गंमत जंमत

#कॉलेज
#गंमतजंमत

११ वीत प्रवेश म्हणजे अनेक चांगल्या वाईट (वाईट.... अभ्यासाच्या बाबतीत फक्त 😝)अनुभवातून शहाणपण घेण्याचा काळ... शाळेच्या शिस्तीतुन मुक्त होण्याचा काळ.... आपल्याच आकाशात उंच भरारी घेण्याचा काळ.... मैत्रीच्या व्याख्या थोड्या बदलण्याचा काळ..... थोडक्यात सांगायचे तर   आयुष्यातील सुवर्णकाळ.( अभ्यासू विद्यार्थ्यांच माहीत नाही.... मी...माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थिनींबद्दल सांगते आहे.)
विदर्भ महाविद्यालय परिसर अतिशय रमणीय.... वर्ग खोल्या भव्य....  आसन व्यवस्था नाट्यगृहासारखी... परिसरातील बाग तर बघण्यासारखीच. ( त्यामुळे वर्गापेक्षा... वर्गा बाहेरच मुल जास्त उपस्थित असायची ). मला परिसर.. बाग.. वर्ग.. काहीच नवीन नव्हतं.... बालपणापासून ह्या परिसरातच वावरले, वाढले . त्यामुळे नवीन परिसरात  बावरल्या सारख  ,लाजल्या सारख  होत तस कधीच माझ्या बाबतीत घडल नाही. उलटं मी खूप बिनधास्त, रोखठोक वागायचे. ... मला  नवीन होतं  ते शाळेतून बाहेर पडल्यानंतर  मिळालेलं  स्वातंत्र्य आणि अभ्यासक्रम... असो.....
प्रात्यक्षिक असतांना...आमच्या वर्ग खोल्यांकडून प्राणी शास्त्र विभागाच्या प्रयोग शाळेकडे जायचे असेल तर खूप मोठं  मैदान ओलांडावे लागत असे. ह्या मैदानाला लागून डांबरी रस्ता होता, पण त्याच्या  दुसऱ्या
 बाजूला मुलांचे  वसतिगृह होते. म्हणजे  मैदान आणि वसतिगृहाची लांबी जवळ जवळ सारखीच होती. वसतिगृह दोन मजली होते.
असंच एके दिवशी सकाळी प्राणी शास्त्र विभागाच्या प्रयोग शाळेकडे जायचे असल्याने आम्हा मुलींच ठरत नव्हतं... की... कसे जायचे.... हिवाळ्याचे दिवस असल्याने ऊन खात मैदानातून जाण्याचं ठरल. आम्ही गप्पा मारत निघालो... तेवढ्यात आमच्या पायाशी... काहीतरी चमकत होतं आणि ते आमच्या सोबत पुढे पुढेच येत  होतं.... थोड थांबून शोध घेतल्यावर लक्षात आलं की... हा प्रकाश वसतिगृहातील दुसऱ्या मजल्यावर दाढी करणारऱ्या एका मुलाच्या आरस्यातून मुद्दाम निर्माण केल्या जात आहे. त्याचा हा उद्योग बघून आधी खूप राग आला पण सर्वानुमते दुर्लक्ष करण्याचे ठरले. आम्ही चालण्याचा वेग वाढवला. आता तर त्या मुलाला जास्तच उत्साह आला. तो  मोठ्याने गाणं  ही म्हणायला लागला. " बदन पे सीतारे लपेटे हुवे... ओ जाने तमन्ना कहा जा रहे हो "  बेसूर अस गाणं  आणि आमच्या पायात नाचणारा   प्रकाश.... त्याचं  सुरूच.... आम्ही वेग अजून थोडा वाढवला. एकतर तो पूर्ण गाणं  गात नव्हताच... एकच ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होता ( जणू काही आम्हालाच प्रश्न विचारत होता " कहा जा रहे हो?)... त्यात भर म्हणून त्याने आवाज थोडा अजून वाढवला. त्याच्या आवाजाने  इतर खोल्यांमधली मुलंही बाहेर आली आणि त्याचा हा उद्योग बघू लागली. प्रेक्षक मिळतात आहे म्हंटल्यावर त्याचा उत्साह द्विगुणीत झाला. आता प्रयोगशाळाही जवळ आली होती. प्रयोगशाळेचा दरवाजा उघडलेला  होता त्यावरून मी अंदाज केला की आमचे प्राध्यापक प्रयोगशाळेत आलेले आहेत. माझी हिम्मत वाढली मी माझा चालण्याचा वेग कमी केला. माझ्या मैत्रिणी माझ्या  चार पाऊले पुढे गेल्या.... तशी मी थांबले.... त्याने लगेच " बदनपे सितारे लपेटे हुवे.. ओ जाने तमन्ना कहा जा रहे हो  " अस पुन्हा मोठ्याने गायल.... मग मीही त्याच्याकडे रागाने बघीतल आणि ओरडले..." मसणात जाते आहे... यायच आहे? " त्यावर तो गडबडला... इतर मुल त्यावर हसायला लागली. तोही मग दिलखुलास हसला आणि म्हणाला " इतक्या लवकर नाही जायच आहे मला... तुम्ही जरा घाईत दिसताय तुम्ही जा पुढे.... "  त्यावर मी.... " मगा पासून जीव तोडून  विचारताय.... बघा आवरल असेल तर चला." त्यावर तो.... " नाही नाही " अस म्हणतच त्याच्या खोलीत गेला. मी ही प्रयोगशाळेत आले . बघते तर काय  माझ्या मैत्रिणी पोट धरून हसत होत्या. खूप हसलो सगळ्याजणी.... प्रयोगशाळेच्या बाहेर पडतांना थोडी भीती वाटत होती. परंतु   पुन्हा असं  घडल नाही. तो क्षण मात्र आमच्या लक्षात राहीला.
तेव्हा मुल टूकार जरी असली तरी त्यांची दहशत,भीती नव्हती. असे अनेक प्रसंग घडले तरी त्याबद्दल कोणाच्याही मनात अढी नसे. मुल आणि मुली..सहज प्रतिक्रिया म्हणून अशा प्रसंगांचा स्वीकार करत होती. त्यातून निर्माण होणाऱ्या  निखळ विनोदाचा आनंद घेण्याची प्रवृत्ती सगळ्यांमधे होती. असे प्रसंग लक्षात ठेवून... नंतर त्यावर अधिक तीव्र  प्रतिक्रिया द्यावी असं मुलांच्या डोक्यातही येत नसे. वेळ प्रसंगी गरज लागलीच तर  ही मुलंच निस्वार्थ भावनेन मदत करायला तयार असायची.  "तुला नंतर बघून घेईन" असे शब्द त्यांच्या तोंडी कधीच यायचे नाहीत.  आता मात्र भीती वाटते कोणाला काही बोलायची. आज काल सूड बुद्धीतून अनेक वाईट प्रसंग घडतात. शुल्लक कारणावरून टोकाची भूमिका घेण्याची वृत्ती दिसून येते. आजही  मुलामुलींमधे बिनधास्तपणा जाणवतो पण असे प्रसंग सहजतेने स्विकारण्याची वृत्ती .... त्यातील निरागसता ...   मात्र हरवली तर नाही न? असा प्रश्न मनात येवुन जातो.
 ©️ अंजली मीनानाथ धस्के

टिप: मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट  जसे घडले तसे स्वीकारून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.  तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

No comments:

Post a Comment