एक व्यथा

 
   #एक_व्यथा         
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के
                       आज कावेरी जरा लवकरच उठली होती. खूप दिवसापासून भंगलेली बाल गणेशाची मूर्ती घरामधे तशीच पडून होती. खरं तर घरात जागा नसतांना केवळ मुलांना आवडली म्हणून केवढ्या हौसेने छोटा भीमचे रुप असलेली  गणेश मूर्ती घरी आणली होती. पण आता मात्र रस्त्यावर गर्दी वाढायच्या आत मूर्तीला कुठेतरी ठेवून यावे,  असे तिच्या मनात होते. कामांची घाईही खूप होती. तिने कामांची यादी केली आणि मूर्ती घेवून घराबाहेर पडली. बरेच अंतर गेल्यावरही तिला मूर्ती ठेवायला मनासारखी जागा मिळेना तेव्हा ती फार वैतागली आणि तेवढ्यात तिचा मोबाईल खणखणला. चडफडतच तिने फोन घेतला. पाहते तर आईचा फोन होता. आईला काही बोलायच्या आत तिकडून आईचे रडणे ऐकू आले. "तू ताबडतोब घरी ये " असा निरोप मिळाला. "बरं येते लगेच" म्हणून तिने फोन ठेवला. यादीतली सगळी कामे तिने रद्द केली. आईकडे जायला गाडी वळवली तेवढ्यात तिला मूर्तीची आठवण झाली . घाईतच ती मूर्ती तिने तिथेच एका कट्ट्यावर ठेवून दिली.
          आई अजूनही रडतच होती . रडायचं कारण विचारल्यावर कळलं की, भावाने आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज काल आई तब्येतीच्या तक्रारीमुळे झोपूनच असे. भावाचे घरही तसे छोटेच. दिवाणखाना तर आईच्या पलंगाने आणि औषधाच्या बाटल्यांनी व्यापलेला. घरात सगळे नोकरी करणारे आईकडे बघणारे कोणी नाही. तिच्यासाठी घरात पूर्णवेळ थांबणारी बाई ठेवणे परावडण्यासारखे  नव्हते. हल्ली आईला एकट्याने ठेवणे ही तिच्या तब्येतीच्या दृष्टीने धोक्याचे झाले होते. 
 भावानेही नाखुशिनेच हा निर्णय घेतला होता. तिच्या मानत  विचारचक्र सुरू झाले. 'आपल्याकडे आईला न्यावे तर आपलेही घर छोटेच आहे. घरात वृद्ध सासू ,सासरे, एक नणंद, दोन मुले, नवरा आणि आपण मिळून सात जण राहतो.  त्यात आपलीही परिस्थितीही बेताची आहे.'
 तिच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते . त्यांची उत्तर शोधण्याआधी तिला आईला समजावणे, धीर देणे गरजेचे होते. काय बोलावे तिला काहीच सुचत नव्हते. ती पुर्णपणे बधीर झाली होती. तरी तीने धीर केला व आईला म्हणाली , " डोळे पूस बघू आधी , निर्णय घेतला म्हणून लगेच नाही काही नेणार तुला, निघेल काही तरी मार्ग. तू काळजी करू नकोस. मी बोलते दादाशी. देव आहेच की आपल्या पाठीशी. डोळे पूस बघू आणि काही तरी खावून घे बरं आता ."
         तीने मनातल्या मनात  " देवा तुलाच रे काळजी ....... काही तरी मार्ग काढ यातून. सोडव बाबा या संकटातून" असा धावा केला. तशी तीला मूर्तीची आठवण झाली. एक सल काळजात खोलवर  रुतली. डोळ्यात अश्रू दाटले.  तिच्या मनावर प्रचंड ताण आला. तिचं आता कशातच चित्त नव्हतं. ती घाईतच उठली आणि घराबाहेर पडली. आता तिला तिचे बालगणेश परत हवे होते. तीने जिथे मुर्ती ठेवली होती तिथे ती परत आली. 
                पण ...... आता तिथे मूर्ती कुठेच नव्हती..............
होती ती फक्त अपराधी पणाची भावना आणि डोळ्यात दाटलेले पाणी.............


#भंगलेली_मूर्ती_सांगू_पाहे_काही

भंगलेली मूर्ती सांगू पाहे काही.......
नवी कोरी असता देव्हाऱ्यात मांडली...
हात जोडूनी दोन्ही, पुढती माझ्या मानही झुकली.........
केवळ माझ्या दर्शनाने अनेक संकटेही सुटली........
पण........
रंग जरा उडता किंवा
कोपरा एखादा तुटता
नकोशी का होते? अडगळ का वाटली?......
सोडले जरी कडेला अथवा झाडा खाली...
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही........
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही........

रस्त्याच्या कडेला असलेल्या याच मूर्तीला बघून मनात अनेक विचार आले आणि त्यातून ही कथा  व कविता तयार झाली.

मनात अनेक प्रश्न उभे राहिले .
जिथे रूप संपलं की देवही बेघर होतो तिथे वृध्द आईवडिलांना वृद्धाश्रमात जाण्यापासून रोखणे ... वृद्धाश्रम ही संकल्पना समुळ नष्ट करणे आपल्याला ..... शक्य होईल ?????????
रूढी परंपरा म्हणून किती दिवस आपण असे कुठलाही विचार न करता नदी प्रदूषण करत राहणार आहोत???? निर्माल्य , लाल चूनडी , देवांचे फोटो .... भंगलेल्या मुर्त्या नदीत सोडणार आहोत???
अनमोल अशा नैसर्गिक स्रोतांची हानी करणे कितपत योग्य आहे????
कारण कुठलेही असो .... जिथे वेळ पडली तर देवाला घरा बाहेरचा रस्ता दाखवला जातो.... तिथे माणसांनी माणुसकी जपली पाहिजे अशी ओरड करणे  योग्य ठरेल का????
निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे ... आता आपली वेळ आहे या नैसर्गिक स्रोतांची जपणूक करण्याची तरी "आपण केवळ अनेक वर्षे असेच करत आलो आहोत' ही सबब सांगून चांगले बदल स्विकारणे का टाळतो आहे???
अनेक जणांनी असे बदल स्विकारले तरी अजूनही सर्वानुमते असे प्रयत्न कमी का पडत आहेत????
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ... शोधलेली उत्तरे सगळ्यांनी अवलंबायची गरज आहे .
तुम्हाला काय वाटते ????

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबत अगदी साधी सोपी सुंदर रांगोळी ही आहे .

मी काढलेली बाल गणेशाची रांगोळी

रस्त्याच्या कडेला असलेल्या याच मूर्तीला बघून मनात अनेक विचार आले आणि त्यातून ही कथा व कविता तयार झाली.


2 comments: