बोल लावण्याआधी समजून घेणे गरजेचे


'चूक ' या विषयावर लिहिलेली ही गोष्ट ..... तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा....
#१००शब्दांचीगोष्ट
#बोल_लावण्याआधी_समजून_घेणे_गरजेचे
                  दोन वर्षाचा आदित्य आईसोबत  लपंडाव खेळतांना पायरीवरून  पडला. डोक्याला जबर मार  लागला . रक्त येवू लागलं . त्याचं रडणं ऐकुन घरातले पाहुणे धावत आले. स्वतःच्या मुलालाही ही नीट सांभाळत नाही ... कधी शिकणार हे सगळ असं वाटून सगळ्यांना अनघाचाच राग आला . त्यांच्या डोळ्यातला हा राग पाहून अनघाला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले . लक्ष्मीबाई मात्र शांत होत्या .  सगळ्यांना जायला सांगून तिला हळद ... कापूस आणून दिले .
पाहुण्यांनी,'  सुनेला खडसावण्याची चांगली  संधी का सोडली ' अशी तक्रार केली तेव्हा त्या संयमी आवाजात म्हणाल्या , "चूक जरी तिची होती तरी लेकरूही तिचंच होत.   बोलून... तिला दुसऱ्यांदा जखमी करायचं नव्हतं "
©️ अंजली मीनानाथ धस्के
इथे ही रांगोळी का घेतली असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच... ही कथा जे सांगू पाहते आहे ते म्हणजे ......
* आपल्या लेकराला लागलंय म्हंटल्यावर इतर कोणापेक्षाही त्याचे दुःख आईलाच अधिक असते.
* प्रत्येक नात जर आपण लहान लेकरा प्रमाणे सांभाळलं तर अर्थातच नात अधिक घट्ट बनेल .
*या कथेतील सासूही चुकांना महत्व न देता  .... नात्यांना जपणारी ... समजून घेणारी आहे . या रांगोलीतल्या हाताप्रमाणे......
त्यामुळे ही रांगोळी अनेक अर्थाने या कथेला साजेशी वाटते म्हणून हिची निवड केली आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के

वेदना..... सुखाची

#अलक
#वेदना
गेले १६ तास ती कळा सोसत होती ... शेवटचा प्रयत्न म्हणून शिणलेल्या जीवाने डोळे घट्ट मिटून घेतले वरचे  दात  खालच्या ओठात जोरात रूतवले .... बाळाचे रडणे कानी पडले आणि सोसलेल्या सगळ्या वेदना आनंदाश्रु होवून पाझरू लागल्या.
©️ अंजली मीनानाथ  धस्के
वेदना या विषयावर लिहिलेली ही एक अतिशय लघु कथा (अलक)

संस्कार कपड्यांवर अवलंबून नसतात

' नमस्कार ' या विषयावर लिहिलेली ही कथा momspresso Marathi वर विजेती कथा म्हणून निवडल्या गेली आहे.
#१००शब्दांचीगोष्ट
#संस्कार_कपड्यांवर_अवलंबून_नसतात
            सोहमने  रिटाशी लग्न करायचा निर्णय सांगितला तेव्हा  आशाताईंनी अंदाज घेण्यासाठी  रिटाचे  fb पेज तपासले  . सगळ्या फोटोमधे ती सुंदर दिसत असली तरी तिच्या कपड्याकडे बघितल्यावर त्यांना स्वतःचीच काळजी वाटू लागली. एकटीने सांभाळलं आपण पोराला .... त्याच्याशिवाय राहता येईल??? हे शक्यच नाही..... असा  विचार करूनच त्या रिटाच्या घरी गेल्या .
तिथे तिच्या आईबाबांनी हात जोडून  'नमस्कार' म्हणत हसत  स्वागत केले. घरात गेल्यावर मॉडर्न कपड्यातल्या  रिटाने खाली वाकून पायाला स्पर्श केला.  मस्त गरमागरम उपमा आणि कॉफी बनवून आणली . तिच्या हातच्या उपम्याची चव घेतल्यावर त्यांना जाणवलं,'  संस्कार कपड्यांवर अवलंबून नसतात ' त्यांनी  आपल्या हातातल्या सोन्याच्या  बांगड्या हळूच होणाऱ्या सुनेच्या हातात घातल्या.

©️ अंजली मीनानाथ धस्के

शो मस्ट गो ऑन

' नमस्कार ' या विषयावर लिहिलेली ही कथा
#१००शब्दांचीगोष्ट
#शो_मस्ट_गो_ऑन

RJ साक्षी कार्यक्रमाच्या  तयारीत व्यस्त  असतांनाच वाईट बातमी आली  . तिच्या  बाबांचा अपघात झाला होता रुग्णालयात त्याच्यांवर  उपचार सुरू होते.
आजचा कार्यक्रम सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा होता. वेश्यांची मुल ... समस्या.... आरोग्य ...  पालकत्व.... पुनर्वसन  यावर   अभ्यासपूर्वक  मुलाखत घ्यायची  होती.  विशेष'  पाहुणेही येवून बसलेले . अनेकांचं भविष्य यावर अवलंबून होत.  काय करावे सुचेना.... डोळ्यातलं पाणी थांबेना तेवढ्यात तिला  वडिलांचे शब्द आठवले , ' शो मस्ट गो ऑन' .... आपल्या वैयक्तिक अडचणीमुळे कोणतेही चांगले काम थांबता कामा नये . डोळे पुसत जणू काही झालंच नाही अशा आवाजात  तिने सुरुवात केली ..... "नमस्कारssss पुणे .....  कसे आहात ... मजेत ना .... "
©️ अंजली मीनानाथ धस्के

ईशा , बाबा आणि डायरी

#१००शब्दांचीगोष्ट
' माझे बाबा माझे जग '... या विषयावर लिहिलेली ही कथा आहे .
#ईशा_बाबा_आणि_डायरी
            माझ्या शाळेची सगळी तयारी तूच करायचा.   ताप आला  की , रात्रभर  पट्टया बदलत उशाशी  बसायचा.   आईची आठवण काढू नये म्हणून ती बाहेरगावी  असते, असं   खोटं सांगायचा.  तिचे जुनेच व्हिडिओ दाखवून  समजूत काढायचा     तुला मनभरून रडताही आल नाही . तुझी धडपड ... घुसमट कळायची पण  सांगू कसं??  मला   ठावूक आहे आई सोडून गेल्याच . तू मात्र जगणंच विसरला   म्हणूनच आज खोटा हट्ट केला  तुझ्यातोंडून वदवून  घ्यायला ....  तुला ओझ्यातून मुक्त करायला . .... तिचं जाणं मी स्वीकारलं पण तुला असं दुःखी बघवत नाही रे कारण   तूच माझं जग आहेस
 रडून झोपलेल्या चिमुकल्या ईशाच्या डायरीत  हे वाचून राहुलचे डोळे पाणावले.
©️ अंजली मीनानाथ धस्के

सुगंध, स्वप्न आणि ती

#सुगंध_स्वप्न_आणि_ती
#AnjaliMinanathDhaske

              एका निवांत क्षणी बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसलेल्या अस्मिताचे  लक्ष बहरलेल्या जुईच्या फुलांकडे गेले . आपोआप मिटल्या डोळ्यांनी तीने तो  सुगंध श्वासात भरून घेतला   आणि नकळत  भूतकाळात हरवून गेली .


अस्मिता एक स्वप्नाळू मुलगी. छोटी छोटी स्वप्न बघायची . बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करायची आणि पूर्ण झालं की त्याच आनंदात पुन्हा नवी स्वप्न बघायची. तिच्या लहानपणी अंगणात जुईचा वेल होता. त्याच्या फुलांचा जेव्हा दारात सडा पडलेला असायचा तेव्हा ती फुलं वेचायला ... त्यांचा गजरा करायला तिला खूप आवडायचं.  या फुलांचा सुगंध घरभर दरवळत असायचा. अंगणातल्या झोपाळ्यावर झोके घेतांना  ती या सुगंधा सोबत मिटल्या डोळ्यांनी  अनेक स्वप्न रंगवायची .
अभ्यास वाढला तस हळू हळू फुलं वेचायला वेळ मिळेनासा झाला . तरी दरवळणारा जुईच्याफुलांचा सुगंध तिला तिच्या  स्वप्नांच्या जगात घेवून जायचा. तिच्या मनात.... सुगंध आणि स्वप्न असच काहीसं नात तयार झालं होतं.
           किशोरवयात तिला सारखं वाटायचं की आपल्यालाही इतर मैत्रिणींसारखी स्वतंत्र खोली असावी . खोलीला मस्त फिका गुलाबी रंग असावा . खिडक्या सदैव उघड्या असाव्यात. त्यातून भरपूर सूर्यप्रकाश यावा.  हवेवर  झुळझुळ उडणारे मोतिया आणि फिक्या जांभळ्या  रंगाचे पडदे  असावेत . खोलीला स्वतंत्र मोठी बाल्कनी असावी . तिथे मस्त मोठा झोपाळा....   अंगणातला जुईचा  वेल तिथपर्यंत यावा आणि त्याच्या फुलांचा सुगंध तिथे दरवळावत रहावा.
एका भींतीला पुस्तकांचे मोठे कपाट... त्याला लागून ठेवलेला टेबल  .... त्यावर गरजेच्या सगळ्या वस्तू सज्ज... आरामात बसून काम करता यावे अशी खुर्ची..... शेजारीच मऊ गादीचा छोटा पलंग ..... खोलीच्या  एका कोपऱ्यात सुंदर  आरसा .... दुसऱ्या कोपऱ्यात कॅनव्हास , ब्रश आणि रंग .... थोडक्यात
सगळ्या छंदांचा .... आठवणींचा संग्रह करता यावा अशी तिची हक्काची जागा तिला हवी होती.
      आधी परिस्थितीच नव्हती की तिने तिचं हे स्वप्न घरी सांगावं ... आणि ते पूर्ण व्हावं पण जेव्हा वडिलांनी घराचं बांधकाम करायला घेतलं तेव्हा मात्र तिच्या आशा पल्लवित झाल्या. भावाच लग्न करायचं ठरल्यामुळे त्याच्या आवडीला प्राधान्य देण्यात येत होत. त्यातूनही मार्ग काढून एक खोली आपण आपल्याला हवी तशी करूच असा विश्वास घेवून  जेव्हा ती वडिलांशी बोलायला गेली तेव्हा वडिलांनी तिला नेहमीच्याच पद्धतीने समजावले , ' तुला वेगळी खोली कशाला हवी आता .... वर्षा सहा महिन्यांत तुझंही लग्न  करायचं आहे ' .
हे  बोलणं ऐकणारी आई  म्हणाली , ' ती म्हणतेय तस  करायला काय हरकत आहे . तिची हौस पूर्ण होईल '. त्यावर ते जरा वैतागूनच म्हणाले , " असली सगळी हौस नवऱ्याच्या घरी जाऊन करा म्हणावं .... इथे येवढे लाड केले तर तिथे निभाव लागणार आहे का? " त्यावर आईला बिचारीला काही बोलता आलं नाही.  पाण्याने भरलेले अस्मिताचे डोळे पुसतांना ती म्हणाली ," आहे त्या खोल्या पैकी कोणतीही खोली घे. तुला हवी तशी लाव मग तर झालं .... बाबांना मी समजावते . तू लाग कामाला ".
 मिळेल त्यात समाधान मानून .... त्याचही चिज करणारी ती लगेच कामाला लागली .
आईही लागेल ती सगळी मदत करत  होतीच ... तेवढ्यात बाबा आले आणि म्हणाले, ' एवढी कसली धावपळ सुरु आहे माय लेकींची.... ही दिवसभर तर कॉलेजमधे असते . स्वतंत्र खोली घेवून करणार काय ? परक्याच धन आहे लेक म्हणजे .... येवढे लाड हवेत कशाला '.
अस्मिताला खूप बोलायचं होत ....पण  आई ने तिला खूणेनेच गप्प रहायला सांगितले आणि बाबांना म्हणाली , ' परक्याच धन आहे म्हणूनच लाड करून घेते .  जे भेटलं नाही त्यासाठीच आपण हट्ट करतो  पण सासरची  लोकंही तुमच्यासारखीच लाड न   करणारी मिळाली तर??? माहेरी सगळे लाड झाले तर लेक सासरी त्याचा आग्रह धरणार नाही.  तिच्या मनात समाधान... तृप्तता  असेल तेव्हाच तर संसार सुखाचा करेल.   पुढचं कोणी पाहिलं आहे .... वर्षभरात लग्न ठरलं तर तेवढ्यासाठी तीच मन नाही मोडायच मला . खोली आणि फर्निचर  आहे तेच आहे मग तुम्हाला तरी काय त्रास आहे".
त्यावर ते , ' करा तुम्हाला हवं ते ' असं बोलून निघून गेले.
खोलीचा रंग सोडला तर बाकी काही तिच्या मना सारखं नव्हतं .  त्या खोलीला ती तिची खोली म्हणत होती खरी पण त्यात वडिलांची सगळी महत्त्वाची कागदपत्रे असणारे कपाट ,आईचे कपड्यांचे कपाट तर  भावाचा कॉम्पुटर यांचे अतिक्रमण होतेच . केवळ स्वतंत्र खोली या विचारानेच ती आनंदी होती. पण  बाबा म्हणाले तस खरंच तिला त्या खोलीत घालवायला फारसा वेळच मिळत नव्हता . स्व:तच्या खोलीत लावायचे म्हणून तिने रात्रीच्या अंधारात चमकणारे  तारांगण घेतले होते.
रात्री झोपतांना मात्र नभातले चांदणे खोलीत आलेले बघून आधीच स्वप्नाळू असलेली ती अधिकच स्वप्नाळू होवून जाई .

                    वर्षभरात खरंच तिचं लग्न ठरलं . तिथे तर घरातली सून म्हणून वाढलेल्या जबाबदाऱ्या ... नोकरी सांभाळतांना अनेक छोटी छोटी स्वप्ने मागे राहिली. लग्नानंतर पहिल्यांदा आई जेव्हा तिच्या सासरी आली तेव्हा हळूच तिच्या हातात ती माहेरी विसरून आली होती ते तारांगण दिलं . बघणाऱ्याने पूर्ण दुर्लक्ष करावं इतकी ती शुल्लक भेट पण अस्मिताला जणू तिचं स्वप्नातलं जग मिळालं होत.
सुटी बघून तिने व तिच्या नवऱ्याने चमकणाऱ्या तारका   खोलीच्या छताला लावल्या . लावून झाल्यावर तो तिला चिडवत म्हणाला,' एरवी फार समजूतदार असल्यासारखी वागतेस मग येवढ्या  बालिश स्वप्नांमधे  कशी रमतेस ग".
तीही खोटं खोटं रुसून म्हणाली, " माहेरी बाबा म्हणायचे सासरी गेल्यावर कर काय करायचं ते आणि  इथे सासूबाईं  सगळ्याच   गोष्टींवर फक्त त्यांचाच अधिकार आहे हे जाणवून देतात .बालपणीची  राहून गेलेली  काही स्वप्न आहेत ही .... तुला बालिशच वाटणार .... गंमत म्हणजे ही  स्वप्न बघतांना ती लगेच पूर्ण व्हावी असा आग्रह कधीच नसतो  कारण   स्वप्ने  बघण्यात .... ती रंगवण्यातच  आनंद आहे माझ्यासाठी ".
त्यावर तो अधिक थट्टने म्हणायचा , " चांगलं आहे ना .... तुझ्यामुळे  आपल्या बाळाचे   लाड पुरवण्याची रंगीत तालीम होते आहे माझी ".
आता रात्री तारका बघतांना तिला छान जरी वाटतं होत तरी  लग्नानंतर ज्या प्रश्नाची बोचनी प्रत्येक मुलीच्या मनाला लागते तीच बोचनी अस्मितेच्या मनाला लागली होती की,' आपलं खरं घर कोणतं?'
       सासरी रमली होती तरी माहेरची ओढ होतीच . त्याला कारणही तसंच होतं...... तिचा 'माझं घर ' हा शोध सुरूच होता .   इथे प्रत्येक वस्तूमधे सासूबाईंच वर्चस्व जाणवायच अजूनही आपली म्हणावी अशी एकही गोष्ट .... इथे  नाही . कुठे काय आणि कसं ठेवायचं ..... जेवण काय बनवायचं . इथे काय चालतं.... काय चालत नाही .... हेच ऐकावं लागतं .   काम करतांना फक्त आपलं घर मानून काम करायचं पण कोणीच अजून हे मान्य करत नाही की हे खरंच तिचं ही घर आहे.    तिच्या अस्तिवाच्या कोणत्याही खुणा  निर्माण करण्याचे स्वातंत्र्यच तिला  दिले जात नव्हते.
मग सहाजिकच माहेरच्या ओढीने ती तिकडे खेचली जायची .
तिथे तीने जमवलेल्या वस्तूंमधे तिचं अस्तित्व शोधायची .
पण तिथेही तिच्या सगळ्याच वस्तू .... आठवणी अडगळीच्या खोलीत रवाना झालेल्या .   दर वेळेस नवनवीन बदल होत गेले तसे तिचे अस्तित्व तिला तिथेही कुठेच दिसेनासे झाले . तिची चीड चीड वाढली. त्याचा राग ती घरातल्या लोकांवर काढू लागली.
सासरच्या घरात तिला तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता . तिच्या   स्वप्नांचे गाठोडे तिला धड उघडता येत नव्हते की टाकूनही देता येत नव्हते. मनाचा गोंधळ उडाला होता . लहापणापासूनच ,' जे करायचं ते नवऱ्याच्या घरी जाऊन करा ' असचं  ती ऐकत आली होती.
आणि आता नवऱ्याच्या घरी आल्यावर ' इथे असं चालणार नाही ' हे ऐकाव लागत होत. तिला कळत नव्हतं की तेव्हा हट्ट केला नाही ही चूक झाली  की आता हट्ट करतोय ही चूक  आहे.    दोन बोटींवर पाय ठेवण्याच्या नादात पाण्यात पडून बुडण्याची वेळ यावी अगदी तशीच अवस्था तिच्या मनाची झाली होती. त्यातून  सावरण्याआधीच  एका गोंडस मुलीची ईशाची ... ती आई झाली . भावाची मुलगीही दोन वर्षांची झाली होती. तिच्या सगळ्या स्वप्नांची जागा तिच्या मुलीने घेतली . आताही हक्क म्हणून  अधून मधून माहेरी जाणं होतंच .
              ईशा आता थोडी मोठी झाली होती .  माहेरी गेल्यावर जेव्हा ईशा  आणि भावाची मुलगी नेहा  खेळण्यावरून .... सामान ठेवण्याच्या जागेवरून भांडण करायच्या तेव्हा  ईशा आजीला विचारायची , ' आजी तू माझी ही आजी आहेस ना ? .... नेहा इतकंच हे घर माझं ही आहेच ना ?... मग इथे फक्त  ..... नेहाच खेळण्याचं कपाट... तिचच सामान घरभर का  आहे ??? माझी खेळणी .... कपाट  कुठे आहेत ???'      तीच्या या प्रश्नांवर काय सांगावं हे न सुचून आजी मग समजूत काढण्यासाठी तिच्याच कापाटाचा एक कप्पा आपल्या नातीला रिमका करून द्यायची .   ईशाही  खुश होवून सोबत आणलेली खेळणी ... कपडे त्यात मांडायची .
बाब खूप छोटी पण अस्मिताला अस्वस्थ व्हायला येवढं कारणही पुरेस होत.
अस्मिताने खूप विचार केला .... आपलं नेमक घर कोणतं ??? या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं अन्यथा मनाचा हा गोंधळ पिढी दर पिढी सुरूच राहणार.
घरी परत आल्यावर तीने ईशाला समजावले , " तू जास्त दिवस कुठे राहतेस ?? "
त्यावर ईशा निरागसपणे म्हणाली  , ' पप्पांकडे'.
तीने दुसरा प्रश्न विचारला, ' तुझी  शाळा..... मैत्रिणी कुठे आहेत ?'
ईशा चटकन् बोलून गेली , ' असं काय करतेस ग ... इथेच आहे न शाळा आणि मैत्रिणी ... '.
तीने शांतपणे सांगितलं , ' तुझी शाळा ... मैत्रिणी .. इथे .... तुझे पप्पा इथेच .... इथे तुझी सगळी खेळणी ... कपडे इथेच असतात . ते ठेवायला कपाट ही इथेच आहे.   तू जास्त दिवस राहते ते ही इथेच मग आजीच्या  घरात तुझ्या वस्तू कशा मिळतील   ?   इथल्या वस्तू ... हे घर आपलं आहे तिथल्या वस्तुंशी आपलं काही संबंध नाही ' .
ईशा चिडून म्हणाली , " असं कसं??? ......  आजी बाबा मामा मामी .... सगळे माझे आहेत . मला ते हवेच" .
त्यावर अस्मिता नकळत बोलून गेली ," वेडा बाई .... ते काय वस्तू आहेत का ???... मी तिथल्या वस्तू आपल्या नाहीत म्हणाले . ती सगळी माणसं आपलीच आहेत ग . त्यांच्यावरचा आपला हक्क ही तसाच राहणार आहे. एक गंमत सांगू .....
वस्तूंवर हक्क सांगण्यात जेवढी मजा आहे ना त्यापेक्षा जास्त मजा आपल्या माणसांसाठी काही वस्तुंवरचा हक्क सोडण्यात असते. म्हणून तिथे गेल्यावर खेळण्यांवरून ... कपाटावरून भांडण करणं योग्य नाही. आपण तिथे राहत नाही तर तिथे तुला हे सगळं कसं मिळणार  ?  तिथे आपण कपाटातली जागा मिळवायला जातो की त्यांचं प्रेम मिळवायला जातो? '
' त्यांचं प्रेम मिळवायला जातो ना ग .. मला सगळे हवे आहेत ' ईशा लाडात येऊन बोलली . अस्मिता ने पुन्हा सांगितले ,' मामा... मामी.... आजी.... आजोबा .... नेहा .... सगळी तुझीच आहे. फक्त वस्तू वरून भांडण नको ? '
ईशा ' ओके   मम्मा ... जावू मी खेळायला ' असं म्हणून खेळायला निघून गेली.
                आज ईशाला समजावून  सांगतांना अस्मिताला अचानक तिच्या प्रश्नाच उत्तर मिळालं होतं . घर म्हणजे फक्त  वस्तू नव्हे .... त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनते . आपलं अस्तित्व शोधायचं झालं तर ते माणसांच्या मनात शोधायला हवं ..... घरातल्या वस्तूंमधे नाही. वस्तूमधे  अडकून पडलो नाही तर  दोन्हीही घर आपली होतील.

          स्त्री मन किती विचित्र असतं नाही ???  चमचा माझा .... पोळपाट लाटणं माझं .... डबे माझे ... कपाट माझं .... घर माझं .... म्हणण्यात आपण समाधान मानतो. पुरुषांच बरं असतं आई माझी .... बायको माझी म्हंटल की बाकी सगळा पसारा आपोआप आवरला जातो . नवऱ्याच्या  वस्तूही आपण आपल्या मानतो . त्याचं सामान इथे तिथे पडलेलं असेल तर तेही आपण कुरकरत का होईना उचलून ठेवतो . त्याचं विस्कटलेल कपाट बघून आपला जीव लगेच दुःखी होतो . एक एक कपडा आपला मानून नीट घडी घालून ठेवतो.
तो मात्र आपल्या घडी केलेल्या कपड्यावरही  आरामात लोळू शकतो . गरज वाटलीच तर आपल्या नीट लावलेल्या  कपाटात ते कसेही कोंबु शकतो.
आपण छोट्या छोट्या वस्तूंमध्ये  जीव गुंतवतो. त्यांना जपण्यातच सगळा वेळ जातो . या गडबडीत   नात्यांना  द्यायचा वेळ कमी पडतो आणि शेवटी चिडण्या शिवाय आपल्या हाती काही रहात नाही.
आपणही इतकी वर्षे नेमक्या त्याच दुष्टचक्रात अडकलो .... सासरी माहेरी दोन्हीकडे आपलं अस्तित्व वस्तूतून शोधत राहिलो .... . सिद्ध करत राहिलो. जेव्हा जेव्हा ते साध्य झालं नाही तेव्हा तेव्हा उगाच दुःखी होत राहिलो.
माझं माझं म्हणण्यात आयुष्य गेल्याला   .......  वस्तूंमध्ये अस्तित्व जपणाऱ्या सासुबाईंकडून 'आपलं' म्हणण्याची.... आपल्याला स्विकारण्याची  अपेक्षा करत राहिलो.
माहेरी माझं माझं म्हणण्यासारखी एकही वस्तू शिल्लक राहिली नाही तेव्हा उगाच चडफडत राहिलो  पण ते ' माहेरच आपलं ' आहे हे विसरून गेलो . तसचं सासरी .... नकळत जीवघेण्या चढाओढीचे स्पर्धक होत राहिलो पण हे 'सासरही आपलच' हे कुठे लक्षात आलं.

लहानणापासून 'नवऱ्याच्या घरी जाऊन काय हवे ते करा ' हे ऐकत आलो तेही एका अर्थी बरच झालं . त्यामुळे स्वप्नांना   खरे करण्यासाठी कितीही  वाट पाहावी लागली तरी ती पाहण्याची आपली तयारी झाली. स्वप्नांना विसरून न जाता  त्यांचा पिच्छा पुरवावा लागतो . याची जाणीव झाली . माहेर जरी जन्मभूमी असल तरी आपली खरी कर्मभूमी सासर हेच आहे याची समज आधीपासूनच मिळाली.  सासर  आपलं खरं घर असल तरी दोन्ही घरातली माणसं आपलीच आहे. आपल्या हक्काची आहे . घरावर नुसते आपले नाव असून भागणार नाही तर घरातल्या माणसांच्या मनात आपले स्थान निर्माण करायला  हवे.  माझं.... काय... हे   शोधण्यापेक्षा सगळच आपलं मानायला हवं तेव्हा मनाचा गोंधळ होणार नाही. हक्क गाजवण्याआधी त्यासोबत  येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात. घरातल्या वस्तू आपल्या नाहीत याचं दुःख करण्यापेक्षा माणसं आपली आहेत याचा आनंद घ्यायला हवा. आपली स्वप्ने अशी गाठोड्यात  न बांधता त्यांचे पंख करता यायला हवे. स्वप्न पूर्तीचा आनंद नक्कीच खूप मोठा असतो पण अपूर्णतेची जाणीवच सतत प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा देणारी ठरते.  तिचा शोध थांबला होता . स्वप्नांचे गाठोडे न राहता  पंख झाले होते.

                या घटनेला आता बरीच वर्षे झाली होती......  आज   विस्मृतीत गेलल   तिचं एक अतिशय जिव्हाळ्याच स्वप्न पूर्ण झालं होतं ... आता तिचं स्वप्न स्वतंत्र खोली पुरतं मर्यादित नव्हतं तर  संपूर्ण घर तिला हवं तसं तिने सजवल होत  . आज  तिने वेचलेल्या ओंजळभरच   जुईच्या फुलांचा सुगंध तिला आनंदाच्या ..... सुखाच्या .... समाधानाच्या झोक्यावर झुलवत होता.
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाणाच्या सोबतीला रांगोळी ही येते तुमच्या भेटीला.
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

गोंधळ , फजिती आणि हशा


गोंधळ , फजिती आणि हशा

सासरी जाण्यासाठी नवी नवरी निघाली . लांबचा प्रवास असल्यामुळे  सासरे निघण्याची घाई करू लागले .  तिने घाईने लहान बहिनीला ,' कुलूप लावून  गाडीत पेटी ठेव' असं सांगितल आणि सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी  निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सासरी पोहचल्यावर तिची पेटी कुठेच दिसेना. आंघोळीचा खोळंबा झाला. पेटी गावातल्याच एका पहुण्याकडे गेली होती. उघडून बघितल्यावर त्यांना कळाले की ही नवरीची पेटी आहे. त्यांनी  पेटी परत आणून दिली तर घरून फोन आला की मावशीच्या पेटीला हीचे कुलूप लावले  असल्यामुळे तिचीही अडचण झाली आहे. बहिणीने  सगळा गोंधळ  घातला होता  .
सासरी मात्र  " अदलाबदली पेटीची .... करवलीनेच केली फजिती नवरीची" असं म्हणून एकच हशा  उसळला.
©️ अंजली मीनानाथ धस्के


Momspresso Marathi वर या वेळेस ' गोंधळ' हा शब्द दिला होता कथा लेखासाठी