चकुल्या

#चकुल्या

नुकतंच लग्न झालेली निशा सासरी आली. शिकलेली,  नोकरी करणारी सून मिळाली खरी पण आपल्या सारखा ' एक नंबर' स्वयंपाक येतो का? याची खात्री करून घ्यायला म्हणून सासूबाईही तिच्या पाककौशल्याची परीक्षा घ्यायला सज्ज झाल्या. माहेरी तिच्या फसलेल्या प्रयोगालाही दाद मिळायची. ती नव्या जोमाने नवीन प्रयोग करायची. तिला स्वयंपाकाची आवड नसली तरी वेगवेगळे पदार्थ ती आवडीने करायची. त्यामुळे आपण हे आव्हान सहज पेलू शकतो असा विश्वास तिच्यात होता.
पहिल्याच दिवशी जेव्हा जेवणाच्या पदार्थांची यादी हातात मिळाली तेव्हा तिला कळालं की हे वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही. तिनेही मग गांगरून न जाता एक एक पदार्थ करायला घेतला . वरण भात भाजी पोळी कोशिंबिर  ..... असं ताट सजलं.  याआधी आईला फक्त मदत व्हावी म्हणून काम करणाऱ्या तिने  आयुष्यात पहिल्यांदाच  पूर्ण स्वयंपाक केला होता . खूप उत्साहात तिने सगळ्यांना ताट वाढली आणि त्यांच्या प्रतिक्रिया टिपून घेवू लागली. अर्थातच तिचा अंदाज चुकला होता. मनासारख्या प्रतिक्रिया तर आल्याचं नाहीत. त्यात भर म्हणजे सासूबाईंनी  आपणच किती चविष्ट जेवण बनवायचो याची सगळ्यांना आठवण करून दिली.  दुसऱ्या दिवशी ही असेच घडले. काही दिवसांनी फरक पडेल या आशेवर ती काम करतच होती . आजही तिला सासूबाईंनी पदार्थांची यादी दिली . तिने त्यांना लगेच विनंती केली की, ती सगळा स्वयंपाक करेल. भाजीची सगळी तयारी ही करेल परंतु भाजीला फोडणी मात्र त्यांनी घालावी म्हणजे तिला सगळ्यांना आवडणारी भाजी कशी असते ते शिकता येईल . तिची ही विनंती , " त्यात काय एवढं ,  कर जसं येतं तसं... मला गॅस जवळ उभ राहिलं की त्रास होतो.  इतकी शिकली आणि साधी फोडणी घालता येत नाही तुला?  कर रोजच्या सारखं .... " असं सांगून धुडकावण्यात  आली. ती हिरमुसली तरी ताटात वरण भात, भाजी , दुधी भोपळ्याचा हलवा, कढी , चपाती , भजे ,तळलेले पापड आणि कोशिंबीर असा बेत वाढला. सासऱ्यांनी दुधी भोपळ्याचा हलवा या आधी कधी खाल्लाच नव्हता त्यामुळे त्यांनी लगेच ," हा काय कचरा केला " अशी भयंकर प्रतिक्रिया दिली. तिने आशेने सासुबाईंकडे बघितले तर त्याही अगदी मख्ख चेहऱ्याने मुलाला म्हणाल्या , " आज काल जेवण घश्याखाली जातच नाही . तसंही वय झाल आता.... आम्हाला खायचं तरी किती असतं? आता खाते दोन घास आणि गप पडून राहते ".  आई वडिलांची प्रतिक्रिया बघून नवराही निशाला चटकन बोलून गेला ," आईला विचारून करायला काय होतं तुला ".
आता मात्र तिचा धीर सुटला ..... चेहऱ्यावर कसं बसं टिकवलेल  हसू गायब झालं....  डोळे पाण्याने डबडबले. ती उठून धावतच बेडरूम कडे गेली. ओक्साबोक्शी रडायला लागली .
इकडे नवर्‍याला नको ते बोलून गेल्याची जाणीव झाली.  त्याला तिच्या मागे जावून तिची समजूत काढायची होती तर सासूबाईंनी," आधी जेवून घे. मी समजावते तिला " असं म्हणून त्याला तिची समजूत काढण्यापासून रोखले.  पोटभर जेवण झाल्यावरच त्या स्वतः तिच्या कडे आल्या. त्यांचा खोटा मायेचा स्पर्श ... खोटी सहनभुती तिला नको होती. त्यात त्या तिला म्हणाल्या , " यात एवढं काय आहे रडण्या सारखं.... उगा भरल्या घरात रडते कशाला ? ". तीही खंबीर पणे उत्तरली, " तुम्हाला शिकवा म्हणूनही तुम्ही तुमची पद्धत शिकवत नाही आणि मी केलेल्या जेवणाने तुमची पोट भरत नाही म्हणून रडते आहे".
तिच्या या उत्तराने त्या चपापल्या ... सारवासारव करत म्हणाल्या, " आमच्या माणसांना काहीही केलं तरी आवडत नाहीच . मलाही असेच बोलतात. माझ्या सासुबाईनी तर माझी परिक्षा घेण्यासाठी काय काय केले होते.  त्या रोज मी केलेल्या स्वयंपाकात तिखट, मीठ असे जास्तीचे काहीतरी मिसळून ठेवायच्या. सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. तुला तर फार काही बोलले नाही कोणी.... गप आता....त्यात एवढं रडण्यासारखं काही नाही " असे म्हणुन निघूनही गेल्या.
        रात्री झोपतांना तो हळूच तिच्या जवळ आला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला," सॉरी  ग .... मला वाटलेच नव्हते की तू माझ्या बोलण्याचे येवढे वाईट वाटून घेशील .... खरंच मनापासून सॉरी . इथून पुढे मी नक्की काळजी घेईल ". तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले पण या वेळेस मात्र त्याने लगेच तिचे ओघळणारे अश्रू पुसून घेतले. तीही मग हळूच त्याच्या मिठीत शिरली.  त्याला जाणवलं की आपण मघाशी जी जखम दिली आहे ती अजून ओली आहे. सांत्वनासाठी त्याला योग्य शब्दांची जुळवाजुळव करणे अवघड वाटल्याने त्याने शांत राहणे पसंद केले. दोघंही कितीतरी वेळ असेच निःशब्द  बसून होते. तिलाही त्याच्या स्पर्शातून अपराधीपणाची भावना जाणवत होती. शेवटी तिनेच पुढाकार घेऊन त्याला सांगितलं की, "लहानपणापासून अन्न हे पूर्णब्रह्म असेच ऐकत आले रे मी .... खारट झालेलं जेवणही माझे बाबा बीन तक्रार जेवायचे. आईने खावू नका म्हणून सांगितल तर ते म्हणायचे ... होत एखाद्या वेळी कमी जास्त चालायचंच.... रोज चवीच खातो मग कधी तरी हेही खायला काय हरकत आहे. अशा वातावणात वाढले मी ... इथे मात्र आमची चव नाही ही ... आमच्या सारखं नाही हे ... हेच ऐकाव लागतंय. शिकावं म्हंटल तर आई शिकवतही नाहीत. आमच्या माणसांना हे आवडतं नाही ... आमच्या माणसांना ते आवडत नाही .... असे मात्र ऐकवत राहतात तेव्हा जाणवत की, त्यांनी अजून मला आपली मानलेच नाही आहे. इतरांच ठीक आहे त्यांना कदाचित माझा स्वीकार करायला वेळ लागेल. पण तूही बोलतोस तेव्हा वाटतं की, आपण इथे आलो कशासाठी? फक्त कामवाल्या बाईसारखे राबायला..... मला पाहिल्या दिवसापासून सगळे परफेक्ट जमावे अशी अपेक्षा चुकीची नाही का? सगळ्याबाबतीत आईंनी असहकार पुकारला असून देखील मी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्याकडेच्या अनेक पद्धती, पदार्थ मला माहीत नसतांनाही मी चांगलेच केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवतांना, तुम्हाला माहित नसलेले जे पदार्थ, पद्धती मला उत्तम येतात त्यांना ' कचरा' म्हणणे योग्य आहे का? स्तुती नका करू पण असही नका बोलू की नवीन काही पदार्थ करण्याची .... स्वयंपाक करण्याची माझी इच्छाच मरून जाईल. एकतर उद्यापासून तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या बनवत जा नाहीतर मी बनविते ते आवडत नसेल  तर नका खावू पण अन्नाला नावं ठेवू नका. मला तुमच्या आवडी निवडी समजायला आणि त्या परफेक्ट जमायला वेळ लागणार ... तोपर्यंत तूम्ही समजून .. सांभाळून घ्यायला हवं."
      तिच्या या बोलण्याने त्यालाही तिच्या दुःखाची तीव्रता जाणवली. लग्नानंतर अचानक होणार्‍या मानसिक, शारीरिक बदलांना सामोरे जातांना ती एकटी पडणार नाही याची काळजी घ्यायचे राहून गेले होते,याचे त्यालाही वाईट वाटले. तिला समजावण्याच्या सुरात तो म्हणाला, " माझ्यात इथून पुढे नक्कीच सुधारणा होईल. मलाही तुला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तूही सांभाळून घे ... आज रडलीस तशी पुन्हा रडू नकोस आणि हो.... मी समजून घेईन याची वाट न बघता  आत्ता जसं मन मोकळं बोलली तसंच बोलत जा ". या घटनेने दोघांना मनानेही खूप जवळ आणलं.
           त्या दिवसानंतर त्याने तर तिला तिच्या स्वयंपकावरून कधी बोल लावला नाहीच पण वडिलांनाही काय सांगितलं कुणास ठाऊक त्यानंतर सासरेबुवांनीही कधी काही तक्रार केली नाही . उलट तिची शिकण्याची इच्छा बघून दोघेही तिला  त्यांना माहीत असलेल्या पद्धती सांगू लागले. तिला थोडं बळ मिळालं.       अचानक एके दिवशी सासूबाईंनी आज रात्रीच्या जेवणाला ' चकुल्या ' कर अशी फर्माईश केली. तिला हे नाव आणि पदार्थ एकदमच नवीन होते. तिने त्यांना सांगितलं की," मला चकुल्या येत नाही पण तुम्ही पद्धत सांगितली तर मी बनवून ठेवेन". त्यावर त्या " फोङणीच्या वरणात कच्च्या चपाट्या छोटे तुकडे करून टाकायच्या" अशी अगदीच मोघम पद्धत सांगून बाहेर निघून गेल्या. तिने कणीक मळली ... डाळ तांदूळाचा कूकर लावला. तेवढ्यात सासरे बाहेरून आले आणि तिला विचारलं," आज काय बेत संध्याकाळचा?" तिने ''चकुल्या '' सांगितल्यावर त्यांची कळी खुलली. ते म्हणाले, "ओल खोबर घातलं तर 'एक नंबर' लागतात चकुल्या". ओल खोबर याबद्दल तर सासूबाईंनी काहीच सांगितल नाही हा विचार मनात येऊन तिने त्यांच्याकडे असं काही बघितलं की त्यांना जाणवलं की, हिला चकुल्या येत नाहीत. त्यांनी लगेच , " ओला नारळ नसेल न घरात ..... थांब मी घेवून येतो ... आमच्या हिलाही बोलावून आणतो ती तुला चकुल्या शिकवेल . तू काळजी करू नकोस काही" असं सांगून काढता पाय घेतला. इकडे निशाला आनंद झाला की, आज  काही झालं तरी आपल्याला सासूबाईंच्या हाताच्या 'एक नंबर' चकुल्या शिकायला आणि खायला मिळणार.
        थोड्याच वेळात सासरे एकटेच ओला नारळ घेवून परत आले आणि म्हणाले," तिने तुला कसं करायचं हे सांगितलं आहे ना तसच कर .. फार काही अवघड नसतं". आता मात्र तिला सासूबाईंनी सांगितलेली पद्धत करून बघावी असं वाटेना. हा प्रयोग नक्की फसणार असं वाटून तिने सासऱ्यांना माहीत असलेली पद्धत विचारली तसे ते स्वतः स्वयंपाक खोलीत उभे राहून तिला मदत करू लागले. त्यांनी सांगावं आणि हिने करावं यातून चकुल्या तयार होवू लागल्या. तेवढ्यात तोही घरी आला. खमंग सुवासाने त्याची भूकही खवळली. हात पाय धुवून आल्यावर तोही मग ताट वाढण्याच्या तयारीत तिला मदत करू लागला.
सगळे जेवायला बसले. आज तीही त्यांच्या सोबतच जेवायला बसली. सगळे निमूट जेवत होते. तिचे लक्ष त्याच्याकडे गेले त्याने इशाऱ्यानेच ' चांगल्या झाल्यात ' असं सांगितलं.
     कोणीच काही बोलत नाही म्हंटल्यावर सासूबाईं सासऱ्यांना उद्देशून म्हणाल्या , " आपल्यासारख्या झाल्या नाहीतच .... नुसतं खोबरं लागतंय  ... होय ना ". त्यावर आपण काय बोलावं? सासूला राग आला तर? असा विचार करून  मग तेही म्हणाले , " हो तर... तुझ्या हातच्या चकुल्या एक नंबरच होतात पण मलाही नीट माहीत नाही तू कशा करते ..... मी जे सांगितलं ते तिने केलं .... पुढच्या वेळेस तूच करून दाखव तिला म्हणजे काही प्रश्नच येणार नाही ". आता बोलण्यात काही अर्थ नाही हे उमगुन मग सासूबाईंनीही विषय वाढवला नाही.

तिनेही लगेच सासऱ्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि म्हणाली , "आई तुमच्यासारख्या तर जमणारच नाहीत मला कधी ... मी फार कच्ची आहे स्वयंपाकात. पुढच्या वेळेस तुम्हीच करा ह .... म्हणजे 'एक नंबर' चव काय असते मलाही शिकता आणि चाखता येईल ". आता हे स्वयंपाकाचं काम परत  आपल्याच गळ्यात  पडतंय की काय या भीतीने त्या पटकन् बोलून गेल्या ," आमच्या माणसांचं काय घेते मनावर .... ते कशाला पण 'एक नंबर' म्हणतात . बऱ्या आहेत या चकुल्याही ....  तसेही आता खायचे कितीअसते आम्हाला".
             खरे तर तिच्या आजे सासूबाई चकुल्यात ओले खोबरे घालायच्या, सासुबाई मात्र मुद्दाम ओले खोबरे घालणे टाळायच्या, हे तिला थोड्या वेळा पूर्वीच सासरेबुवांनी सांगितले होते. निशाला मुळात नंबरसाठीची जीवघेणी स्पर्धा कधीच,  कोणत्याही  क्षेत्रात आवडतं नव्हती ..... पण सासूबाईंना मात्र तेव्हाही आणि आताही त्यांचा ' एक नंबर ' टिकून ठेवायचा होता. आतापर्यंत  त्यांच्या या स्वभावाची ती बळी ठरत होती. चकुल्याच्या निमित्ताने तिनेच स्वत:ला समजावलं की ,' एक नंबर ' चे  दावेदार  आपण कधीच  नव्हतो. मग ही मर मर कशाला? मुळात आपल्याला स्पर्धाच आवडत नसतांनाही 'एक नंबर' मिळवण्यासाठीची नकळत चाललेली आपली ही धडपड कशासाठी? आपल्याला हवं असलेलं कौतुक मिळवण्याची ही ओढ कसली? हवं असलेलं कौतुक मिळत नाही म्हंटल्यावर ..... ते मिळायलाच हवं हा अट्टहास का? आपला आनंद हिरावून घेवून जर कौतुक मिळणार असेल तर ते हवंय कशाला? आपल्यालाही आणि समोरच्यालाही 'जे जसं आहे तसं स्वीकारण्याची' गरज आहे. योग्य वेळी योग्य शब्दात समोरच्यालाही आपल्या मर्यादांची जाणीव करून द्यायला हवी आहे. ' मला सध्या तरी एवढंच  जमतं ' हे खुल्या मनाने कबुल करून, इतरांच्या आणि स्वतःच्याही  अपेक्षा वाढवत जावू नये.  स्वतःच्या अपेक्षांची पूर्ती स्वतः करून घेण्याची तयारी ठेवावी. इतरांना  याची समजही देता यायला हवी. याच विचार मंथनातून तिच्या पुरता तरी हा ' एक नंबर ' तिने आयुष्यातून कायमचा हद्द पार केला .
          निशाने पहिला घास तोंडात टाकला आणि का कोणास ठाऊक तिला या चकुल्याची चव खूप आवडली. तिच्या माहेरी केला जाणारा वरणफळ हा पदार्थ तिला माहिती  होता. त्याचेच हे चमचमीत मसालेदार तिखट रूप आज पहिल्यांदाच ती  चाखत होती. आज पहिल्यांदाच स्वतःच्या हक्काच्या घरात पोट भर जेवत होती. त्या दिवशी तिला एवढं मात्र कळलं होत की, 'एक नंबर 'अशी कोणतीच स्वयंपाकाची पद्धत नाही.... की...  चवही नाही आणि असलीच तरी ती आपल्याला चाखायला कधीच मिळणार नाही. तेव्हा आपण प्रेमाने करू आणि आनंदाने खावू तोच पदार्थ आणि त्याचीच चव 'एक नंबर' असेल. 'एक नंबर' अशा फसव्या  संकल्पनेच्या मागे लागून जीवनातला  लाख मोलाचा आनंद गमावून चालणार नाही. कारण कोणतंही काम करतांना जर आपल्याला स्वतःला ते काम करण्यात आनंद मिळत नसेल तर मिळणारा नंबर हा फक्त नंबरच राहतो.
                  आजही ती जे बनवते ते तिच्या आवडीने  आणि आनंदाने. तिच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा तिच्या पाककलेचं कौतुक करतो. सासरचे बरेच पदार्थ ती नंतर शिकली पण 'चकुल्या' विषयी तिच्या मनात असलेलं प्रेम आजही अगदी तसचं आहे. आजही नवरा कधी कधी चकुल्या खातांना कौतुकाने " एक नंबर  झाल्या चकुल्या" असं म्हणतो . तेव्हा सासऱ्यांनी शिकवलेल्या या चकुल्या आपल्याला  बरंच काही शिकवून गेल्या.  तेव्हाच आपल्यातील सुरवंटाचे  फुलपाखरू बनण्याचा हा सुंदर प्रवास सुरू झाला होता.  याची आठवण होवून तीही मग गालातल्या गालात हसते.

©️ अंजली मीनानाथ  धस्के




होळी / रंगपंचमी (२०१९)

होळी / रंगपंचमी (२०१९)
आपल्यातल्या प्रत्येकीने असाच , ' स्वतः चा वेगळा रंग जपायला हवा ' . इतरांच्या रंगात रंगून जातांना स्वतः चा रंग मात्र टिकून ठेवायला हवा.
आजची रांगोळी 
रंगात रंगूनी साऱ्या ..... रंग माझा वेगळा 
रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.......


रंग माझा वेगळा

#रंग_माझा_वेगळा              
          पाच बहिणींमधे शामल सगळ्यात मोठी . कष्टाची सवय अगदी लहानपणा पासूनच लागलेली . मुलाच्या हव्यासापोटी पाच मुलींना जन्म देवून नाजूक तब्येत झालेली  आई आणि इतकं करून  ही मुलगा झाला नाहीच म्हणून त्यांना सोडून गेलेला बाप . नवरा सोडून गेल्याचं दुःख इतकं होत की शामलची आई अधिकच आजारी राहू लागली. त्यामुळे  लहान बहिणींचे सगळे करायची जबाबदारी शामलवरच आली. तिनेही ती आनंदाने घेतली .  अभ्यासात हुशार असूनही शिक्षण अपूर्ण सोडून भारती बजारमधे वाजनाप्रमाणे सामान भरण्याची  नोकरी स्विकारली. घरचे सगळे करून कामावर जायची . आल्यावर राहिलेली काम करत लहान बहिणींचा अभ्यास घ्यायची . शामलपेक्षा कोमल दोनच वर्षांनी लहान म्हणून तिलाही कामाला लावावं असं आईचं मत होतं पण शामलने हट्ट करून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तिला शिकू द्यावं असं आईकडून  कबुल करून घेतलं. त्यामुळेच की काय पण आईपेक्षा शामलवरच बहिणींची माया अधिक होती.
         खर्च वाढले तसे शामलने इतरही कामे घेतली . आई सारखी आजारी असली तरी पोरींचे उसवलेले कपडे छान शिवायची . कुठे बारीक छिद्र असेल तर ते सुंदर फुलाचा टाका घालून बंद करायची . मुलींनी फाटके कपडे घालू नये असंच तिला  वाटायचं पण बँकेत जमा रक्कम फार थोडी त्याच व्याज कमी येत होतं.  त्यात शामलचा पगार ही फार नव्हता.   कोमल, काजल, पायल आणि सैजल सगळ्याच शाळेत जाणाऱ्या . पैसे पुरायचे नाही.  शामलला काही तरी मदत करावी असं प्रत्येकीला वाटायचं . तेव्हा आईचं सुई दोऱ्यावरचं प्रेम बघून शामलने गल्लीतल्याच ' लेडी मुड ' या बुटिकचे मालक असलेल्या सय्यदचाचा कडून आईला काम मिळवून दिलं. घराबाहेर न जाताही आवडीच काम मिळालं त्यामुळे आई खुश होती. पैसे कमी मिळत होते पण वेळ छान  जावू लागला .
     शामालची धडपड बघून घरच्या कामात बहिणी तिला मदत करायच्या. आईलाही आता असं कामात बघून चौघींनी शामलकडे,' आम्हालाही काही तरी काम मिळवून दे ', असा हट्ट धरला. शामल मात्र त्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे याच मताची होती.
                    वर्षा मागून वर्षे जात होती. दिवसामागून दिवस जात होते. खर्च वाढतच होता. शिल्लक काहीच उरत नव्हते. प्लास्टिक बंदी आली तेव्हा सय्यद चाचाने पेपरच्या पिशव्या  बनवून देण्याची विनंती केली.  तेव्हा चौघींनी घरीच पेपरच्या पिशव्या बनवण्याचे काम सुरू केले. त्या नुसत्या पिशव्याच बनवायच्या नाही तर त्यावर ' लेडी मुड ' हे नाव ही सुंदर अक्षरात काढून द्यायच्या . त्यांची मेहनत आणि कामाचा दर्जा बघून  सय्यद चाचाने अजून इतर दुकानदारांचे कामही मिळवून दिले. त्या आळीपाळीने अभ्यास आणि काम करत त्यामुळे शामलची काही तक्रार नव्हती.
       आता काही पैसे शिल्लक राहत होते. पोरींची जिद्द .... हुशारी बघून  शामलच्या आईला वाटू लागलं की पोरींनी शिकून नोकरी करावी . आपल्यासारखी वेळ त्यांच्यावर येवू नये . तिला जणू  जगण्याचा उद्देश मिळाला . हातात काम होतंच . तिच्या कामातली तिची सफाई बघून आजूबाजूच्या बायका तीच कौतुक करायच्या . तिलाही मग हुरूप यायचा.
आपणही काही तरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याची जाणीव होवून तिचं आजारपण ही कमी झालं.
           शामालचा  प्रामाणिकपणा.... परिस्थिती समोर न झुकता संघर्ष करण्याची वृत्ती .... जबाबदारी स्विकारण्याची सवय....अपार कष्ट करण्याची तयारी.... शिक्षणाबद्दलची आस्था  आणि कुटुंबावर असलेलं प्रेम हे गुण बघून भारती बजारमधे सुपर वायिझरची बढती मिळाली .
आता त्यांच्या आयुष्याला थैर्य प्राप्त झाले होते.
       कोमलने एम. कॉम पूर्ण करून  एका छोट्या फर्मवर नोकरीही मिळवली. काजलने एम. ए. करत करत कोचिंग क्लास वर शिकवण्याचे काम सुरू केले.
पायल बी. फार्मसी.  आणि सैजल १२ वी करत होती .
       आता शामलने लग्न करायला काहीच हरकत नाही. असं आईला वाटायचं पण ती काही मनावर घेत नव्हती. अशातच कोमलला तिच्या ऑफिसमधे काम करणाऱ्या एका सहकारी मित्रा बरोबर फिरतांना शामालने पहिले. त्याला घरी बोलावून त्यांचा विचार घेतला. दोघांनाही लग्न करायचे होते पण मोठी बहीण घरात असतांना लहान बहिणीचे लग्न कसे होणार म्हणून दोघंही गप्पच होती. आईने खूप चिडचिड केली पण शामलने त्यांचे लग्न लावून दिले. कोमल तिच्या संसारात रमली. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत काजलनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शामललाही बरीच स्थळ सांगून येत होती पण तिची अट ऐकुन नकार कळवत होती.
      आई चिडून म्हणायची , " ' आईला शेवटपर्यंत सांभाळण्याची तयारी असणाऱ्याशीच लग्न करायचं ' ही काय अट झाली? अग मी ज्याच्याशी लग्न केलं होतं तो तर पाच पोरी देवून पळून गेला . तू का स्वतःच नुकसान करून घेते? कोमल ... काजल सारखं लग्न करून मोकळी हो . आमचं आम्ही बघून घेवू " .
शामल मात्र ठाम होती. आईचा लग्न कर ..  लग्न कर चा तगादा ऐकून त्रासून गेली होती. तिचा उदासवाना चेहरा बघून भारती बजार मधल्या विशालने तिला " आता वेळ आहे तुझ्याकडे तर पुढचे शिक्षण पूर्ण का करत नाहीस ? तुझं मन गुंतून राहिलं." असं सुचवलं . तिलाही ते पटलं .
आता पायलनेही तिच्याच कॉलेज मधल्या एका मुलाशी लग्न करून सुखी होण्याचा निर्णय घेतला.
सैजलला डॉक्टर व्हायचे असल्याने तिने एक वर्ष पूर्णपणे स्वत:ला  अभ्यासात  बुडवून घेतले . अभ्यासात ती हुशार होतीच....तिला एम. बी. बी. एस ला प्रवेश तर मिळालाच पण तिने शिष्यवृत्ती ही मिळवली.  ती हॉस्टेल वर रहायला गेली.   घरात आता शामल आणि आई अशा दोघीच राहिल्या. शामालच ही शिक्षण सुरू होते.
   आता आईला वाटायचं , ' देवाने मुलगा दिला नाही बरच झालं कारण  मुला पेक्षाही जास्त कर्तबगार ... सतत आपला विचार करणारी मुलगी मात्र दिली '.
सैजल डॉक्टर झाली . तिने पुढे एम. डी. ही पूर्ण केल. तिच्याच शिक्षकांनी आपल्या डॉक्टर मुलासाठी तिला मागणी घातली. शामलने तिचेही लग्न लावून दिले.
शामलने  आता भारती बजारची नोकरी सोडून दिली होती. मॉडर्न शिक्षण संस्थेच्या कॉलेजवर समुपदेशकाच काम तिने स्विकारलं होत. आपल्या सारखे परिस्थितीमुळे शिक्षण सोडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ती शिक्षण सुरू ठेवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देत होती.
एक दिवस कामावरून घरी आली असतांना तिला दारात खूप चपला दिसल्या , घरातून हसण्याचे आवाज ऐकू आले. ती धावतच बहिणींना भेटण्यासाठी आत आली . बघते तर काय ... बहिणी आलेल्या   होत्याच पण सोबत विशाल आणि त्याचे आईबाबाही  आले होते. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर सगळे एकमेकांना खाणाखुणा करून मूळ मुद्याच कस बोलायचं असे विचारू लागले.  मग विशालची आईच म्हणाली, " तुझ्यासाठीच विशाल इतके दिवस बीनलग्नाचा थांबला आहे .आम्हाला तुझी अट मान्य आहे. तुला मुलगा पसंत असेल तर  आजच सगळी बोलणी ठरवून टाकू आणि पसंत नसेल तरीही आमची काहीच हरकत नाही ."
त्यांच्या अशा बोलण्याने शामल पुरती गांगरली ... लाजून तिचा चेहरा लाल झाला . ती पटकन उठून आतल्या खोलीत आली.
 झरझर जुने दिवस तिच्याडोळ्यापुढे आले. तिलाही विशाल आवडायचा . कुठलाही लाळघोटेपणा नाही की वागण्यात कधी खोटेपणा  नाही . सतत कामात बुडालेला .... नवीन नवीन मार्केटिंग टेक्निक शिकून घेणारा... तरी संयमित स्वभाव ... इतरांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती तिला खूप भावली होती . तरीही तिने कधी त्याला तसं जाणवू दिलं नव्हतं. पुढे त्याने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला . मध्यंतरी ही भेटी झाल्या तेव्हा त्यानेही काही जाणवू दिले नाही . आज अचानक असा समोर आला तेही मागणी घालायला ... या विचारात ती गढून गेली होती तेवढ्यात विशालच्या बाबांचे शब्द कानी पडले , " आमचा विशाल खूप कमावतो .... शामलला आता नोकरी करायची ही गरज नाही ".
ते ऐकून तिच्या काळजात कळ उठली. ती लगेच बाहेर आली आणि म्हणाली , "बाबा आता तर कुठे  मी  पैश्यासाठी नोकरी करत नाही. आता तर कुठे मला माझी ओळख मिळाली आहे . आता तर कुठे मी माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. .... आता तर कुठे मी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली आहे.   तेव्हा आता ही नोकरी सोडणे मला जमणार नाही". सगळे तिच्या या स्पष्ट बोलण्याने चकित झाले . परंतु
विशालच्या आईने  तिला मिठीच मारली. " कोणीही तुला तिच्या तुझ्या  मना विरूद्ध काही करायला सांगणार नाही " ,  असं वचन दिलं आणि चटकन् तिच्या हातात स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या सरकवल्या. उशीरा का होईना पण आता तिच्या आयुष्यात ही प्रेम च प्रेम आलं होतं.
लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली . तिच्या चांगल्या गुणांनी  घरतल्या सगळ्यांची  ती लाडकी झालीच आहे पण एका गोंडस मुलीची आई देखील ती झाली.
तिने विशालच्या मदतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणून "  कमवा आणि शिका "  योजना सुरू केली. अनेक दिशा हीन विद्यार्थ्यांना तिने शिक्षणाचा मार्ग दाखवला . अनेक   लघु उद्योगांचे प्रशिक्षण  देणारी संस्था ही स्थापन केली ज्यामुळे गरजू स्त्रियांनाही प्रशिक्षण घेवून  स्वतःच्या पायावर उभे राहता आले.
सासूला तर सुनेचे फार कौतुक.... त्या अभिमानाने नेहमी म्हणायच्या ," आमच्या विशालची निवड एकदम योग्य आहे". सगळं घर तिने बांधून ठेवलं होतं . आईची काळजी घ्यायलाही ती कधीच विसरत नव्हती.
मुलगी , बहीण, सून , बायको आई अशा कौटुंबिक तर  सहकारी , समुपदेशिका, मार्गदर्शिका  अशा सामाजिक भूमिकेत ती जीव ओतून काम करत होती. अनेक महींलासाठी ती प्रेरणा ठरत होती. त्याचाच परिणाम म्हणून तिला सखी मंच ने, " रंग माझा वेगळा " हा पुरस्कार देवून सन्मानित केलं.
तिने या पुरस्काराचं श्रेय विशालला दिलं कारण त्याचं  तिच्या सोबत असणं .... त्याने सतत तिला ' स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी ' यासाठी प्रोत्साहन देणं यामुळेच ती इथपर्यंत पोहचू शकली. तिच्या या यशात  कुटुंबांतील प्रत्येक जण सहभागी होता. त्यांच्या सहकार्याने.... प्रेमाने ती मनासारखं काम करू शकली.
संकटही खूप आली पण तिचा निर्धार ठाम होता.जीवनाचे उतार चढाव.... सुख दुःख... चांगले वाईट अनुभव... कधी रडणे तर कधी हसणे ... मैत्री प्रेम ... एकाकीपणा.... भावनांचा ओलावा ....   असे सगळे रंग तिने अनुभवले तरी तिचा रंग मात्र वेगळाच होता . या सगळ्यात उठून दिसणारा.   तिच प्रभावी व्यक्तिमत्व  , ' रंगात रंगूनी साऱ्या .... रंग माझा वेगळा ' याची खऱ्या अर्थाने जाणीव करून देणार होतं.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( प्रत्येकीला या रांगोळीत  स्वतःलाच पाहण्याचा आणि " रंगात रंगून साऱ्या .... रंग माझा वेगळा"  असा म्हणण्याचा मोह आवरनार नाही हे नक्की . )



टिपः
आपल्यातल्या प्रत्येकीने असाच , ' स्वतः चा वेगळा रंग जपायला हवा ' . इतरांच्या रंगात रंगून जातांना स्वतः चा रंग मात्र टिकून ठेवायला हवा.
मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

  

मुलांची उत्सुकता आणि गूगल

#मुलांची_उत्सुकता_आणि_गूगल

        निशा कुंड्याची मशागत करत होती . तेवढ्यात दारावरची घंटा वाजली . तिने दरवाजा उघडला तसा घाईघाईने साहील आत आला . पाणी पिवून परत खेळायला जायचा त्याचा बेत होता . त्याची घाई ... खेळून घामजलेला चेहरा बघून ... निशा  म्हणाली , " अरे हळू जरा एवढी घाई कसली करतोस .... कोणी जात नाही निघून ... सुट्टी आहे आज... तर सगळे थांबतीलच ". त्यावर सहिल म्हणाला , " सगळे थांबलेच आहेत ग .... मोबाईल वर सर्च बफर होतंय तेवढ्या वेळात मी घरी आलो " .
        निशाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . नक्की कसला शोध घेतला जातोय मोबाईल वर ? वय जेमतेम १२ ..१३ नाही तर मोबाईल दिला कोणी यांना ? असे प्रश्न मनात आले . तिने लगेच विचारलं काय शोधता रे मोबाईल वर ? त्याने अगदी सहज सांगितलं, " अग कंडोम म्हणजे काय ? याचा शोध घेत आहेत सगळी मिळून " . तो पायात चप्पल सरकवून जायला निघाला तसा काळजीने  तिने त्याचा हात पकडला. "अरे चॉकलेट घेवून जा सगळ्यांना " असं बोलून त्याला थांबवलं . खरं तर तिला वेळ हवा होता . त्याला  काय आणि कसं समजावून सांगावं  याचा विचार करतच तिने चॉकलेट हातात घेतले.  वेळ गमावून चालणार नव्हतं .... जे काही करायचं ते अगदी सहज ... त्याला कुठलीही शंका न येता करणं गरजेचं होतं.
                  त्याच्या हातात चॉकलेट देत ती त्याला म्हणाली, " त्यात मोबाईल वर काय शोधायचं ... मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की तुला " . त्यावर तो म्हणाला , " तुला माहित आहे त्याचा अर्थ ? .... काय असतं ग ते ? " त्यावर ती म्हणाली, " माहित आहे ना पण त्यासाठी तुला आधी  घरात यावं लागेल ... जरा शांत बसाव लागेल ... तरच सांगू शकते ... घाईत कसं सांगू ? " त्यावर तो लगेच सोफ्यावर येवुन बसला . याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा तीव्र आहे . आधी काहीतरी नक्कीच कळलं आहे . आपल्याकडून त्याची खात्री फक्त करून घेतली जाणार . असा तिने अंदाज बांधला.
      " सांग आता ... बसलो मी शांत " असं तो बोलला तशी ती भानावर आली आणि म्हणाली , " आधी मला सांग हा शब्द कसा माहित झाला तुम्हाला ? " त्यावर तो लगेच उत्तरला ," अग आम्ही मागच्या पटांगणात खेळत होतो तर समीरला ' ते ' सापडलं त्याने ' ते ' काडीला अडकवलं आणि आमच्या कडे घेवून आला. तशी सगळी पोरं शी sss घाण असं करत पळू लागली.  आतिश म्हणाला की ते ," कंडोम आहे " फेक तिकडे . तर महेश म्हणाला हो हे कंडोमच आहे . आमच्या घरी याच पॅक बघितलं आहे मी . तसा आरव म्हणाला , " काही काय .... ते गर्ल्सच्या बॉडी पार्ट शी संबंधित काहीतरी खूप घाण असतं  . कोणी बघितलं तर ओरडतील आपल्याला ."
       नक्की काय असतं यात चर्चा सुरू झाली आणि मग गूगल वर सर्च करुन शोधायचं ठरल आमचं.    दर्शन म्हणतो की गूगल वर सर्च केलं की कळतं सगळं .
            नीशाच्या पायाखालची जमीन सरकली.  तिने सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला, "  तू हा शोध सोडून  कसा काय घरी आलास?  "  असं विचारलं तर तो म्हणाला , " अग किती वेळ झाला ते बफर च होतंय ? स्पेलिंग चुकलं की अजुन काय ? त्यांचे वाद सुरू आहे.  मला आला कंटाळा , तहान ही लागली होती म्हणून मग अलो घरी " .
     त्यावर ती लगेच म्हणाली , " बरं झालं घरी आलास ... गूगल वर असलेली सगळीच माहिती  १०० टक्के खरी नसते. " तसं तो आठवून म्हणाला , " हो ना ... पप्पाही हेच म्हणतात ... गूगल वर सगळंच १०० टक्के परफेक्ट नसतं काही.... परवाच काकाकडे जातांना  गूगल मॅप लावला होता , त्यावर टर्न लेफ्ट दाखवत होतं पण लेफ्ट ला तर रस्ताच नव्हता. शेवटी आम्ही लोकांना विचारत विचारत गेलो . जावू दे ...  आता तू सांग ना लवकर  ' ते ' नक्की काय असतं? " .
             तिने शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाली , " काही नाही रे ... मेडिकल  सायन्स ने लावलेला  तो एक चांगला शोध  आहे " . त्याने लगेच विचारलं, " मग सगळे शी sss घाण का करत होते? "  तिने समजावून सांगायला सुरुवात केली , " अरे अर्धवट माहिती असली की असेच वागतात लोक . त्याला  शी sss  घाण म्हणतात कारण त्यांना तसचं सांगितल्या गेलेलं असतं . मुळात त्यात घाण असं काही नाही आणि ते फक्त मुलींच्या  बॉडी पार्टशी संबंधित नाही तर  मुलांच्या  शरीराशी ही संबंधित आहे .  एक असा शोध जो दोघांनाही अनेक घातक आजारांपासून वाचवतो .  असे काही आजार आहेत ज्यांचा इलाज करणे अती कठीण कधी कधी तर त्या आजाराने जीव ही गमवावा लागतो. मग असे आजार होवूच नये म्हणून काळजी घेतलेली कधीही चांगली . तेव्हा आपल्याला हे साधन  त्या आजारापासून  दूर राहण्यासाठी उपयोगी पडते. हे साधन  वापरून झाल्यावर इतरांनी त्याला हाताळले तर त्यापासून इतरांना संसर्ग होवू शकतो . म्हणून त्याची विल्हेवाट काळजीपूर्वक करावी लागते. पण चुकून तुम्हाला ते असे कुठे सापडले तर त्यापासून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून त्याला हात मात्र लावायचा नाही. बस एवढंच .... बाकी त्यात घाण शी sss असं काही नाही ".
             साहिलने लगेच शंका बोलून दाखवली  " आरव  का म्हणाला की घरचे ओरडतील  आणि सचिन ही म्हणाला की ,  'आपण गूगल वर काय  शोधतो हे घरी  सांगायचं नाही... नाही तर घरचे मरतील आपल्याला ' पण  तू तर माझ्यावर चिडली नाहीस . उलट त्याचा अर्थ सांगायला तयार झालीस  "  असं का ?? "
          आता तिने त्यालाच प्रश्न विचारला " मला सांग , कार कशी चालवायची? हे  तुला गूगल वर शोधून  माहिती झालं आणि आम्हाला न सांगता तू ती चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल?" तो म्हणाला , " मला कार नीट चालवता येणार नाही ". तिने पुन्हा विचारले , " का  चालवता येणार नाही? गूगलवर तर सगळी माहिती  आहे न ".
तो म्हणाला , " गूगलवर माहिती आहे ... तरी मी अजुन तितका मोठा झालो नाही ना... माझे पाय ब्रेक आणि  अॅक्सिलेटर पर्यंत नीट पोहचत नाही . ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर माझी उंची कमी पडते . मला समोरचा रस्ता ही नीट दिसत नाही. अशी कार चालवायला गेलो तर माझा अॅक्सिडेंट होईल ना. "
         ती लगेच समजावणीच्या सुरात म्हणाली, " अगदी बरोबर .... कोणतीही गोष्ट  करण्याआधी ते करण्यासाठीच   योग्य  वय लागतं . घरच्यांना न सांगता ...वेळेआधी काही करायला गेलात .... तर तुमचंच जास्त नुकसान होणार आहे. मग काही पालकांना वाटतं की योग्य वेळेआधी आपल्या मुलाला काही  माहिती होवू नये .... कारण ती माहिती मिळाली तर मुलं उत्सुकतेने काहीही प्रयोग करून स्वतःला इजा करुन घेवू शकतात. लहान वयात  चुकीची  माहिती  मिळाली ...... किंवा  योग्य वया आधीच नको ती माहिती मिळाली   तर त्याचे वाईट परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात.   मग यावर सोपा उपाय म्हणून काही पालक आपल्या मुलांनी त्यांच्या वयाला योग्य नसतील अशा गोष्टींबद्दल  विचारलं की लगेच चिडतात ... रागावतात. त्यात त्यांचा आपल्या मुलाचे संरक्षण करणे हाच हेतू असतो. माझा ही अगदी तोच हेतू आहे . तुला चुकीची आणि अर्धवट माहिती  तुझ्या मित्रांनी दिली  . त्या माहितीचा  तुझ्यावर वाईट  परिणाम होवू नये .  तुला तुझ्या वयाला योग्य अशा भाषेत सगळं समजावून सांगावं '  असं मी ठरवलं म्हणून तुझ्या या प्रश्नांवर  मी चिडले नाही . या पुढेही तुला काहीही विचारायचं असेल तर तू मलाच येवुन विचार .. उगाच गूगलवर शोधण्याचा प्रयत्न करू नको. आम्ही तुझी जी काळजी घेवू ती काळजी गूगल घेणार आहे का? " या तिच्या प्रश्नावर त्याने लगेच तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकून लाडात येऊन समजूतदार पणाचा आव आणून....  निखळ हसत तिलाच समजावलं
, " अग गूगल काळजी घेत नाही ... फक्त माहिती देतं. काळजी घ्यायला तू आहेस न.... आय लव्ह यू मम्मा.  चल मी जावून त्यांना  चॉकलेट देवून येतो आणि सांगतोही की ते काही शी ss घाण नसतं म्हणून ".  तीही त्याला हसत म्हणाली , "लवकर ये रे ... जास्त उशीर करू नको  " पण  मनातल्या काळजीने अनेक प्रश्न निर्माण केले .
         आता अजुन काय माहिती घेवून येणार आहे हा ? या   विचारानेच तिला धस्स झालं.   इंटरनेटच्या विळख्यात  तरुण पिढी तर सापडलीच आहे पण आता या लहानग्यांना त्यापासून कसं दूर ठेवता येईल ? साधन वाईट नसतंच ... पण त्याचा योग्य वापर  कळण्याइतपत ही मुलं मोठी झालेली नसतांना त्यांच्या हाती स्मार्ट फोन देणं कितपत योग्य आहे?? फोन दिला नाही तरी टीव्ही वर जाहिरातींचा मारा होतोच आहे . या चिमुकल्यांपासून काय काय आणि कसं कसं लपवणार ??  गूगल फक्त माहिती देतं .... पण आपल्या मुलांच्या बाल मनाची काळजी कोण घेणार ??? असे अनेक प्रश्नांची ती उत्तरं शोधत होती आणि तिला जाणवलं की कुंडीतल्या झाडांना कीड लागू नये म्हणून फवारणी करावी लागते  ... तशीच मुलांच्या मनात वाईट विचार येवू नये म्हणून वेळोवेळी चांगल्या विचारांची पेरणी करावी लागते..... जशी  झाडांची वाढ योग्य प्रमाणात व्हावी म्हणून माती उकरावी लागते ... खत घालावं लागतं... अगदी तसचं मुलांशी मोकळा संवाद साधत ... सकारात्मक दृष्टिकोनातून ज्ञानाची भंडारे खुली केली पाहिजेत...  कधी कधी झाडांच्या नको तितक्या वाढलेल्या फांद्या छाटून त्याला योग्य आकार देतो ... तसेच मुलांच्या बुध्दीला वाईट वळण लागू नये म्हणून थोडा धाक .. थोडी शिस्त जोपासत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा लागतो..  झाडांना  योग्य प्रमाणात उन आणि पाणी उपलब्ध करावं लागतं ... . अगदी तसचं आपल्या मुलांच्या बाबतीत ही सभोवतालच्या वातावरणातील बदल स्वीकारतांना ... त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊनच ते स्विकारले पाहिजे ... त्यांना योग्य ती साधन सुविधा उपलब्ध करून देतांना त्यावर आपले नियंत्रण  तर  हवेच पण त्याचा गैर वापर होवू नये याबाबत आपण सतर्क ही राहायला हवे आणि  हे सगळं पालक म्हणून  आपल्यालाच करावं लागणार आहे. तेव्हाच ते योग्य व्यक्ती म्हणून वाढीस लागतील.
               अशा विचारात ती गढून गेलेली असतांनाच साहिल परत आला आणि त्याने आनंदात तिला सांगितलं  , " अग त्याचं नेट पॅक संपल होतं . म्हणून त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. बरं झालं तू मला सगळं सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं तर मलाच सगळी चिडवायला लागली .  तू सांगितलं आहे म्हंटल्यावर सगळी गप्पच बसली   " .
          हे ऐकुन  तिचा जीव भांड्यात पडला आणि  पुन्हा नव्या जोमाने ती बाग कामाला लागली.
     
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. नावासहित शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.

  टिपः   मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . 
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com


पिक्चर परफेक्ट

#पिक्चर_परफेक्ट
            अवंतिका आणि राहुल अगदी समाधानी कुटुंब होते. आठवडाभर अवंतिका दोन मुलींच्या संगोपनात तर राहुल कामात व्यस्त असे. सुट्टीच्या दिवशी मात्र राहुल  अवंतिकाला घरकामात खूप मदत करत असे.  अवंतिका मुद्दामहून राहुल आणि मुलींच्या आवडीचे पदार्थ करत असे. निवांत वेळेत मग गप्पा रंगांत येत. अवंतिका राहुलला आठवड्याभरात काय झाले ते सगळे  सांगायची. तिच्या बडबडीने, मुलींच्या दंग्याने राहुलला घर कसे भरल्या सारखे वाटायचे . मुली अजून लहान होत्या म्हणून ते सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे टाळायचे. दोघे मिळून मुलींच्या सहवासात सगळा दिवस मजेत घालवायचे.  संसाराच्या कुरबुरी सगळ्यांना सारख्याच असतात पण  ती दोघं मिळून सामंजस्याने प्रश्न सोडवत.
           मुली  थोड्या मोठ्या झाल्या, तसा अवंतिकाला जरा मोकळा वेळ मिळू लागला. 'सगळेच कामात व्यस्त आपणच तेवढ्या रिकाम्या असतो' असा विचार मनात येऊ लागला. पार्ट टाईम काम करावं तर मना सारखं काम मिळेना. तिची नवीन गोष्टी शिकण्याची आवड लक्षात घेऊन राहुलने तिला इंटरनेट वापरायला शिकवले. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक अकाऊंट काढून दिले. यामुळे जुन्या मैत्रिणी भेटतील. तिचा वेळ मजेत जाईल. तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बऱ्याच ऑनलाईन संधी उपलब्ध होत्या. त्यासाठीही या सगळ्याचा तिला फायदा होईल, असे राहुलला वाटले होते. पण झाले उलटे, सुरवातीला या सगळ्यांमुळे अवंतिका खुशीत होती. हळूहळू मात्र तिची चिडचिड व्हायला लागली. आपल्या बरोबरीचे सगळेच लोक पुढे गेलेत. त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. येवढ्या व्यस्ततेतही ते सगळे लहान मुलांना घेवून दर सुट्टीला बाहेर पडतात. सुंदर फोटो काढतात. सगळी कशी सुखी कुटुंब आहेत. दुःख, समस्या त्यांच्या वाट्याला जणू नाहीतच. आपण मात्र सदैव घरकामात बुडालेल्या असतो. नोकरीसाठी मनासारखं काम मिळत नाही. काल परवा तर सगळ्या मैत्रिणींचे स्वतःचे सध्याचे फोटो ग्रुपवर टाकायचे ठरले. किती छान फोटो होते सगळ्यांचे ....एकदम " परफेक्ट  " . 'आपल्यकडे स्वतःचा एकही फोटो धड नाही', असे वाटून तिने राहुलशीच भांडण केले.  आताकाही झाले तरी आपण घराबाहेर पडायलाच हवे.  फॅशनचे कपडे घालून मस्त फोटो काढायला हवे. सगळ्यांना फोटोवरून  'आपणही त्यांचासारखा आयुष्यचा आनंद घेत आहोत' असेच वाटले पाहिजे. आता मागे राहून चालणार नाही. राहुलचा वाढदिवस येतोय त्यानिमित्ताने दोन दिवस कुठेतरी बाहेर जायचेच. या विचाराने ती कामाला लागली. कळत नकळत सोशल मीडियावर सुरू असलेल्या स्पर्धेत ती ओढल्या गेली.
            जायचा दिवस उजाडला तशी ती मुली व राहुलच्या मागेच लागली. त्यांनी कुठले कपडे घालायचे हे ही तिनेच ठरवले. जातांना बेकरीवर थांबून एक केक विकत घेतला. राहुलने कुरकुर केली की प्रवासात कशाला हा केक चा घाट तर त्याला " मलाही सगळे कसे ' पिक्चर परफेक्ट' हवे आहे. सगळ्यांना माझा हेवा वाटला पाहिजे " असे सांगून गप्प केले.
       
          मुलींना मस्त खेळायचे होत पण जोपर्यंत चांगले फोटो येत नाही तोपर्यंत तिने मुलींना खेळू दिले नाही की केक खावू दिला नाही. 'एरवी जरा मोकळा वेळ मिळाला की आपल्या हातात हात घालून निवांत क्षितिजाकडे बघणारी अवंतिका आज मात्र आपल्या हातात हात घालून सेल्फी घेण्यात मग्न आहे' असा विचार राहुलच्या मनात आला. तेवढ्यात छोटी स्वरा पाय अडकून खाली पडली. सगळ्या कपड्यांना माती लागली. अवंतिकाने पळत जावून तिला उचलले. तिचे कपडे झडकले , " आता हिचे कपडे बदलल्याशिवाय  फोटो काही काढता येणार नाही " असे ती राहुलला बोलली  तसे स्वराने तिच्याकडे रागाने पहिले , " तू ना .... फेसबुक बघते तेव्हापासून खूप बदलली आहे. तुला सारखे फोटो काढायचे असतात. मला नाही बोलायचे तुझ्याशी " असे म्हणून ती राहुलकडे पळत गेली.
       अवंतिकाला तर तिचे काय चुकले हे कळलेच नाही  पण डोळ्यात पाणी मात्र आले. राहुलने स्वराला समजावून खेळायला पाठवल्यानंतर अवंतिकाजवळ जावून बसला. तिचा हात प्रेमाने हातात घेतला. त्याच्या या प्रेमळ स्पर्शाने भवनांचा बांध फुटला ती त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिचे रडणे थांबल्यावर तिने राहुलला विचारले , " काय चुकलं रे माझं ? स्वरा अशी का बोलली ?"
        त्यावर राहुलने तिला समजावले , ' काहीच चुकल नाही तुझं .... ह्या आधी ....आपण जसे आहोत तसेच परफेक्ट आहोत. इतरांशी तुलना करू नये. स्वतःला कमी लेखू नये. असेच शिकवले आहेस तू त्यांना .....आता मात्र.... दुसऱ्यांना काय परफेक्ट वाटतं ? काय आवडेल? कशाचा हेवा करावा ? किंवा इतरांना हेवा करायला भाग कसे पीडावे? हे समजायला त्यांना वेळ  लागणार आहे. त्या अजुन लहान आहेत"
      त्याच्या या वाक्याने आणि आश्वस्त स्पर्शाने आपले नेमके काय चुकले आहे  हे अवंतिकाला कळले. कुठल्याही साधनाच्या किंवा त्यातून निर्माण होणार्‍या आभासी जगाच्या अती आहारी जाणे घातक ठरते आहे. इतरांशी तुलना करून आपण आपलाच आनंद गमावून बसतो आहे. याची तिला प्रकर्षाने  जाणीव झाली.
           आज या घटनेला वर्ष झालं..... पूर्वी सारखे तिचे आयुष्य अगदी साधं आणि समाधानी आहे.  नवरा व दोन मुली हेच तीचे जग आहे.  फावल्या वेळेत ती ऑनलाईन मराठी विषयाची शिकवणी घेते. ती आजही  फेसबुक वर अ‍ॅक्टिव्ह असते. तिला जे आवडले , पटले असे लेख, फोटो ,माहिती इत्यादी ती शेअर करते. इतरांचे आवर्जून कौतुक करते. कुणाचा हेवा करत नाही की कोणाला आपला हेवा वाटावा असे मुद्दाम काही करायला जात नाही. सोशल मीडियावर  कळत नकळत जी लाईक, कमेंटची  स्पर्धा सुरू असते त्यापासून ती आता दोन हात दूर रहायला शिकली आहे. ती आयुष्यातील सगळे बदल सकारात्मकतेने स्विकारायला लागली आहे. या सोबतच आवडीने छंद जोपासणाऱ्या अनेक ग्रुपची ती अ‍ॅक्टिव्ह मेंबरही आहे. 'जे जसे आहे तसेच स्वीकारून पुढे जाता आले तरच सुखी राहता येते. अन्यथा सुखी आहोत हे दाखविण्याच्या नादात आत्मिक सुख मात्र कायमचे हरवून बसते.' या विचारानेच  तिच्या मनातील  गुंतागुंत नाहीशी झाली. तिच्यासाठी सगळेच अगदी सोपे झाले.
        सगळ्यात महत्वाचे म्हणजे , मुली गळ्यात पडून , " मम्मा यू आर दी बेस्ट " म्हणतात तेव्हा मुली आणि राहुलच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान ती नजरेने टिपते आणि मनाच्या अल्बम मधे #पिक्चर_परफेक्ट " म्हणून पोस्ट ही करते.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिप: कुठलेही साधन चांगले किंवा वाईट नसते . आपण त्याचा वापर कसा करतो?? .. त्याच्या आहारी किती जातो ?? यावर सगळे अवलंबून असते.
मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवणीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com
(या रांगोळीत चंद्र पाहतना पाठमोर्‍याी मुलीचे केस म्हणून मक्याचे केस वापरले आहेत )