ही कविता वाचताना कदाचित तुम्हाला एका प्रेम वेड्या मुलीची तिच्या प्रियकरा प्रतीची ओढ, तक्रार, विश्वास जाणवेल. परंतू ही कविता एका देव भोळ्या भक्ताच्या दृष्टीने वाचल तर तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन अनुभवायला मिळेल. देवाकडे आपण काही ना काही मागत असतोच कारण तो सर्व श्रेष्ठ दाता आहे . त्याच्या कडे सगळ्याच गोष्टींची मुबलकता आहे आणि सामान्य माणूस म्हणून आपल्या ज्या काही मर्यादा आहेत त्यात आपल्या कडे जे नाही त्याची बोच तीव्र असणे हे प्रकर्षाने घडते. त्या ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे त्या कडे बघता भावनेच्या आवेगात कमकुवत पडू पाहणाऱ्या आपल्या मनाला त्याच्या समोर फक्त मान झुकवून मौन बाळगले तरी मनाला मिळणारी ऊर्जा प्रचंड असते. हा अनुभव ज्याने घेतलाय त्यांना ही कविता म्हणजे त्या ' विधात्या प्रतीची कृतज्ञता ' आहे हे जाणवल्या शिवाय राहणार नाही.
काय मागावे मी तुला... सांग ना....
काय मागावे मी तुला.....
मला घेरतात साऱ्याच फिकीरी... तू विरक्त फकीर आहे
मी सदैव तहानलेली... तू गोड नीर आहे
मी भावनांची नदी... तू तटस्थ तीर आहे
काय हवं अजून मला.... अरे....
काय हवं अजून मला
माझ्या कष्टकरी हातावरची... तू भाग्य लकीर आहे
बांध फुटू पाहणाऱ्या माझ्या मनाचा... तू न खचणारा धीर आहे
मी टेकते जिथे श्रद्धेने माथा... तू तो आश्वस्त पीर आहे
©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:
Post a Comment