ओढ वारीची

#ओढ_वारीची

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पावसाचे दिवस असूनही पाऊस काही पडत नव्हता.  नेहमीपेक्षा उशीर होतोय म्हणुन सगळ्यां शेतकर्‍यांचे डोळे पावसाकडे लागले होते. गरीब संपतला तीन एकर शेती होती परंतू  खायचे काय आणि पेरायचे काय अशी चिंता लागली होती. पेरणी करायची ठरवली तरी त्याच्याकडे फक्त एकच बैल होता. गावत कोणी त्याला आपला बैल द्यायला तयार नव्हते. पैशा अभावी मोठ्या पोरीचे लग्नही मोडले होते.  डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. तो चेहर्‍यावर दाखवत नसला तरी मनात मात्र दुःखाचा पाऊस धोधो कोसळत होता. 

             खिशात दाम नाही, करायला काही काम नाही. अशी त्याची अवस्था होती. संसाराच्या कटकटींना तो पुरता वैतागला होता. संसार सोडून जीव देण्याचा त्याचा निर्णय पक्का होवू लागला होता.  असाच शेताच्या बांधावर चिंता करत बसलेला असतांना, त्याच्या कानावर विठ्ठल भजनाचे स्वर पडले.  त्या स्वरांचा पाठ पुरावा करत आपसूक तो वारकरी मंडळींच्या एका छोट्या गटात सामील झाला.  पुढचा मागचा कसलाही विचार न करता तो चालू लागला.  

जिथे ते थांबतील तिथे थांबू लागला. ठिकठिकाणी त्याला खाण्याच्या वस्तू, चालतांना ऊपयोग पडतील अशा अनेक वस्तू मिळू लागल्या. त्याच्या पायात चप्पल नव्हती म्हणुन त्याला एकाने चप्पल दिली. ज्यांच्या घरी मुक्काम केला होता त्यांनी एक जोडी धोतर दिले.  कशानेच त्याचे मन भारावून गेले नव्हते.  मुखाला हरिनामाची आणि पायांना पंढरपूरची ओढ फक्त लागली होती. शेतातल्या त्याच्या घरी त्याची शोधाशोध सुरू झाली.  काही वारकऱ्यांसोबत त्याने पंढरपूरची  वाट धरली आहे असे समजल्यावर त्याच्या पत्नी जनाने वारी संपेपर्यंत वाट बघण्याचा निर्णय घेतला.  खरतर ताबडतोब जावून त्याला घरी परत आणण्याची तिची तीव्र ईच्छा होतो.  परंतू आधीच फाटका असलेला संसार अधिक उघड्यावर टाकून जाण्याची तिची हिंमत झाली नाही. घरात तरुण पोरगी होती. शेतात पेरणी करायची होती. तीही नवर्‍याच्या मागे त्याला शोधायला  निघाली असती तर कर्ज वसुलीला येणार्‍यांनी मुलांचे हाल केले असते. त्याला शोधायला किती दिवस लागतील याचाही काही नेम नव्हता. हातात काहीच पैसे नसतांना व तो वारीला गेलाय की घर सोडून गेलाय हेही नक्की माहीत नसतांना त्याला शोधायला घरा बाहेर पडणे अत्यंत कठीण काम होते. अखेर तिने विठू माऊलीवर सगळ्या चिंता सोपविल्या. विठू माऊलीच त्याला घरी येण्याची बुद्धी देईल या श्रद्धेवर तिने मन खंबीर करत संसार सांभाळण्याचा निर्णय घेतला.

सेंद्रिय पद्धतीने शेती करणार्‍या काही निवडक शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठ बियाणे वाटप करणार होते. जनाला जेव्हा हे कळाले तेव्हा तिने कृषी अधिकारी यांच्या कडे धाव घेतली. सगळ्यांना बियाणे वाटप करून झाले होते. जनाने बियाण्यांचा आग्रहच धरला. एका प्रयोगा अंतर्गत विशिष्ट पद्धतीने तयार केलेले भुईमुगाचे बियाणे फक्त शिल्लक होते. त्या बियाण्यांच्या चाचण्याचे निष्कर्ष स्थिर नव्हते. त्या बियाण्यांच्या बाबतीत कृषी अधिकार्‍यांना खात्री नव्हती. तशी माहिती त्यांनी जनाला दिली.  

   घरात खायला पुरेसे अन्न नसताना पेरायला बियाणे कुठून आणायचे? नवरा घर सोडून गेलाय तो परत येईल याची खात्री देता येईल ? एकच म्हातारा बैल घेवून पेरणी तरी किती आणि कशी करायची ? असे अनेक प्रश्न सतावत असताना शेत रिकामे राहण्यापेक्षा विशिष्ट पद्धतीचे बियाणे जमेल तसे पेरले तर उत्पन्न निघाले नाहीच तर निदान गुरांना चारा होईल असे मत जनाचे होते. तीने फारच हट्ट धरला तेव्हा अधिकार्‍यांनी तिला तिच्या जबाबदारीवर बियाणे नेण्यास परवानगी दिली.  

           बियाणे घेवून घरी आली तर तिच्या पडक्या गोठ्यात म्हातार्‍या बैलाजवळ जखमी वळू बसलेला होता. मुख्य रस्त्यावर गाडीच्या धडकेने वळूला जखमा झाल्या होत्या.  तो खूप घाबरलेला देखील होता. जनाच्या दोन्ही मुलांनी त्याला प्रेमाने चुचकारून घरी घेवून आले होते. 

 आहे त्या बैलाचा सांभाळ करणे कठीण असतांना या नवीन पाहुण्याला ठेवून घेणे शक्य नव्हते. तिच्या पोरांनी जखमांवर हळद लावली होती. त्याला प्यायला बादलीभर पाणी आणि थोडा चारा खायला दिला होता.

 त्यातच बाहेर पावसाची पीरपीर सुरु झाली म्हंटल्यावर तर त्याला बाहेर हाकलून तरी कसे द्यावे म्हणुन जना गप्प बसली.  पावसाची चांगलीच झड लागली होती. सलग दोन दिवस झाले तरी पाऊस थांबला नाही. पावसाने जरा उघडीप दिली की लगोलग पेरणी उरकायची असे जनाच्या मनाने घेतले.  या सगळ्या सोबतच नवर्‍याच्या परतीसाठी अखंड हरी नामाचा जप ही सुरूच होता. 

लग्न दोघांचे होते परंतू संसार हा फक्त बाईचा असतो. पुरुष कोलमडून पडला तर बाई संसार सांभाळून घेते. जर बाई कोलमडून पडली तर संसार होत्याचा  नव्हता होतो. याची जाणीव जनाला होती 

 बापाच्या जाण्याने उदास झालेली लेकरं तिच्या रडण्याने अधिक खचली असती म्हणुन तिने स्वतःला सावरले होते.  

तीन दिवसांनी पाऊस थांबला तसा तिने पदर खोचला. म्हातार्‍या बैलाच्या सोबतीला स्वतःच्या खांद्यावर जोखड घेतला आणि पोरांच्या मदतीने पेरणीला लागली.  पोटात पुरेसे अन्न नाही तरी केवळ ईच्छा शक्तीच्या जोरावर ती जोखड ओढत होती.  हरिनामाचा जप सुरु होताच.  गंमत म्हणजे पेरणीसाठी म्हातारा बैल जेव्हा गोठ्या बाहेर काढला तेव्हा वळूही त्याच्या मागोमाग आला.  पेरणी करतांना वळू जनाच्या सोबत सोबत चालू लागला.  आधीच जोखड खांद्यावर असलेली जना वळूच्या सोबत सोबत चालण्याने अडखळू लागली. तिने व पोरांनी त्याला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला परंतू वळू काही गेल्या सोबत येण्याचे सोडत नव्हता.  त्याला जास्तच हाकलून लावले तर तो पोरांच्या अंगावर धावून जाईल या भीतीने जनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले.  आता तर वळू जनाला अधिक खेटून चालू लागला. तिची चिडचिड होवू लागली होती. पेरणीच्या कामाला वेग येतं नव्हता. अखेर जना थकली तशी झाडाखाली जावून बसली. विठू माउलीच्या मनात जे असेल ते होवू दे म्हणत तिने सोबत आणलेली भाकर खायला घेतली.  पोरांनी बैलाला चारा दिला आणि तीही जना सोबत जेवू लागली. जनाला वाटल होतं की वळू कंटाळून निघून जाईल किंवा चारा खायला झाडाखाली येईल तेव्हा त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला झाडालाच बांधुन ठेवता येईल. 

  जेवण झाल तरी वळू काही जोखडापासून हालला नाही. चारा खायलाही आला नाही.  कंटाळून जनाने पुन्हा पेरणी सुरू करण्यासाठी जोखड खांद्यावर घेण्याचे ठरविले तसे वळूने तिला ढुशी दिली.  हे काय नवीन विघ्नं आलय म्हणत ती घाबरली.  पोरांना घेवून झाडाखाली बसुन राहिली.  तिचा धीर सुटला तसा तिने आकाशाकडे पाहिले व म्हणाली, " विठोबा तुलाच रं माझी काळजी , साहेबाच्या हातापाया पडून बियाणे आणले आहेत. आता हा वळू येवून उभा राहिला आहे तर पेरणी कशी करू रे? तूच काही मार्ग दाखव बाबा "

तिचे बोलणे ऐकून तिचा लहान मुलगा श्याम म्हणाला, " आई ग.... आपण या वळूच्या खांद्यावरच जोखड दिले तर? म्हणजे मग हा  पळून जाईल आणि आपल्याला पेरणी  करता येईल " 

त्याची ही कल्पना ऐकुन जनाला आश्चर्य वाटले.  

खर तर मुका जीव त्यातही आताच कुठे त्याच्या जखमा बर्‍या झाल्या होत्या. त्यात तो पाळीव नव्हता त्याच्या खांद्यावर जोखड ठेवायचे म्हणजे जिकिरीचे काम होते. अगदीच नाईलाज झाला म्हणुन जना त्या जवळ गेली आणि त्यालाच विनवू लागली, " बाबा र ...पेरणी खोळंबली हाय, एकतर ईथून बाजूला हो नाहीतर जोखड घेवून तूच पेरणी करायला मदत कर "

     ती बोलू लागली तसे वळूने जोखड चाटायला सुरवात केली.  

विठू माउलींच्या मनात असेल ते होईल म्हणत एका बाजूने बैलाला जुंपले तर  दुसर्‍या बाजूचा जोखड वळूच्या खांद्यावर दिला.  वळूने जराही तक्रार केली नाही उलट शांतपणे बैला सोबत चालू लागला.  दोन दिवसात पेरणी पूर्ण झाली. रात्रीच्या अंधारात वळू जिथून आला होता तिकडे निघून गेला  

 विठू माऊलींनीच आपल्या मदतीसाठी या वळूला पाठविले की काय? असा विचार जनाच्या मनात येवून तिने विठ्ठलाचे आभार मानले.  पावसाने यायला उशीर केला होता परंतु आता संतत धार पावसाने हजेरी लावली होती.  ईतर शेतकऱ्यांना वर असलेले दुबार पेरणीचे संकट टळले होते.  जनाची शेत पेरणी ही अगदी योग्य वेळेत झाल्याने तिलाही समाधान मिळाले होते.  

            ईकडे संपत विठ्ठलाचे अखंड नाम घेत पंढरपुरात पोहोचला होता. तिथे त्याला रोज त्याच्या गावचा माणूस भेटत होता आणि जना त्याची घरी वाट बघते आहे असा निरोप द्यायचा.  

        सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले परंतू एकादशीच्या दिवशी असंख्य भक्तांच्या गर्दीत जेव्हा विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी त्याने डोळे मिटून हात जोडले तेव्हा ही त्याच्या कानात, " संपत .... संकटाचा सामना कर. आल्या परिस्थितीचा स्विकार कर. पळून जावून संसार उघड्यावर टाकण्यात कसला पुरुषार्थ? हेही दिवस जातील. मी कायम तुझ्या सोबत आहे. घरी जना वाट बघते आहे . तुला माघारी फिरायला हव " ,असे बोलणे ऐकू आले आणि त्याने पटकन डोळे उघडले.  गाभाऱ्यात विठ्ठल कमरेवर हात ठेवून प्रसन्न चित्ताने विटेवर उभा होता.  ते सावळे सुंदर रूप बघून संपतचे डोळे भरून आले. संपतने विठ्ठलाच्या चरणी समाधानाने मस्तक टेकवले आणि घरी परत जाण्याचा निर्णय घेतला .

         जना एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शनासाठी गावच्या मंदिराला निघाली तेव्हा रस्त्यात तिला भुकेने व्याकूळ एक भिकारी दिसला तसं तिने त्याला स्वतः जवळ असलेला ओल्या नारळाचा तुकडा आणि गूळ खायला दिला.  ती पुढे जावू लागली तसे,' तुझा नवरा परत येईल' असे शब्द कानी पडले. तिने वळून बघितले तर भिकारी गूळ खोबरे खाण्यात मग्न होता.  आपल्याला भास झाला असे वाटून तिने मंदिराचा रस्ता धरला.

शेतातल्या बियाण्यांची रोप तयार झाली. संपत घरी परत आला. जनाने विठू माऊलीचे आभार मानले. जनाला बियाणे कसे मिळाले,तीने पेरणी कशी केली हे त्याला समजल्यावर त्यानेही विठ्ठलाचे आभार मानले. 

आता कितीही कठीण परिस्थितीत हरायचे नाही हे त्याने मनाशी पक्के केले. 

 परतीच्या वाटेवर त्याला काही धनिकांनी तिकिटासाठी व वाटेत खर्चा साठी थोडे पैसे दिले होते ते त्याने खर्च केले नाहीत. तो गेला होता तसा पायीच परत आला होता. त्या पैशातून त्याने एक कोंबडा व तीन कोंबड्या विकत घेतल्या. अंड्यातून पीले तयार झाली. हळू हळू कोंबड्यांची संख्या वाढायला लागली. अंड्यांची विक्री करून थोडे पैसे घर खर्चाला मिळू लागले. मोठ्या मुलीला अंगणवाडी सेविका म्हणुन काम मिळाले. दोन्ही लहान मुले शाळेत जावू लागली. संसाराची गाडी पुन्हा रूळावर येवू लागली.  

         शेतात पेरलेल्या अस्थिर बियाण्यातून चांगले पीक आले तेव्हा कृषी विद्यापीठाने त्यांच्या जमिनीच्या कसून चाचण्या घेतल्या.  भुईमुगाच्या पिकासाठी त्यांची जमीन अत्यंत उपयुक्त होती व अस्थिर बियाण्यां स्थिर करणारे अनेक नैसर्गिक घटक त्यांच्या जमिनीत आधीच उपलब्ध असल्याने बियाण्यांनी चांगले पीक दिले होते.  

            अनेक वर्षे केवळ सेंद्रिय शेती केल्यानेच त्यांच्या जमिनीचा नैसर्गिक पोत टिकून होता.  सेंद्रिय शेती करण्याच्या अनेक सोप्या पद्धती त्यांच्या कडून जाणून घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने त्यांना मानधन दिले. 

     संपत आणि कुटुंबाने काटकसरीने बचत करत हळू हळू कर्जाचे ओझे ही कमी केले.  बघता बघता वर्ष संपले. पुन्हा सगळ्यांना वारीचे वेध लागले. माळकरी सदा भाऊच्या मुलाचे स्थळ मुलीला सांगून आले.  याही वर्षी संपतने वारीला पायी जाण्याचा निर्णय घेतला. 

यावर्षी मात्र जनाने त्याला प्रसन्न चित्ताने निरोप दिला. पहिल्यांदा वारीला संपत चालत गेला होता. खरे तर त्याच्यामागे जनाचे मन ही गेले होते. शरीराने मात्र तिने संसाराचा गाडा हाकला होता. 

मुलीचे लग्न झाले. मूलही शिकून मोठी झाली. मुलांनी संसाराचा भार उचलला तेव्हा दोघेही जोडीने वारीला जाऊ लागली.

वाईट काळही थांबणार नसतो फक्त तोपर्यंत आपल्याला संयम ठेवता यायला हवा. ह्याच संयमाचे महत्व दोघांनाही संपतच्या पाहिल्या वारीच्या निमित्ताने समजले होते. 

संसाराला कंटाळून संपतने सुरू केलेली पंढरपूरची वारी दोघांनाही आयुष्यभरासाठी विठू माऊलीची ओढ लावणारी ठरली.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन  रांगोळी 'या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg



टेकू

#टेकू 


  श्यामल आणि वीणा या दोघी बाल मैत्रिणी होत्या. श्यामल कायमस्वरूपी गृहिणी पद भूषवत होती तर वीणाने सात वर्षापूर्वीच पोस्टातील कारकून पदावरून सेवानिवृत्त होत गृहिणी पद स्विकारले होते.  


   दोघींनाही नवरा, सुन ,जावई आणि नातवंडे असा मोठा कुटुंब कबीला होता. अनेक वर्षे संसाराचा गाडा ओढल्याने त्यांना आता थोड्या अधिक स्वातंत्र्याची आस लागली होती. 


           दोघी भेटल्या की श्यामल कायम तक्रार करीत असे की," लग्न झाल्यापासून स्वतःच्या मताला मुरड घालत नवर्‍याच्या मताला प्राधान्य दिले. आमच्या दोघांचे फारसे कधी पटले नाही परंतू संसारात जीव गुंतत गेला.  आताही माझा मुलगा असो की मुलगी, मी नेहमीच दोघांच्या संसाराला पुढे नेण्यासाठी मदत करते.  नातवंडांसाठी  तर हाताची झोळी करून त्यांना वाढविले आहे. कसलीच हौस मौज केली नाही. सगळ्यांसाठी येवढे झिजले परंतु घरातल्या कोणत्याच मोठ्या निर्णयात मला सामील करून घेतले जात नाही. सगळ्यांना  गरज असली की माझी आठवण होते. कामात मला गृहीत धरले जाते. माझा मान मात्र मला कधी मिळत नाही.  येवढे कष्ट उपसले संसारासाठी कुठे कमी पडले काही कळत नाही. मुले कधी जवळ येवून प्रेमाने, " जेवलीस का ग? " असा साधा प्रश्न विचारत नाही. यांचे संसार मार्गी लावण्यासाठी मी मन मारून जगते. कधी दोन क्षण आराम मिळत नाही. तरी माझी कोणाला किंमत नाही. फार वाईट वाटते ग याचे. कधी कधी वाटते तुझ्यासारखी नोकरी करून पैसा साठविला असता तर आत्ता तुझ्यासारखीच रूबाबात राहिले असते." 


          खर तर सहा वर्षांपूर्वी वीणाची  परिस्थितीही अशीच होती.  नोकरीमुळे, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कधी मनासारखे जगता आले नाही. सेवानिवृत्त झाल्यावर मुलांचा संसार गळ्यात येवून पडला. आता  नोकरीची धावपळ नाही म्हणून सगळ्यांनीच वीणाला गृहीत धरायला सुरवात केली. पेन्शन आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारा पैसा बघून मुलांनी तिच्या गरजा शून्य ठरवत स्वतःच्या गरजा वाढवायला सुरुवात केली.सेवानिवृत्त झाल्याने कंटाळा यायला नको म्हणत वेळ मजेत जावा म्हणून दिवसभर घरातील कामे करायची, नातवंडाना सांभाळायचे आणि संध्याकाळी सगळे थकून येतात म्हणूनही तिनेच स्वयंपाक करायला लागायचे.  अशा सगळ्यांच्या अपेक्षा होत्या.  खरे पाहता स्वतःला थोडा वेळ देता यावा म्हणून तिने सेवानिवृत्ती स्विकारली असली तरी आता घरातल्या जबाबदार्‍यात वाढ होणार हे ही ती जाणून होती. प्रत्यक्षात मात्र 

घरात बारीक बारीक कामे इतकी होती की ती संपता संपत नव्हती आणि या कामांना कोणी कामेही मानत नव्हते. कहर म्हणजे या सगळ्यात स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता. दुपारी जरा आवडीचे पुस्तक हातात घेतले की नातवंड ' आजी आता गृहपाठ करूया' म्हणत हट्ट करायची. त्यांच्या लाडिक हट्टाला बळी पडत त्यांचा अभ्यास घ्यावा लागायचा. संध्याकाळी सून आणि शेजारीच राहणारी लेक थकून येतात म्हणत तिनेच सगळ्यां कामामधे पुढाकार घ्यायचा.  तिचा दिवसभर मस्त आराम झाला हे गृहीत धरून 'हल्ली तू दिवस भर घरीच असतेस' अशी कारणे देत जबाबदार्‍या लादल्याच जात होत्या. दोन दिवस मोठ्या सूनेकडे तर कधी  लेकीकडे आराम करून यावा म्हंटलं तर तिथेही हीच तर्‍हा असायची. तिथेही सगळीकडे आईच्या,आजीच्या हातचे हवे म्हणत कामातून अंग काढले जात होते. तिलाही लेक, नातवंडांसाठी राबायला आवडत असे परंतू प्रत्येक कामासाठी प्रत्येकाने  तिच्यावर अवलंबून राहणे तिला आवडत नव्हते. 

          या सगळ्याला कंटाळून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी वीणाने स्वतः मध्ये अनेक बदल करून घेतले. फार भावनिक न राहता कोणीतरी, कधीतरी आपल्याला समजून घेईल याची वाट न बघता स्वतःहून स्वतःची समस्या घरातील सर्व सदस्यांना सांगायला सुरवात केली.  दुपारी थोडी विश्रांती मिळावी म्हणून 'लोक काय म्हणतील' या विचाराला तिलांजली देत नातवंडांना दोन तासासाठी का होईना पाळणा घरात किंवा अभ्यास वर्गात पाठवण्याची सोय केली. संध्याकाळी पोळ्या करायला येणार्‍या मावशींना संपूर्ण स्वयंपाक करायला सांगून टाकले. त्या मावशीला सगळ्या सुचना  देण्याचे काम मुलगा, सून, नवरा,लेक  यापैकी जो कोणी घरात असेल त्याने करावे, असे जाहीर करून टाकले. सायंकाळी पायात चप्पल घालून  राम मंदिरापर्यंत चालून येण्याची सवय लावून घेतली. दिवसभरात घरातली जितकी कामे झेपतील तितकीच करण्याचा नियम घालून घेतला. वीणा घरातल्या प्रत्येक निर्णयात स्वतःहून सहभाग घेत स्वतःचे मत मांडू लागली.  तसेच आपले मत प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे असा आग्रह सोडून दिला. सगळ्या  बायकांना रोजच्या कामातून थोडी विश्रांती हवी असते परंतु ती त्यांना स्वतःच्या घरी कधीच मिळत नाही अशी त्यांची तक्रार कायम असते. 

"जो स्वतःच्या घरी  हक्काची विश्रांती घेवू शकत नाही त्याला जगाच्या पाठीवर कुठेच विश्रांती मिळू शकत नाही " या विचाराशी प्रामाणिक राहात रविवारचा दिवस वीणाने स्वतःच्या विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित करून टाकला. सुरुवातीला अगदी नवर्‍यानेही कुरकुर केली पण ती नमली नाही.  हळू हळू सगळ्यांना सवय झाली. पिटुकली नातवंडं ही रविवार आजीचा आरामाचा दिवस म्हणत तिला कमी त्रास देवू लागली. 'अडचण आल्यास हक्काने  सांगा मी मदतीला लगेच तत्पर असेल परंतू तुमचा संसार हा तुमचाच राहील. त्याचे ओझे माझ्या खांद्यावर लादून घेतले जाणार नाही' याची जाणीव आपल्या  लेकरांना करून दिली. तिच्या शरीराला झेपतील इतकी कामे मात्र ती बिनबोभाट करत राहिली. तसेच सगळ्यांनी स्वतःचा आर्थिक व्यवहार चोख सांभाळावा असा आग्रह धरला. ' घरातल्या प्रत्येक कमावत्या सदस्याने घर खर्चात समान सहभाग द्यायचा. तसेच जोपर्यंत अत्यंत महत्त्वाचे काम पडत नाही तोपर्यंत कोणी कोणाला पैसे मागणार नाही', असा ठराव केला. संसारातून पूर्णपणे  विरक्त होता येत नसेल तर सुखी होण्यासाठी किमान स्वतःचा किंवा इतरांचा अहंकार कुरवाळत बसायच नाही असा कडक नियम वीणाने स्वतःला घालून घेतला. अशा छोट्या छोट्या बदलांनी वीणाच्या आयुष्यात शांती, समाधान आणि स्थैर्य आणले होते.  घरातील कुरबुरी, धुसफुस, अशांतता, अवाजवी अपेक्षा सगळ्यांना पूर्णविराम मिळाला. सातत्याने कुढत ,रडत बसुन नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मकतेने सत्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वावलंबनाचा मार्ग स्विकारणे तिच्यासाठी शहाणपणाचे ठरले होते. 

        आजही मंदिरातल्या भजनानंतर  श्यामल रोजचेच रडगाणे गात होती. इतर मैत्रिणींनी या आधीही अनेकदा तिला सहानुभूती दिली होती. आज तर त्यांनी समस्त ज्येष्ठ स्त्रिया कशा कायमच उपेक्षित असतात याचा पाढाही गिरवायला सुरुवात केली. 

वीणाने मात्र आज श्यामलच्या निमित्ताने सगळ्यांनाच नीट समजावून सांगण्याचा निश्चय केला. 


       "खरं तर स्त्री नोकरी करणारी असो वा नसो, प्रत्येकीने संसाराच्या सुरवातीपासून स्वतःसाठी काही रक्कम साठवायला हवी. साठवलेल्या रकमेतून काही रक्कम योग्य परतावा देणार्‍या प्रकल्पात गुंतवायला हवी. तशी रक्कम साठवलेली नसेल तर लक्षात घ्यायला हवे की, संसार हा दोघांचा असतो. नवर्‍याला दरमहा ठराविक रक्कम मागायला हवी.

काही वेळा घरातील आर्थिक व्यवहार स्त्रीच्या हातात नसतात म्हणून घरातील स्त्रीने मनात उपरेपणाची भावना बाळगणे योग्य नाही. हक्काने आपल्या योग्य आर्थिक गरजा मांडायला हव्यात. यामुळे तुम्हा सगळ्यांची रोज रोजची आर्थिक घुसमट थांबून आत्मविश्वासाचा अनुभव घेता येईल. अपेक्षांचे ओझे लादू नये आणि लादूनही घेवू नये. कायम स्वावलंबी रहावे आणि घरातील इतर सदस्यांनाही स्वावलंबनाची शिकवण द्यावी. किमान   उतार वयात तरी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य क्रम द्यायला हवा. घरातील तरुण पिढी आपल्यापेक्षा शरीराने बळकट असते. काही कामे त्यांनाच सांगावी. आपल्या वयाचा मान ठेवत अति श्रम करण्याच्या भानगडीत पडू नये. स्वतःला कामे होत नसतील तर नामस्मरण करत बसावे परंतु आदळ आपट करत ती कामे करण्याचा आग्रह करू नये.  सुनेने किंवा लेकीने कौतुक करावे म्हणुन काहीही करू नये.  दुखत खुपत असतांनाही आपणच कसे रोजचे सगळे व्यवहार नीट पार पाडतो हे दाखवत बसू नये. इतर सदस्य थकून घरी आल्यावर त्यांच्या हातात चहाचा कप देवून दिवसभराच्या कामांनी आपण किती थकलेले आहोत हे शब्दातून किंवा  आपल्या कृतीतून दाखवू नये. उलट पाण्याचा पेला हाती देत, " आज उशीर का झाला? दमलास/दमलीस का? " अशी चौकशी स्वतःहून करावी. अशा प्रेमळ शब्दांमुळे  सून, लेक स्वतःचा चहा करून घेतांना तुम्हालाही अर्धा कप चहा हातात आणून देतील याची खात्री बाळगा. तसेच उगाच  कामांचा सगळा भार सुनांवरही टाकू नये. ' एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ' ही ओळ कायम लक्षात ठेवावी. आपल्याच लेकरांची उणी दूणी काढण्याऐवजी त्यांच्यातील चांगल्याचा शोध घ्यावा व मन कायम प्रसन्न ठेवावे. मुख्य म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने सगळेच प्रभावित होतात मग घरातील सदस्य आनंदी का होणार नाहीत? पुढची पिढीही  सक्षम आहे परंतु तुम्ही 'टेकू' देवून तिला अधू करू नये. ज्याच्या सोबत संसार करतोय तो आपल्याला अनेकदा नीट समजून घेवू शकत नाही.  म्हणून इतर नात्यांकडून अशा अपेक्षा ठेवण्यापेक्षा सगळ्यांशी स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा.  तरुण पिढीशी असलेले मतभेद खुल्या मनाने स्विकार करायला शिकावे. त्यांना विचारांचे स्वातंत्र्य देत स्वतःच्या स्वातंत्र्याचीही जाणीव ठेवावी. भरल्या घरात आपण दुःखी, कष्टी का आहोत याची कारणे शोधतांना आत्मपरीक्षण  जरूर करत रहावे. यामुळे आपले नेमकी कुठे चुकते आहे याचा शोध लागतो. आपण स्वाभिमान जपतांना अहंकाराला तर कुरवाळत नाही ना हे वेळोवेळी तपासून बघावे. घरातली चार कामे कमी केलीत तर फार काही बिघडणार नाही. ती सगळी कामे कामाला ठेवलेल्या मावशीकडून करून घेतली जातील परंतू ती सगळी कामे करत असतांना तुम्ही नकारात्मक वातावरण निर्माण करत असाल तर तुमच्यात असलेल्या  चांगुलपणाला बगल देत एकांतवास तुमच्यावर लादला जाईल.  कोणत्याही नात्यात फार गुंतून पडू नये म्हणजे त्या नात्याकडून असलेल्या  अपेक्षाही कमी होत जातात. त्याचबरोबर आपल्या जबाबदार्‍याही कमी होत जातात.  आयुष्यात भावनिक गुंता न वाढविता प्रत्येक क्षण आनंदाने, निर्लेप भावनेने जगायला हवे.  समस्या असेल तर ती उगाळत बसू नये त्यावर लगेच उपाय शोधायला हवा. गावगप्पा करून सहानुभूती मिळविता येईल परंतू त्याने सुखी, समाधानी होता येत नाही. ", असे वीणा सगळ्यांना समजावत असतांनाच मंदिराच्या नवीन स्लॅबचे टेकू काढून टाकण्याचे काम सुरू झाले. त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधल्या गेले. 

            स्लॅब आता मजबूत झाला होता. त्याला टेकूची काहीच गरज राहिली नव्हती म्हणून सगळे टेकू काढून नवीन सभामंडप मोकळा करण्याचे काम जोरात सुरू होते . तेव्हा वीणा सगळ्यांना उद्देशून म्हणाली, " बघा गरजेला टेकू महत्त्वाचा असतो परंतू त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची दखलही तात्पुरती घेतली जाते. आज इथे तर उद्या तिथे अशी त्यांची रवानगी केली जाते. यांची गरज नसते तेव्हा खुशाल अडगळीत ठेवले जातात. या उलट खांबाकडे बघा ते कायम एकाच जागी स्थिर असतात.  तेही स्लॅबचा भार कायम पेलत असतात परंतू आपली जागा कधी सोडत नाही. खांब हा एखाद्या कोपर्‍यातला जरी असला तरी तेवढाच महत्त्वाचा असतो. मुलांच्या संसाराला टेकू देत बसण्यापेक्षा स्वतःच्या संसाराचे खांब होवून रहायला हवे. आपली जागा सोडायची नाही परंतू नात्यांची गुंफण अशी काही मजबूत करायची की, त्याच्या जोरावर मुलांच्या संसाराचा स्लॅबही ढळणार नाही."

            खरंतर 'टेकू ते खांब' हा प्रवास वीणासाठीही सोपा नव्हता.  संयम, विरक्ती, आत्मविश्वास ,संवाद कौशल्य आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे तिला संसारातील 'खांब' होणे शक्य झाले होते. वीणाने प्रामाणिकपणे मांडलेले विचार सगळ्यांनाच पटले. वीणाने सूचविलेले काही छोटे छोटे उपाय जरी आपण अंमलात आणले तर आपल्या अनेक तक्रारी कमी होवून समाधान मिळेल अशी आशा सगळ्यांच्या मनात जागृत झाली. श्यामललाही तिच्या वागण्यातल्या त्रुटी उमगल्या. वीणासारखे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर चांगले बदल अंगीकारता यायला हवे, या जाणिवेने सगळ्यांना प्रेरित केले.

 श्यामलसोबत सगळ्यांनी आजपासूनच रडगाणे बंद करून विचारांना सकारात्मक ठेवत आनंदी राहण्याचे वचन वीणाला दिले.


©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन  रांगोळी 'या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg











.

एक मिनिट रांगोळ्या

 #एक_मिनिट_रांगोळ्या 

झटपट काढा आकर्षक रांगोळ्या. (Short videos )

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)




अतिशय सोपी रांगोळी design 👇👇👇👇https://youtube.com/shorts/J_I2Y0x3nU4?feature=share



सुंदर गणेश रांगोळी 👇👇👇👇https://youtube.com/shorts/MtBFLYrCgtQ?feature=share




आकर्षक लक्ष्मी पाउले रांगोळी 👇👇👇👇https://youtube.com/shorts/U4B0vjFB3gU?feature=share

सणानिमित्त झटपट होणारी रांगोळी



सणा निमित्त झटपट होणारी रांगोळी 👇👇👇👇

https://youtube.com/shorts/JF2nZll6zb0?feature=share








बॉर्डर रांगोळ्या (3)

#बॉर्डररांगोळ्या 

खाली दिलेल्या रांगोळ्या अत्यंत सोप्या पद्धतीने काढल्या आहेत. संपूर्ण video दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/UfD2dLdg2j8

Video आवडल्यास like comment share करायला विसरू नका. 

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



आषाढी एकादशी २२०२

 #आषाढी_एकादशी

#रांगोळी 

 आषाढी एकादशी निमित्त घेवून येत आहे... सोप्या सुंदर रांगोळ्या. रांगोळ्या अशा ज्या तुम्ही काढू शकता.  रांगोळ्या अशा ज्या फक्त मन मोहून घेत नाही तर विठ्ठल भक्तीची प्रसन्न अनुभुती ही देतात.  विठू माऊली रांगोळी:

साधी आणि तितकीच आकर्षक 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/M2m-R0kbtTM


रांगोळ्या आवडल्यास like, comment  आणि जास्तीत जास्त Share ही करा.

Thank you 😊 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



आषाढी एकादशी २०२२

 #आषाढी_एकादशी

#रांगोळी 

 आषाढी एकादशी निमित्त घेवून येत आहे... सोप्या सुंदर रांगोळ्या. रांगोळ्या अशा ज्या तुम्ही काढू शकता.  रांगोळ्या अशा ज्या फक्त मन मोहून घेत नाही तर विठ्ठल भक्तीची प्रसन्न अनुभुती ही देतात.  

         विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी: अत्यंत सोप्या पद्धतीने काढली आहे 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/gt_jCvzy6y8

रांगोळी आवडल्यास like, comment  आणि जास्तीत जास्त Share ही करा.

Thank you 😊 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)