रंग माझा वेगळा

#रंग_माझा_वेगळा              
          पाच बहिणींमधे शामल सगळ्यात मोठी . कष्टाची सवय अगदी लहानपणा पासूनच लागलेली . मुलाच्या हव्यासापोटी पाच मुलींना जन्म देवून नाजूक तब्येत झालेली  आई आणि इतकं करून  ही मुलगा झाला नाहीच म्हणून त्यांना सोडून गेलेला बाप . नवरा सोडून गेल्याचं दुःख इतकं होत की शामलची आई अधिकच आजारी राहू लागली. त्यामुळे  लहान बहिणींचे सगळे करायची जबाबदारी शामलवरच आली. तिनेही ती आनंदाने घेतली .  अभ्यासात हुशार असूनही शिक्षण अपूर्ण सोडून भारती बजारमधे वाजनाप्रमाणे सामान भरण्याची  नोकरी स्विकारली. घरचे सगळे करून कामावर जायची . आल्यावर राहिलेली काम करत लहान बहिणींचा अभ्यास घ्यायची . शामलपेक्षा कोमल दोनच वर्षांनी लहान म्हणून तिलाही कामाला लावावं असं आईचं मत होतं पण शामलने हट्ट करून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तिला शिकू द्यावं असं आईकडून  कबुल करून घेतलं. त्यामुळेच की काय पण आईपेक्षा शामलवरच बहिणींची माया अधिक होती.
         खर्च वाढले तसे शामलने इतरही कामे घेतली . आई सारखी आजारी असली तरी पोरींचे उसवलेले कपडे छान शिवायची . कुठे बारीक छिद्र असेल तर ते सुंदर फुलाचा टाका घालून बंद करायची . मुलींनी फाटके कपडे घालू नये असंच तिला  वाटायचं पण बँकेत जमा रक्कम फार थोडी त्याच व्याज कमी येत होतं.  त्यात शामलचा पगार ही फार नव्हता.   कोमल, काजल, पायल आणि सैजल सगळ्याच शाळेत जाणाऱ्या . पैसे पुरायचे नाही.  शामलला काही तरी मदत करावी असं प्रत्येकीला वाटायचं . तेव्हा आईचं सुई दोऱ्यावरचं प्रेम बघून शामलने गल्लीतल्याच ' लेडी मुड ' या बुटिकचे मालक असलेल्या सय्यदचाचा कडून आईला काम मिळवून दिलं. घराबाहेर न जाताही आवडीच काम मिळालं त्यामुळे आई खुश होती. पैसे कमी मिळत होते पण वेळ छान  जावू लागला .
     शामालची धडपड बघून घरच्या कामात बहिणी तिला मदत करायच्या. आईलाही आता असं कामात बघून चौघींनी शामलकडे,' आम्हालाही काही तरी काम मिळवून दे ', असा हट्ट धरला. शामल मात्र त्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे याच मताची होती.
                    वर्षा मागून वर्षे जात होती. दिवसामागून दिवस जात होते. खर्च वाढतच होता. शिल्लक काहीच उरत नव्हते. प्लास्टिक बंदी आली तेव्हा सय्यद चाचाने पेपरच्या पिशव्या  बनवून देण्याची विनंती केली.  तेव्हा चौघींनी घरीच पेपरच्या पिशव्या बनवण्याचे काम सुरू केले. त्या नुसत्या पिशव्याच बनवायच्या नाही तर त्यावर ' लेडी मुड ' हे नाव ही सुंदर अक्षरात काढून द्यायच्या . त्यांची मेहनत आणि कामाचा दर्जा बघून  सय्यद चाचाने अजून इतर दुकानदारांचे कामही मिळवून दिले. त्या आळीपाळीने अभ्यास आणि काम करत त्यामुळे शामलची काही तक्रार नव्हती.
       आता काही पैसे शिल्लक राहत होते. पोरींची जिद्द .... हुशारी बघून  शामलच्या आईला वाटू लागलं की पोरींनी शिकून नोकरी करावी . आपल्यासारखी वेळ त्यांच्यावर येवू नये . तिला जणू  जगण्याचा उद्देश मिळाला . हातात काम होतंच . तिच्या कामातली तिची सफाई बघून आजूबाजूच्या बायका तीच कौतुक करायच्या . तिलाही मग हुरूप यायचा.
आपणही काही तरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याची जाणीव होवून तिचं आजारपण ही कमी झालं.
           शामालचा  प्रामाणिकपणा.... परिस्थिती समोर न झुकता संघर्ष करण्याची वृत्ती .... जबाबदारी स्विकारण्याची सवय....अपार कष्ट करण्याची तयारी.... शिक्षणाबद्दलची आस्था  आणि कुटुंबावर असलेलं प्रेम हे गुण बघून भारती बजारमधे सुपर वायिझरची बढती मिळाली .
आता त्यांच्या आयुष्याला थैर्य प्राप्त झाले होते.
       कोमलने एम. कॉम पूर्ण करून  एका छोट्या फर्मवर नोकरीही मिळवली. काजलने एम. ए. करत करत कोचिंग क्लास वर शिकवण्याचे काम सुरू केले.
पायल बी. फार्मसी.  आणि सैजल १२ वी करत होती .
       आता शामलने लग्न करायला काहीच हरकत नाही. असं आईला वाटायचं पण ती काही मनावर घेत नव्हती. अशातच कोमलला तिच्या ऑफिसमधे काम करणाऱ्या एका सहकारी मित्रा बरोबर फिरतांना शामालने पहिले. त्याला घरी बोलावून त्यांचा विचार घेतला. दोघांनाही लग्न करायचे होते पण मोठी बहीण घरात असतांना लहान बहिणीचे लग्न कसे होणार म्हणून दोघंही गप्पच होती. आईने खूप चिडचिड केली पण शामलने त्यांचे लग्न लावून दिले. कोमल तिच्या संसारात रमली. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत काजलनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शामललाही बरीच स्थळ सांगून येत होती पण तिची अट ऐकुन नकार कळवत होती.
      आई चिडून म्हणायची , " ' आईला शेवटपर्यंत सांभाळण्याची तयारी असणाऱ्याशीच लग्न करायचं ' ही काय अट झाली? अग मी ज्याच्याशी लग्न केलं होतं तो तर पाच पोरी देवून पळून गेला . तू का स्वतःच नुकसान करून घेते? कोमल ... काजल सारखं लग्न करून मोकळी हो . आमचं आम्ही बघून घेवू " .
शामल मात्र ठाम होती. आईचा लग्न कर ..  लग्न कर चा तगादा ऐकून त्रासून गेली होती. तिचा उदासवाना चेहरा बघून भारती बजार मधल्या विशालने तिला " आता वेळ आहे तुझ्याकडे तर पुढचे शिक्षण पूर्ण का करत नाहीस ? तुझं मन गुंतून राहिलं." असं सुचवलं . तिलाही ते पटलं .
आता पायलनेही तिच्याच कॉलेज मधल्या एका मुलाशी लग्न करून सुखी होण्याचा निर्णय घेतला.
सैजलला डॉक्टर व्हायचे असल्याने तिने एक वर्ष पूर्णपणे स्वत:ला  अभ्यासात  बुडवून घेतले . अभ्यासात ती हुशार होतीच....तिला एम. बी. बी. एस ला प्रवेश तर मिळालाच पण तिने शिष्यवृत्ती ही मिळवली.  ती हॉस्टेल वर रहायला गेली.   घरात आता शामल आणि आई अशा दोघीच राहिल्या. शामालच ही शिक्षण सुरू होते.
   आता आईला वाटायचं , ' देवाने मुलगा दिला नाही बरच झालं कारण  मुला पेक्षाही जास्त कर्तबगार ... सतत आपला विचार करणारी मुलगी मात्र दिली '.
सैजल डॉक्टर झाली . तिने पुढे एम. डी. ही पूर्ण केल. तिच्याच शिक्षकांनी आपल्या डॉक्टर मुलासाठी तिला मागणी घातली. शामलने तिचेही लग्न लावून दिले.
शामलने  आता भारती बजारची नोकरी सोडून दिली होती. मॉडर्न शिक्षण संस्थेच्या कॉलेजवर समुपदेशकाच काम तिने स्विकारलं होत. आपल्या सारखे परिस्थितीमुळे शिक्षण सोडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ती शिक्षण सुरू ठेवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देत होती.
एक दिवस कामावरून घरी आली असतांना तिला दारात खूप चपला दिसल्या , घरातून हसण्याचे आवाज ऐकू आले. ती धावतच बहिणींना भेटण्यासाठी आत आली . बघते तर काय ... बहिणी आलेल्या   होत्याच पण सोबत विशाल आणि त्याचे आईबाबाही  आले होते. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर सगळे एकमेकांना खाणाखुणा करून मूळ मुद्याच कस बोलायचं असे विचारू लागले.  मग विशालची आईच म्हणाली, " तुझ्यासाठीच विशाल इतके दिवस बीनलग्नाचा थांबला आहे .आम्हाला तुझी अट मान्य आहे. तुला मुलगा पसंत असेल तर  आजच सगळी बोलणी ठरवून टाकू आणि पसंत नसेल तरीही आमची काहीच हरकत नाही ."
त्यांच्या अशा बोलण्याने शामल पुरती गांगरली ... लाजून तिचा चेहरा लाल झाला . ती पटकन उठून आतल्या खोलीत आली.
 झरझर जुने दिवस तिच्याडोळ्यापुढे आले. तिलाही विशाल आवडायचा . कुठलाही लाळघोटेपणा नाही की वागण्यात कधी खोटेपणा  नाही . सतत कामात बुडालेला .... नवीन नवीन मार्केटिंग टेक्निक शिकून घेणारा... तरी संयमित स्वभाव ... इतरांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती तिला खूप भावली होती . तरीही तिने कधी त्याला तसं जाणवू दिलं नव्हतं. पुढे त्याने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला . मध्यंतरी ही भेटी झाल्या तेव्हा त्यानेही काही जाणवू दिले नाही . आज अचानक असा समोर आला तेही मागणी घालायला ... या विचारात ती गढून गेली होती तेवढ्यात विशालच्या बाबांचे शब्द कानी पडले , " आमचा विशाल खूप कमावतो .... शामलला आता नोकरी करायची ही गरज नाही ".
ते ऐकून तिच्या काळजात कळ उठली. ती लगेच बाहेर आली आणि म्हणाली , "बाबा आता तर कुठे  मी  पैश्यासाठी नोकरी करत नाही. आता तर कुठे मला माझी ओळख मिळाली आहे . आता तर कुठे मी माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. .... आता तर कुठे मी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली आहे.   तेव्हा आता ही नोकरी सोडणे मला जमणार नाही". सगळे तिच्या या स्पष्ट बोलण्याने चकित झाले . परंतु
विशालच्या आईने  तिला मिठीच मारली. " कोणीही तुला तिच्या तुझ्या  मना विरूद्ध काही करायला सांगणार नाही " ,  असं वचन दिलं आणि चटकन् तिच्या हातात स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या सरकवल्या. उशीरा का होईना पण आता तिच्या आयुष्यात ही प्रेम च प्रेम आलं होतं.
लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली . तिच्या चांगल्या गुणांनी  घरतल्या सगळ्यांची  ती लाडकी झालीच आहे पण एका गोंडस मुलीची आई देखील ती झाली.
तिने विशालच्या मदतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणून "  कमवा आणि शिका "  योजना सुरू केली. अनेक दिशा हीन विद्यार्थ्यांना तिने शिक्षणाचा मार्ग दाखवला . अनेक   लघु उद्योगांचे प्रशिक्षण  देणारी संस्था ही स्थापन केली ज्यामुळे गरजू स्त्रियांनाही प्रशिक्षण घेवून  स्वतःच्या पायावर उभे राहता आले.
सासूला तर सुनेचे फार कौतुक.... त्या अभिमानाने नेहमी म्हणायच्या ," आमच्या विशालची निवड एकदम योग्य आहे". सगळं घर तिने बांधून ठेवलं होतं . आईची काळजी घ्यायलाही ती कधीच विसरत नव्हती.
मुलगी , बहीण, सून , बायको आई अशा कौटुंबिक तर  सहकारी , समुपदेशिका, मार्गदर्शिका  अशा सामाजिक भूमिकेत ती जीव ओतून काम करत होती. अनेक महींलासाठी ती प्रेरणा ठरत होती. त्याचाच परिणाम म्हणून तिला सखी मंच ने, " रंग माझा वेगळा " हा पुरस्कार देवून सन्मानित केलं.
तिने या पुरस्काराचं श्रेय विशालला दिलं कारण त्याचं  तिच्या सोबत असणं .... त्याने सतत तिला ' स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी ' यासाठी प्रोत्साहन देणं यामुळेच ती इथपर्यंत पोहचू शकली. तिच्या या यशात  कुटुंबांतील प्रत्येक जण सहभागी होता. त्यांच्या सहकार्याने.... प्रेमाने ती मनासारखं काम करू शकली.
संकटही खूप आली पण तिचा निर्धार ठाम होता.जीवनाचे उतार चढाव.... सुख दुःख... चांगले वाईट अनुभव... कधी रडणे तर कधी हसणे ... मैत्री प्रेम ... एकाकीपणा.... भावनांचा ओलावा ....   असे सगळे रंग तिने अनुभवले तरी तिचा रंग मात्र वेगळाच होता . या सगळ्यात उठून दिसणारा.   तिच प्रभावी व्यक्तिमत्व  , ' रंगात रंगूनी साऱ्या .... रंग माझा वेगळा ' याची खऱ्या अर्थाने जाणीव करून देणार होतं.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( प्रत्येकीला या रांगोळीत  स्वतःलाच पाहण्याचा आणि " रंगात रंगून साऱ्या .... रंग माझा वेगळा"  असा म्हणण्याचा मोह आवरनार नाही हे नक्की . )



टिपः
आपल्यातल्या प्रत्येकीने असाच , ' स्वतः चा वेगळा रंग जपायला हवा ' . इतरांच्या रंगात रंगून जातांना स्वतः चा रंग मात्र टिकून ठेवायला हवा.
मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

  

No comments:

Post a Comment