाचायला घेतो .... जेणे करुन तुझ्या कामात माझी लुडबुड नको म्हणून
येवढं च काय पण अनेकदा तुझा तोंडाचा पट्टा अखंड सुरू असतो तेव्हा ही एका शब्दाने  वाद न घालता मी मुकाट पेपर वाचत असतो.
तुझ्या 'सुख दुःखात' साथ देण्याच वचन दिलं आहे त्याप्रमाणे तुझ्या 'दुःखात सुख' मानून घेतोय ना.
  तरी मीच छळतो तुला .......😲😲😲
( कितीही राग आला तरी मीच माघार घेतो त्यांचं तर बोलायची ही सोय नाही .... असं पुटपुटत तो माझी समजूत काढायला सुरुवात करतो)

    राणी चिडू नकोस . चिडली की तू खूप गोड दिसते मग तोंड गोड करणारा ' चॉकलेट डे ' साजरा करावा 😉 वाटतो..... अजून तर सात जन्म सोबत काढायची आहेत. माझं हे चीडकं चॉकलेट ही मला सात जन्म पुरवायच आहे . सगळं आताच चिडून घेशील तर पुढच्या जन्मी काय करशील?

अशी तो माझी समजूत काढण्यात यशस्वी होतो ..... प्रेमाचा पुरावा म्हणून काही भेट वस्तू मिळेल या आशेने मी सुरू केलेला लाडिक वाद ..... तो मला कसा छळतो हे स्वतः कबूल करूनही तोच किती सोशिक आहे हे मला नव्याने पडवून देवून मिटवतोही.

माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून दर वर्षी मात्र तो न चुकता चॉकलेट्स आणि गुलाबाची फुलं आणतोच.
मी ही मग सगळे रुसवे फुगवे विसरुन माझ्या गुबगुबीत टेडी बिअरला मिठी मारते.
      आज तर " चॉकलेट्स आणि गुलाब आणलेस तर याद राख.... " अशी धमकीच दिली आहे. बघू माझी ही धमकी तो गांभीर्याने घेवून गिफ्टच्या बाबतीत काही नवीन प्रयोग करतो की हिच्या कडेही दुर्लक्ष करून नेहमीचा धोपट मार्ग अवलंबतो.    ©️ अंजली मीनानाथ धस्के
व्हॅलेंटाईन डे

तू मिठी मारता
धडधडते काळीज....
तुझ्या संगतीत
फक्त आनंदी क्षणांची बेरीज...

शरीराची भूक नाही
 प्रेमाची कबुली आहे...
 हे फक्त ' चुंबन ' नाही
  आनंदी आयुष्याची सुरवात आहे...

  दिखावू प्रेम नको 
 आंतर मनाची साद दे... 
एका दिवसाचा खेळ नको
 रोजचं असावा व्हेलेंटाईन डे...


©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः कृपया कोणी कमेंट मधे " मिळालं का काही विशेष गिफ्ट " अशी चौकशी करू नये. उगाच समजुतीने मिटणारा वाद तुमच्या अशा प्रश्नाने विकोपाला जावू शकतो 😝😝😝😝 वाद विकोपाला गेल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल व आवडीचे गिफ्ट तुम्हाला शिक्षा म्हणून तुमच्याकडूनच घेण्यात येईल.😉😂😂😂




गृहिणीही असते स्वयं सिद्धा

#गृहिणीही_असते_स्वयं_सिद्धा

          निशा तशी चुणचुणीत मुलगी. अभ्यासातही तिची प्रगती तशी बरीच होती. सतत आईच्या मागे मागे राहून ती जे काम करत असेल ते शिकण्याचा हिचा खटाटोप सुरू असायचा.
             आई कुठे बाहेर गेली की घर आवरून ठेवायचं. आई आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. आईने कौतुक केले की हरखून जायचं . यातच ती रमायची.
         घरात  अभ्यासाचं वातावरण होत. वडिलांची कडक शिस्त होती. घर कामाला बाई होती पण ही सतत घर झाडणे, फारशी पुसणे , अंगणात सडा टाकणे, रांगोळी काढणे , भांडे लावणे , ओटा आवरणे , स्वतःचा  गणवेश स्वतः धुणे या कामात रमायची.
       परीक्षा आली की अभ्यासापेक्षा सुट्या लागल्यावर भरतकाम, विणकाम किंवा शिवणकाम शिकण्याचे वेध तिला लागतं. इतर भावंड अभ्यासात मग्न असतांना ही मात्र आई आज काय नवीन पदार्थ बनवणार आहे हे शिकत असायची. आई तिला परोपरीने सांगायची ही सगळी कामं सहा महिन्यांत येतील तुला पण आता अभ्यास महत्त्वाचा . तिच्या या सवयीने ओळखितले लोकही तिला चिडवायचे ," अभ्यासात लक्ष नाही पोरीच . पुढे चालून मुलांना नोकरी करणारीच बायको हवी असणार . नोकरी करणारी बायको मिळाली की घरकामाला काय आणि स्वयंपाकाला काय.... बाई ठेवता येते. हिच्याशी कोण लग्न करेल ?"
    मुलींनी शिकून चांगली नोकरी मिळवली तरच चांगला नवरा मिळतो , लग्न लवकर जुळतं  अशी समाजाची मानसिकता झाली होती.
       मुली मात्र शिक्षण हे केवळ चांगली नोकरी मिळावी म्हणून घेत नव्हत्या तर आपण आत्मनिर्भर व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं  या उद्देशाने शिकत होत्या.

         पुढे पुढे ती मोठी झाली तसं तिला जाणवू लागलं की, "*घरात  कमावणाऱ्या स्त्रीचे मत निदान गृहीत धरले जाते .... न कमावणाऱ्या स्त्रीला तर फक्त गृहीतच धरले जाते*".
        तिला या सगळ्याची चीड यायची. संसार करण्यासाठी दोघांची मन जुळली पाहिजे. केवळ नोकरी बघून लग्न करणारा मुलगा त्या मुलीवर खरंच प्रेम करेल ? तिच्या पगारावर लक्ष ठेवून असणारा मुलगा तिच्या मनाचा विचार करेल? नोकरी करत घर सांभाळण्याची कसरत करतांना तो तिची बरोबरीने साथ देईल??
बायको नोकरी करणारी असावी अशी मागणी असली तरी तिने घर उत्तम पद्धतीने सांभाळावं अशीच मुलांची अपेक्षा असायची.
घर सांभाळणं बायकोचं आद्य कर्तव्य आहे तर नोकरी करून संसाराला हातभार लावणे ही तिचीच जबाबदारी आहे . असा समज तेव्हा समाजात रूढ होता.
       निशाने शिक्षण पूर्ण केलं .  तिला नोकरीही लगेच लागली. तरी लग्न ठरवतांना अडचणी येत होत्याच.
 लग्ना नंतर नोकरी करणार का? असा प्रश्न हिला विचारला  की ही लगेच उत्तर द्यायची ," घरच्यांनी सहकार्य केलं तरच नोकरी करणार अन्यथा घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत केवळ अशक्य . यापैकी एकच मी चांगल्या पद्धतीने करू शकेन "
असं उत्तर द्यायची. त्यामुळे साहजिकच तिला नकार दिला जायचा .
आपण नोकरी केलीच पाहिजे असा आग्रह धरणारा नवरा तिला नको होता. आपण काय करावं, काय करू नये याचं भान आपल्याला नक्कीच आहे मग ते करण्याचं स्वातंत्र्य ही मिळायला हवं. आपल्याला आपल्या पगारावर नाही तर आपल्यावर प्रेम करणारा जीवनसाथी हवाय.  नवऱ्यावर एकट्यावर संसाराचाआर्थिक भार नको म्हणून आपली  नोकरी नक्कीच महत्त्वाची पण ती करतांना त्यानेही संसारातल्या घरगुती कामांचा व्याप त्याच्या परीने वाटून घ्यायला हवा. हे करतांना कोणाचीही कोणाला सक्ती नकोच पण समजून उमजून संसार करायला हवा . असं तिचं मत होत.
         तिच्या काही मैत्रिणींची लग्न झालीत. गरज नसतांना फरफड होत असूनही आपण  खूप शिकलो म्हणजे नोकरी केलीच पाहिजे नाहीतर सगळं शिक्षण वाया जाईल अशा गैरसमजाला बळी पडून काही जणी नोकरी करत होत्या.  काही जणी सासू घरी त्रास देते म्हणून इच्छा नसतांनाही  नोकरी करत होत्या. काहींना घर कामाचा कंटाळा . या कामांपासून सुटका मिळावी म्हणून नोकरी करत होत्या. काहींना त्यांच्या  खर्चासाठी नवरा पैसे देत नाही म्हणून नोकरी करत होत्या. लग्नानंतर फार कमी मैत्रिणी अशा होत्या की त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती म्हणून त्या नोकरी करत होत्या आणि घर नोकरी यांचा बीनतक्रार मेळ बसवत होत्या. तिला अशा मैत्रिणीनं बद्दल नितांत आदर होता. नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत सोपी नसते हे ती जाणून होती.
     कालांतराने तिचही लग्न झालं. मुंबईतला नवरा मिळाल्याने घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत सुरू झाली पण नवरा तिला सर्व तोपरी सहाय्य करत होता.  कोणतंही काम मनापासून करण्याची तिची सवय असल्याने ती  घर  उत्तम प्रकारे सांभाळून नोकरी करत होती. आपल्या क्षेत्रात काहीतरी कामगिरी करून दाखवायची इच्छा असल्याने नोकरीच्या ठिकाणीही तिच्या चांगल्या कामामुळे तिला बढती मिळत होती.
        ती आई होणार आहे अशी जेव्हा तिला चाहूल लागली तेव्हा मात्र तिच्या होणाऱ्या बाळाला तिने प्राधान्य क्रमात अग्रभागी  ठेवलं. बाळाचा जन्म झाला. तिचं विश्व त्याच्या भोवतीच घुटमळू लागलं. कामावर जायला तिचा पाय उचलेना. कामावर गेलं तरी घरची ओढ तिला काम करू देईना . जिथे पगार घेवूनही आपण आपल्यातलं उत्तम देवू शकत नाही तिथे काम करण्याचा आपल्याला अधिकार नाही. या विचाराने तिची चीड चीड होवु लागली. या चिडचीडीमुळे बाळा सोबत घालवायचे आनंदी क्षणही बिघडू लागले तेव्हा तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
      तिच्या सासर आणि माहेरकडच्या कोणालाही तिचा हा निर्णय पटला नव्हता.
 नोकरी न सोडता काही दिवस सुट्टी घेऊन बाळाला पाळणाघराची सवय करावी याच मताचे सगळे होते. बाळ लहान आहे तोपर्यंतच पाळणा घराची सवय होते नंतर फार जड जातं. मग घरातून बाहेर पडणं कठीण होत. असे कळकळीचे सल्लेही तिला अनेकींनी दिले.
इवल्याशा बाळाला पाळणाघरात ठेवायला तिचं मन तयार नव्हतं. बाळाच्या जन्मानंतर खर्च वाढले हे जरी खरं असलं तरी त्याला सध्या आईचीच गरज जास्त आहे. तिने नोकरी केली नाही तर घरात येणारा पैसा कमी होईल, त्यांना त्यांच्या गरजा कमी कराव्या लागतील, नवऱ्याच्या पगारात सगळे खर्च बसवावे लागतील. याची तिला पूर्ण कल्पना होती. त्यासाठी तीची मनापासून तयारीही होती.
तिने नोकरी करावी किंवा करू नये हा सर्वस्वी तिचाच निर्णय असावा या मताचा तिचा नवरा असल्याने  तिची बाळासाठीची तगमग बघून फक्त नवऱ्यानेच तिला नोकरी सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी पाठींबा दिला .
        "तुझी इच्छा झाली तर नोकरी पुन्हा मिळवता येईल पण आपल्या बाळाचं बालपण तुला पुन्हा बघायला मिळणार नाही. आपल्या दोघानाही त्याच्या सोबत घरी राहता आलं असतं तर मजा आली असती पण आपल्यापैकी एकाने कामावर जाणं गरजेचं आहे. बाळाला तुझी गरज जास्त आहे तेव्हा तूही मोकळेपणाने आई होण्याच्या सुंदर अनुभवाचा आनंद घे आणि मीही जबाबदार बाबा होण्याचा प्रयत्न करतो  ". अशी  हसून त्याने तिची समजूत काढली.


त्याच्या त्या शब्दांनी तिला खूप धीर मिळाला . नोकरी की बाळ यात बाळाची तिने निवड केली. घरात येणारा पैसा अचानक कमी झाला आणि बाळाच्या आगमनाने खर्च तर वाढले होते. अनेक आव्हाने निर्माण झाली पण दोघांनी एकमेकांच्या साथीने त्यावर मात केली. यामुळे त्यांच्या तिघांचे संबंध अधिक दृढ झाले.
              इतर आप्तगण जेव्हा घर, गाडी , स्थावर मालमत्ता जमवत होते तेव्हा हे दोघं मुलाच्या संगोपनात रमून गेले होते.
अनेक समारंभात तिच्या आप्तपरिवाराकडून आपल्या उंचावलेल्या राहणीमानाचा वापर करून निशाचा नोकरी न करण्याचा निर्णय कसा चुकला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जायचा. वर्ग मित्रही ," तू एवढी शिकली तेव्हा आम्हाला कधी वाटलच नाही की तू अशी घरी काकू बाई होवून बसशील" असं बोलून जायचे. एखाद्या मैत्रिणीने ती जोपासत असलेल्या छंदांच कौतुक केलं तर बाकीच्या म्हणायच्या ," काय फायदा त्या छंदांचा त्याने  फक्त वेळ मजेत जातो  पैसे मिळत नाही . नोकरी केली असती तर चार पैसे फेकले की सगळं आयतं मिळालं असतं " असं बोलून तिचा हिरमोड करत होत्या.  तर काहींना वाटायचं ती घरीच असते ना मग काय नवल तिच्या छंदांच.
समाजात वावरतांना तिच्या घरी असण्याचा , निव्वळ गृहिणी असण्याचाच उहापोह केला जायचा.
      तिचं यश नेहमीच पैशात तोलल जात होत.
तिच्यावर याचा काहीच परिणाम होत नव्हता कारण नोकरी करणाऱ्या/ पैसे कमावणाऱ्या मधेही आपापसात कायम चाढाओढ सुरू असायची. ती स्पर्धा त्यांना कधीच पूर्णपणे आनंदी राहू देत नव्हती . निशाला कोणी स्पर्धेत धरत नव्हतं आणि तीही  कोणाशीच कधी स्पर्धा नव्हती. त्यामुळे बाह्य जगाशी जुळवून घेतांनाही तिचा आनंद हा सर्वस्वी तिचा होता. तिच्या या वृत्तीमुळे तिचा नवराही समाधानी होता.
       कोणी काहीही बोललं तरी तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं तिला स्वातंत्र्य होत. तिने घेतलेले निर्णय हे सर्वस्वी तिचेच होते आणि त्याबद्दल तिच्या मनात कोणताच पश्चाताप नव्हता.
        "नोकरी करून किती दगदग होते , कमावलेल्या पैशाचा उपभोग घ्यायलाही वेळ नाही, मुलांना द्यायलाही वेळ मिळत नाही. सुट्टी घेऊन घरी बसलो तरी काम सुधारत नाही. "  अशा इतर मैत्रिणीसारख्या कौतुक वजा तक्रारी तिच्या जवळ नव्हत्या परंतु अनेक सुखद आणि निवांत क्षण तिने  कुटंबीयांसोबत घालवलेले होते . तिच्या नवऱ्याची तिला पूर्ण साथ होती म्हणून तीही निर्धास्त होती.
          दोघांनाही   रोज आपण आपल्यातलं उत्तम द्यायचं हिच सवय असल्याने दोघेही आपापल्या क्षेत्रात पुढे जात होते.
 सोशल मीडियाचा वापर करून ती आपल्या छंदांना अनेकांपर्यंत पोहचवत होती . ज्यांना तिच्यासारखे छंद जोपासायाचे होते त्यांना मदत आणि मार्गदर्शन करत होती. तिने अनेक गृहिणींना छंद जोपासत आनंदी राहण्यासाठी प्रेरित केले होते. अनेक गृहिणींना तिने त्यांचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला.
 ती  कोणाला  रांगोळी काढायला शिकवायची तर कोणाला भरतकाम , कधी चित्रकलेचे धडे द्यायची तर कधी विशिष्ट पदार्ध सोप्या पद्धतीने करून दाखवायची.  हळू हळू सोशल मीडियावर तीला चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
गृहिणी म्हणून काम करतांना आपलं बँक बॅलेन्स नक्कीच वाढत नाही पण आहे त्या वेळेचा सदुपयोग करून सतत काही तरी नवीन शिकत राहिलो तर वेळ मात्र आनंदात जातो . आपण आनंदी राहिलो तर घर आनंदी राहतं. हे अनुभवाने ती शिकली होती आणि इतरांनाही शिकवत होती.



     तिच्या छंदांनी तिला नवी ओळख मिळवून दिली.  तिच्या छंद जोपासण्याच्या याच  सवयीची नोंद ' स्वयं सिद्धा' या सुप्रसिद्ध  कार्यक्रमाने घेतली. त्यांच्या  'आनंदी आयुष्यासाठी छंद जोपासलेच पाहिजे ' या भागाकरिता त्यांनी तिची मुलाखत घेवून तिचा सत्कार करण्याचं ठरवलं . तिच्यासारख्या इतर काही गृहिणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या . त्यांच्याही मुलाखती होत्या. प्रत्येकीला ," तू काय घरीच असते" या समाजाच्या मानसिकतेला सामोरं जावं लागलं होतं.  त्यांना भेटून आणि बोलून तिला बरच मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडून  तिला तिच्या कामा प्रती अधिक प्रेरणा मिळाली. एक नवीन आत्मविश्वास मिळाला.
  तिला नोकरी सोडून आज १२ वर्षे पूर्ण झाली होती आणि योगायोगाने आजच  टी व्ही वर तिची मुलाखत झळकली . त्यातलं तीच प्रसन्न हास्य बघून आणि आत्मविश्वास पूर्ण बोलणं ऐकून अनेकांना  प्रेरणा मिळाली . अनेकांना तिचा हेवा वाटला.
      सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.  नोकरी सोडून घरी बसली म्हणून बोल लावणाऱ्या मित्रमंडळीलाही आज तिचा अभिमान वाटत होता.
आज तिचे यश पैशात तोलाता येत नव्हते. तिने पैसा कमावला नव्हता पण कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांच्या आनंदाने तिच्या आठवणी मात्र कायमच्या श्रीमंत झाल्या होत्या. पैसा हे तुमच्या यशाचं आणि आनंदाचं मापदंड ठरू शकत नाही हे तिने सिद्ध केलं होत.

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः
 कथा आवडल्यास नक्की कळवा. शेयर करताना नावासहितच करावी हिच विनंती. इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे. ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.blogdpot.com ही आहे.







            

प्रॉमिस डे

 #प्रॉमिस_डे
#नित्याचाच
#तरीही_खास
 
©️ अंजली मीनानाथ धस्के
    आज जरा घाईचा दिवस होता. संपवू म्हंटल तरी कामे संपतच नव्हती. फोनवर सतत वाजणाऱ्या नोटीफीकेशन साऊंड ने तर तिचं डोकं उठलं होतं. घाईने तिने फोन हातात घेतला तर त्यावर व्हॅलेंटाइन आठवड्यानिमित्त अनेक मित्र मैत्रिणींचे आपल्या जीवनसाथी  सोबतचे विविध आनंदी क्षण असलेले फोटो, व्हिडिओ संदेश होते. ते मेसेज वाचून तिला उगाचच वाटायला लागलं की सगळं जग प्रेम व्यक्त करत असतांना आपण मात्र घरगुती कामात अडकून पडलो आहोत. तिला प्रकर्षाने जाणीव झाली की ,' हल्ली आपण मुद्दाम असं प्रेम व्यक्त करतच नाही. व्हॅलेंटाईन डे  साजरा करणं काही आपली संस्कृती नाही हे कितीही माहीत असलं तरी कोणत्याही एका दिवसाची वाट न पाहता प्रेम व्यक्तही तर करणं जमत नाही.  आपण संसाराच्या जबाबदाऱ्या वाटून घेतांना सगळ्यांचे कौतुक करतो पण एकमेकांना मुद्दाम कधी वेळ देत नाही. ते काही नाही आपणही आपल्या प्रेमाला चारचौघांसारखं व्यक्त करायला हवं.' 
असा विचार डोक्यात सुरू असतांनाच  तिने चपात्या करायला घेतल्या. जेमतेम दोन चपात्या लाटल्या आणि  तिने नवर्‍यासाठी,' लव यू' असा मेसेजही टाइप केला. मेसेज पाठविण्याआधी तिचे लक्ष तव्यावरच्या चपातीचे गेले. अन्‌ गॅस सिलेंडर संपले आहे हे लक्षात येताच झटकण फोन बाजूला ठेवला. आता तिची अजूनच चीडचीड झाली.
         'ऑनलाईन बुकींगसाठी नवऱ्याचा फोन नंबर दिलेला होता. आता तो ऑफिस मिटिंगमधे बिझी असणार. आता संध्याकाळपर्यंत बुकिंग करण्यासाठी थांबव लागणार . दुसरं सिलेंडरही  मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून तिला दिलेलं आहे.' असे स्वगत सुरू असतांना
"या गॅस सिलिंडरलाही आजच संपायच होतं' म्हणत ती चरफडत होती. 
              तेवढ्यात तिचा फोन वाजला. नवर्‍यावर असलेले प्रेम व्यक्‍त करण्याचे विचार केव्हाच मागे पडले होते. त्यामूळे नवऱ्याने केलेला फोन बघून त्याचा जास्त वेळ न घेता तिने पट्कन गॅस सिलिंडर संपल्याच सांगून टाकलं.
" बुकिंग करायला विसरू नको " असं बजावलं आणि फोन ठेवून दिला.
        कामापुरता स्वयंपाक झाला होताच. राहिलेली कणिक तिने फ्रीज मधे ठेवली. ओटा आवरून इतर कामं करायला घेतली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
          दार उघडलं तर समोर त्याच्या मित्राचा ऑफिस बॉय सिलेंडर घेवून उभा. " दादांचा फोन आला म्हणून ताबडतोब आमच्या कॅन्टीनचा सिलेंडर घेवून आलो. नवीन सिलेंडर येईपर्यंत वापरायला होईल " असं म्हणून तो सिलेंडर ठेवून निघूनही गेला.
      त्याला  खास एका दिवशी प्रेम व्यक्त करता येत नाही पण माझ्या "सुख दुःखात " साथ देण्याच वचन मात्र तो आजही न चुकता पाळतो  या जाणिवेने ती खूप सुखावली.
      नेमकी ती अडचणीत असतांना नेहेमी त्याचा स्वतःहून फोन कसा येतो? न सांगताही त्याला तिच्या छोट्या मोठ्या अडचणी कशा कळतात? स्वतः कामात बिझी असूनही त्याला तिच्या अडचणीला प्राधान्य देणे कसे जमते? रोज न चुकता ऑफिसमधे पोहोचल्यावर 'पोहोचलो ' तर लंच टाईममधे ' तू जेवलीस का?' असा मेसेज पाठविणे कसे जमते? तिचा मूड खराब असतो तेव्हाच फ्रीजमधे डेअरी मिल्क कसे असते? तिची तब्येत ठिक नसते तेव्हा त्याला सुट्टी घेवून तिच्या आवडीचा मेनू बनविण्याची लहर कशी येते? तिच्या माहेरच्या माणसांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा  संदेश पाठविणे कसे जमते? आज अचानक या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिला नकळत उमगली आणि तिच्या चेहर्‍यावर त्याच्या प्रेमाची लाली चढली. आयुष्य आनंदी असण्यासाठी प्रेम व्यक्त करता येण्यापेक्षा प्रेम निभावता येणे आवश्यक असते. याची जाणीव होवून तिने पुन्हा फोन हातात घेतला. त्यावर नवर्‍यासाठी मघाशी टाईप केलेला 'लव यु' चा मेसेज अजूनही प्रतिक्षेत होता. खरं तर आता  'लव यु बोलना तो बनता है' असे वाटून तिचे तिलाच हसायला आले. तरीही तिने 'लव यु' चा मेसेज डिलीट करून ,'थँक्यू, आज थोडे लवकर यायला जमेल का?' असा मेसेज पाठवून दिला. थोड्या वेळात त्याचाही,'बघतो जमते का' असा मेसेज आला .
        तो मेसेज वाचून ती एकट्यातही लाजली आणि कोणत्याही कारणाशिवाय नवऱ्याच्या आवडीचे लाडू बनवायला घेतले. तो लवकर घरी येईल का नाही? लाडू गोड होतील की नाही? माहीत नाही पण त्याच्या संगतीने आयुष्य गोड होतंय या भावनेने ती आनंदून गेली.
 त्या दोघांचा आजचा प्रॉमिस डे मात्र कोणत्याही खोट्या, दिखाऊ प्रॉमीस देण्या घेण्या पासून अलिप्त राहिला. 
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिप: कथा आवडल्यास लाइक कमेंट तर कराच पण शेयर करतांना नावासहित करा ही विनंती.
इतर लिखाण आणि रांगोळ्या " आशयघन रांगोळी " anjali-rangoli.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहे.