तो_ती_आणि_मोकळा_संवाद

#तो_ती_आणि_मोकळा_संवाद

     ख्याली खुशाली विचारायला मित्राने तिला फोन केला .
  तो:   कशी आहेस?
ती: मजेत.
तो: तुझं बरं आहे कधी विचारा ... तुझं उत्तर ठरलेलं असतं... मजेत.
ती: ह.... तू बोल काय विशेष ?
तो: आज विशेष हेच.. की शेजारची सोसायटी सील केली.
   त्यामुळे आता आम्हालाही रोज मिळणारी भाजी, दूध सगळंच बंद होणार.
कधी बदलणार ही स्थिती ? आधी सोसायटीत फिरता येत होत. सायकल चालवता येत होती . घरी असलो तरी तेवढंच जरा बरं वाटतं होतं पण आता घरातच कोंडून घ्यावं लागणार .
लोकं काही ऐकत नाही . दिवसेनदिवस रुग्ण संख्या वाढतेच आहे. किती दिवस घरी रहायचं. कंपन्या अडचणीत येणार , पगार मिळतो की नाही अशीही चिंता लागली आहे .  विचार करून रात्रीची झोप येत नाही...
हेच काय ते विशेष .....
नुसता कंटाळा आला आहे ... तुला नाही आला कंटाळा .
ती: कसा येईल ?
तो : म्हणजे ...
ती : म्हणजे .... वाघाचे पंजे
तो : बस का ....  असं कसं होईल की तुला कंटाळा आला नाही. घरातली सगळी कामं नवरा करतो का?
ऐैती: अरे बाबा सगळी काम खरंच जर नवऱ्याने केली तर मग मात्र नक्कीच मला कंटाळा यायला वेळ लागणार नाही.
परिस्थितीने सगळ्यांना घरात बंद केले आहे . सगळेच त्याबद्दल तक्रार करतात . पण एरवी या घरासाठीच तर आपण मर मर करत असतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी कधी एकदा घरी जातो असं आपल्याला होत . आठवडा भर सतत बाहेर खावं लागलं की घरच्या साध्या जेवणाची आठवण यायला लागते.
मग आपल्या याच घरात राहण्याचा कंटाळा का यावा ?
तो: का म्हणजे ? काम नको का करायला .
ती : तुझं माहीत नाही ... मला भरपूर कामं आहेत. उलट रोजच्या कामामध्ये  वाढ झाली आहे. तरी..... आता
घरातल्यांना कधी नव्हे ते घर कामाचं महत्त्व लक्षात आलं आहे त्यामुळे सगळेच आपापल्या परीने मदत करत आहेत.
घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्याचाच वापर करून घरच्यांना कंटाळा येणार नाही असे नवं नवीन पदार्थ बनवण्यात माझे कसब पणाला लागते आहे खरे पण  मी केलेल्या नव नवीन खाद्य पदार्थांना घरच्यांकडून दादही पूर्वीपेक्षा भरपूर मिळते आहे.
       पूर्वी ' अग तुझे केस किती पांढरे झालेत.  कलर का करत नाही ' असं म्हणून माझ्या काकूबाई पणावर हसणाऱ्या मैत्रिणी आता स्वत:च्या नवीन सेल्फी टाकून मला खिजवण्याचा प्रयत्न करत नाही.
      " तू नोकरी करत नाही म्हणून तुला घर टापटीप ठेवायला जमतं , स्वतःचे छंद जोपासायला मिळतात " अस म्हणणाऱ्यांना घर टापटीप ठेवायला आणि छंद जोपासायला किती पापड बेलावे लागतात याची पूर्ण कल्पना आली आहे.
" किती प्लॅनिंग असत ग तुझं .... आयुष्य बिना प्लॅनिंग जगायचं असतं.
 किती पसारा जमवते ग... किती किराणा सामान घेतेस ... गाव जेवण घालायचं आहे का?  असं म्हणून चिडवणाऱ्या नवऱ्याला आता काहीही आणायला घरा बाहेर पडावं लागतं नाही म्हणून त्यालाही माझ्या त्या त्रासदायक वाटणाऱ्या सवयींच महत्व पटलं आहे.
घरी येणारे पाहुणे कमी झाले याच दुःख आहेच पण एरवी वेळ नाही म्हणत टाळणारे जवळचे आप्तगण आता आवर्जून चौकशी करतात त्याचच   समाधान सध्या मोठं आहे.
 घरातच राहून आनंदी कसं रहाता येईल याचा विचार डोक्यात सुरू असल्याने टीव्हीवरच्या बातम्या ऐकुन लोकांच्या मूर्खपणावर तावातावाने चर्चा करण्यासाठी वेळच मिळत नाही.
*जेव्हा आपली परिस्थिती बदलत नाही तेव्हा त्या परिस्थितीला आपली मानसिकता बदलायची असते* असं कुठेतरी वाचलं होतं.
म्हणूनच संघर्ष न करता मी येईल त्या परिस्थितीशी  जुळवून घेत स्वतः मधे बदल करायला शिकले.
त्याचाच फायदा आता होतो आहे.

तो: अग पण बाहेरची परिस्थिती बदलण कोणा एकाच्या हातात नाहीच तर ... तू मजेत असली तरी परिस्थिती थोडी बदलणार आहे.
 ती : वर्तुळ कशाने बनते ?
तो: काय???
ती : सांग ना ... वर्तुळ कशाने बनते?
तो : परिघावरच्या असंख्य बिंदूने वर्तुळ बनते.
ती : परिघा आधी केंद्र बिंदू येतो ... तो असतो आधी .... तोच त्याच्या भोवतीच्या समान अंतरावर  असलेल्या सगळ्या बिंदूना जोडत जातो त्यातून वर्तुळ तयार होते.
तो : मग .. त्याने काय फरक पडतो आपल्या परिस्थितीत?
ती : तसही ...माझ्या एकटीच्या काही होणार नाही हे जरी मान्य केले तरीही भोवतालची परिस्थिती बदलत नाहीच ना मग निदान आपली मानसिकता बदलून आपल्या पुरते तरी सकारात्मक वातावरण निर्माण करायला काय हरकत आहे.
   आपल्या भोवती असलेली परिस्थिती बदलायची असेल तर केंद्रबिंदू स्वतःला मनायचं .... परिस्थितीत हवे असलेले बदल स्वतःमधे करायचे मग आपोआप आपल्या भोवती  तयार होणारे वर्तुळ आपल्याला हवे तसे बनते. वेळ लागतो पण आपल्या मनासारखे घडून येईल ही आशा कायम रहाते.
म्हणून आपल्यावर आणि आपल्या मानसिकतेवर बरच अवलंबून असतं असं मनायच आणि आशावादी रहायचं
उम्मिद पे दुनिया कायम है .... कुछ समझे
तो: तुझं बरं आहे ग तू स्त्री आहेस . तुला घरी रहायची सवय आहे म्हणून तू हे सगळं बोलू शकते.
पण माझ्या सारख्या धडधाकट पुरुषाला अजून काही दिवस सरकारने घरी बसवलं तर वेड लागेल .
ती:  .... अभिनंदन
तो : कशाबद्दल ?
ती : तू लवकरच वेडा होणार आहे म्हणून
तो : बस का .... अरे वेड लागू नये म्हणून तर मी work from home पण सतत करत नाही . मधे मधे ब्रेक घेतो . घरच्यांना वेळ देतो . बायकोला मदत करतो . घरातल्या घरात व्यायामही करतो.
आहारापासून घरच्या कामापर्यंत
एक टाईम टेबल बनवलाय ... आम्ही सगळे त्याचे काटेकोर पालन करतो आहे. मुलं अजून लहान आहेत . आईवडिलांची ही जबाबदारी आहे माझ्यावर
 ... वेड लागून कसं चालेल ग ...
ती : तू work from home करतोय म्हणजे तुला काम आहे. टाइम टेबल बनवलाय म्हणजे संघर्षाची मानसिक तयारी सुरूच आहे. एरवी वेळ नाही म्हणत असतो... आता कुटुंबा सोबत वेळ घालवतोय म्हणजे सुखी आहेस
मग उगाच तक्रारीचा पाढा का वाचतो आहेस.
आपण निदान आपल्या घरात तरी आहोत . अनेक जण आपल्या घरापासून दूर कुठेतरी अडकून पडले आहेत.
आपण निदान आपल्या आवडीचे पदार्थ बनवून खावू तरी शकतो आहे पण अनेक जण दोन वेळच्या जेवणासाठी सरकारी यंत्रणेवर किंवा मदत करणाऱ्यांवर अवलंबून आहेत.
आपण निदान आपल्या मनोरंजनाचे काही उपाय तरी करू शकतो पण डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार , अनेक अत्यावश्यक सेवा देणारे यांना रात्रदिवस काम करावं लागतं आहे. आपण आपल्या बँक बॅलेन्सच्या आधारे निदान काही महिने तरी आपलं घर चालवू शकतो पण रोजंदारीवर काम करणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे.
आपण फार काही करू शकत नाही या सगळ्यांसाठी पण घरात राहून आनंदी राहू शकतो. सरकारी यंत्रणा आपलं काम चोख करते आहे . घरात राहून आपण आपल्या यंत्रणेवर येणारा ताण कमी करू शकतो.
आनंदी राहून सकारात्मक विचार करू शकतो. जेणे करुन बाहेर पडायला मिळत नाही याबद्दल ची नकारात्मक चर्चा निदान आपल्या पुरती तरी बंद होईल.

तो: खरंय तुझं.... जे संकट समोर उभ राहील आहे त्याचा सामना सकारात्मकतेनेच करायला हवा . काही लोक बेजबाबदार वर्तन करतात म्हणून जबाबदार लोकांनी त्यांच्यावर चर्चा करून नकारात्मक मत बनवू नये. जे आहे त्यात उत्तम उपाय योजायला  घराबाहेर पडून इतरांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा तुझ्यासारख्या मित्र मैत्रिणींना
बोलून मन मोकळं करायला हवं.
ती : खरंय .... मन मोकळा संवाद सकारात्मक ऊर्जा देतो.
तो: म्हणून तर तुला फोन करून तुझं डोकं खायला मला आवडत .
ती: खा किती खायचं ते माझं डोकं.... पण हे कधीच विसरू नको की आधी कोवीड१९ विरूद्धचां लढा आपल्या सगळ्यांच्या सकारात्मकतेने आपल्याला जिंकायचा आहे. नंतर देशावर आलेल्या आर्थिक संकटालाही पळवून लावायच आहे त्यासाठी आधीपासूनच तयारी करायला हवी . या सगळ्याची सुरवात आपल्या सकारात्मक विचारांनी करायची आहे. आपण आपल्या घरातील वातावरण आनंदी ठेवायचं ... . काळ थांबत नसतो .... हे दिवस ही जातील रे.
लांब शर्यतीचा घोडा शर्यत जिंकण्यासाठी आधी दोन पावलं मागे येतो आणि मग सुसाट वेगाने पळतो . अगदी तसंच या कोरोना निमित्त  आपण दोन पावलं मागे आलो असलो तरी हे मागे येणं कायमच नाही .  हे लक्षात घ्यायला हवं.
आपल्याला आपली शर्यत जिंकायचीच आहे .

तो: सगळ्यांना   सगळंच माहिती असतं ग पण वळत नाही ना. तुझ्या कडून ऐकलं की डोक्यात घुसत...
 तू छान समजावतेस....
ती : अस्स ..... मी छान समजावते काय ..... मग वचन दे. lockdown period वाढला तरी आता तू तक्रार करणार नाहीस.
स्टे होम स्टे सेफ.... याच बरोबर
स्टे पोझीटीव्ह... स्टे हॅपी याचाही अवलंब करशील.
तो : मी वचन देतो की पुन्हा तक्रार करणार नाही . सकारात्मक विचार करून घरातलं आणि माझ्या मनातलं वातावरण आनंदी ठेवेल.
ती:  .... आज साठी एवढंच पुरे... बोला
  गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
तो : गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला (😄😄😄😄)
       जा जावून कामही कर थोड घरातलं. एकट्या नवऱ्याला किती लावशील कामाला

ती:  हम्म्म ... तुझी कामं झाली वाटतं करून
तो: नाही ना .... भांडी वाट बघत आहेत.
दोघंही दिलखुलास हसले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
एका मित्राने आपल्या मैत्रिणीला सकारात्मक विचार करण्याचे वचन दिले म्हणून पिंकी प्रॉमिस दाखवणारी ही रांगोळी .
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करतांना नावासहितच करावे.



2 comments: