मस्त चाललंय आमचं

#मस्त_चाललंय_आमचं

         काल जुन्या मैत्रिणींचे अचानक भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सगळ्या ' नैवेद्यम हॉटेलच्या टेरेस गार्डनमधे भेटल्या. भेटल्यानंतर जुन्या, नविन अशा अनेक विषयांवर गप्पा रंगात आल्या होत्या. या सगळ्यात 
'नवरा' आणि ' स्वतःचे वाढते वय' हे दोन मुख्य मुद्दे होते.
      लग्नाला अनेक वर्षे होवूनही अजून नवरा घरकामात मदत करत नाही. काळा बरोबर नवऱ्यांनी त्यांचे विचार बदलायला हवे. अशा तक्रारी त्या एकीकडे करत होत्या तर दुसरीकडे स्वतःच्या वाढत्या वयाबरोबर होणारे बदल नियंत्रणात ठेवून आपण अजूनही किती मेन्टेन आहोत, त्यासाठी आपण काय काय करतो याचे कौतुकही सुरू होते. 
             गप्पा सुरू असतांना अचानक त्या सगळ्यांची नजर अलकावर खिळली. अलका त्यांच्यात अगदीच " ऑड मॅन ( वुमन) आउट" होती. तिच्या चेहऱ्यावर दोन वर्षात येवू घातलेली चाळीशी स्पष्ट दिसत होती. त्यात भर म्हणजे पूर्वी लांबसडक, काळेभोर असलेल्या तिच्या केसात आता चंदेरी केसांची उपस्थितीही प्रकर्षाने जाणवत होती.
सगळ्या जणी तिला केस काळे करण्याचे विविध उपाय सांगू लागल्या. चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी महिन्यातून एकदा पार्लरला जाणे कसे फायदेशीर असते हे पटवून देवू लागल्या. 
               अलकाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू झाले. 
प्रत्येकाला लहानपणी मोठे होण्याची हौस असते. मोठे झाल्यावर मात्र एका विशिष्ट टप्प्यावर वय वाढूच नये किंवा वाढलेले वय चेहर्‍यावर दिसू नये असा प्रयत्न का असतो? तिचा मात्र असा आग्रह कधीच नव्हता. लहानपणी तिच्या घरी त्यांच्या बाबतचे निर्णय घेतांना घरातले मोठे नेहमीच म्हणायचे, " उगाच उन्हात पांढरे नाही केलेत हे केसं.... अनुभवाचं देणं आहे हे " तिला भारी गंमत वाटे या वाक्याची तेव्हाच तिच्या बाल मनाने ' आपणही हे 'अनुभवाचं देणं ' असेच मिरवायचे' असे ठरवून टाकले होते. सगळेच केस पांढरे झाले की कोणती केश रचना करायची हे देखील तिचे ठरले होते. तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे शारीरिक, मानसिक बदल मनसोक्त उपभोगायचे होते. वृध्द झाल्यावर सगळे केस पांढरे नसतील, त्वचा सुरकुतलेली नसेल, नातवंडांचे लाड करतांना, आशिर्वाद देतांना थरथरणारे हात नसतील तर काय मजा आहे मग वृध्द होण्यात? असे तिला वाटे. सुरुवाती पासूनच वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या शारिरीक बदलांसाठी ती मानसिक दृष्ट्या तयार होती. दिसण्यापेक्षा मन व शरीर कायम सुदृढ रहायला हवे यासाठी ती आग्रही होती. 
             एका लग्नसमारंभात तिच्या पंचावन्न वर्षीय मामाने तिला सगळ्यांसमोर मुद्दाम टोमणा मारला होता, "काय ग.... आताच किती केस पांंढरे झालेत. तारुण्यात म्हातारी झालीस. माझ्याकडे बघ अजून केस काळे आहेत" त्यावर तिही बिनधास्त बोलली होती, " त्याचे काय आहे न मामा..... तुझे फक्त वय वाढते आहे. माझे तसे नाही.... माझा वयाबरोबर अनुभव देखील वाढतो आहे. त्याच अनुभवाने सांगते, 'दर आठ दिवसाला केस रंगविले तर ते अगदी तुझ्या केसांसारखे काळेच राहतात"
तिचे बोलणे ऐकून मामी सहित उपस्थित सगळ्यांमधे हशा पिकला होता. 
      मघाशी हॉटेलच्या टेरेस गार्डनमधे येतांना लिफ्ट बंद असल्याने सगळ्यांना पायर्‍या चढाव्या लागल्या होत्या. त्यावेळी काहींचे गुडघे दुखले तर काहींना श्वास घेणे जड गेल्याचे तिने पाहिले होते.
        यावेळी ही तिला काहीतरी बोलता आलेच असते. परंतू आजकाल कोणत्याही समारंभात घुमवूून फिरवून तिच्या दहा बारा  पांढर्‍या केसांवरच चर्चा केली जात होती. सगळ्यांना आपले विचार पटवून द्यायला गेलो तर आपला अमूल्य वेळ मात्र वाया जातो. हे अनुभवाने ती शिकली होती.
   म्हणुनच मनातले सगळे विचार मनातच ठेवून अलकाने मैत्रिणींचे प्रेमळ सल्ले ऐकून घेतले. 
           घरी आल्यावर रात्री झोपतांना मात्र 'आपल्याला आपले मत ठामपणे का सांगता येवू नये?' केस काळे न करणे.... किती शुल्लक बाब आहे. यावरही लोक त्यांची मते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत राहतात. या आपल्या शुल्लक निर्णयावर जर आपल्याला ठाम रहायचे असेल तर अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावेच लागणार आहे. या जाणिवेने तिला प्रचंड वैताग आला. तिच्या मनाची चिडचिड, धुसफूस झाली. 
    दुसर्‍या दिवशी सकाळी जरा उशीराच उठली. उठली म्हणजे काय नवऱ्याने व मुलाने प्रेमाने उठवले. नवऱ्याने हळूच ओठ टेकले कपाळावर तर मुलाने मिठीच मारली. लाडीक हट्ट केरत , " उठ ना ग मम्मी" असे म्हणाला.
    तशी ती लगबगीने उठली . नाश्त्याची वेळही झालीच होती म्हणून पटापट आवरून केसांना चिमटा लावत ती स्वयंपाक घरात दाखल झाली. तिथे पोह्यांचा मस्त सुवास दरवळत होता तर आल्याच्या चहाचे पाणी उकळत होते. ती काही विचारणार तेवढ्यात मागून नवऱ्याने व मुलाने ." सरssssप्राइज..." असा जल्लोष केला. तिच्या डोळ्यातला आनंद दोघांनाही सुखावून गेला. तिने प्रेमानेच मुलाला जवळ घेतले . "मला ही घ्या रे तुमच्यात" असे म्हणून त्या दोघांना नवराही बिलगला. तिच्या या छोट्याशा जगात तरी 'तिच्या दिसण्यापेक्षा, तिच्या असण्याला महत्व होते. हीच भावना तिला भविष्यात तिच्या दिसण्या संबंधी येणार्‍या अनेक सामाजिक प्रसंगांना तोंड देण्यासाठी अधिक बळ देणारी होती.
 सुख, समाधान, आनंद, प्रेमात न्हावून निघालेली त्यांची ही छबी सिंक शेजारच्या आरश्यात स्पष्ट दिसत होती व आरश्याला ठामपणे सांगत ही होती, " येवू दे चाळीशी,वाढू दे वय ....मला पर्वा नाही त्याची कारण .... कारण ...... मस्त चाललंय आमचं "
        आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांसाठी आपण कसे दिसतो हे कधीच महत्त्वाचे नसते. त्यांनी आपल्यासाठी बदलावे असे वाटत असतांना आपण मात्र आपल्यात होणारे नैसर्गिक बदलही टाळू पहात असतो. लोक काय म्हणतील याचेच जास्त भय वाटून अनेकदा आपण आपल्या मनाविरूद्ध वागत असतो. तरुण दिसण्यासाठी अनेक रासायनिक साधनांचा वापरत असतो. केसांना काळे करण्यासाठी लावलेल्या डायचे दुष्परिणामही भोगत असतो. 
           जे करायचे आहे ते स्वतःसाठी करावे. लोकभया पोटी नाही. स्वतः मधले बदल सकारात्मकतेने स्विकारले तरच आपण या लोक भयापासून मुक्त होऊ शकतो. बाहेरून मुलामा देण्याआधी आपण आतून प्रसंन्न रहाणे शिकायला हवे. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक चिरकाल टिकणारे असते. आपणही आपल्या दिसण्यापेक्षा असण्याला महत्व देवून, आपल्या प्रियजनांच्या साथीने बिनधास्त म्हणू शकतो......" मस्त चाललंय आमचं ".

©️अंजली मीनानाथ धस्के




( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

No comments:

Post a Comment