बोधकथा

#बोधकथा



बी एड करत असतांना सगळ्यात आवडीचा कालावधी म्हणजे जेव्हा आमचे पाठ एखाद्या शाळेवर लागायचे .  खूप धम्माल असायची . आम्ही मुलांना शांत करून आमचा पाठ कसा पूर्ण करतो याला खूप महत्त्व असायचे . मला पाठा दरम्यान खूप शैक्षणिक साधने वापरायला आवडायची . आम्ही पाठ घेत असतांना आमचे सहकारी आणि प्राध्यापक आमचे निरिक्षण करण्यासाठी सगळ्यात शेवटच्या बाकावर बसायचे . प्राध्यापक आपण कसे शिकवतो हे बघण्यासाठी उपस्थित राहणार आहेत याचचं आम्हाला दडपण यायचं. पण सरावाने ते मागे बसले आहेत याचा विसर पडून मी माझा पाठ पूर्ण करू लागले . एके दिवशी मी माझा पाठ पूर्ण करून वर्गा बाहेर पडत असतांनाच त्या वर्गाचे वर्ग शिक्षक तिथे आले. आमचे प्राध्यापक मला माझ्या पाठविषयी काही सांगतील  म्हणून मी ही वर्गाबाहेर थांबले . आमचे प्राध्यापक आणि सहकारी मित्र बाहेर आले . माझ्या एका सहकारी मित्राने  केलेल्या निरीक्षणावर प्राध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी म्हणून निरिक्षण वही त्यांच्या समोर धरली . त्यांनी सही करण्यासाठी पेन घेतला आणि  स्वाक्षरी करणार तेवढ्यात ते थांबले . त्यात नोंद होती की, " शैक्षणिक साहित्याचा वापर वाढवावा ". आमच्या प्राध्यापकांनी वरती नाव वाचलं तिथे माझे नाव लिहिले होते. त्यांनी लगेच त्या पानावर फुली मारली. सहकारी मित्र एकदम घाबरून गेले. काय चुकलं असं विचारू लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं, " त्यांच्या वाजनापेक्षा जास्त त्या शैक्षणिक साहित्य वापरतात. आत्ताही बघ केवढे सामान त्यांच्या हातात आहे. उगाच लिहायचं म्हणून काहीही नोंदी लिहिण्यात काही अर्थ नाही".
आम्ही ज्या वर्गा बाहेर थांबलो होतो त्या वर्गात गोंधळ सुरू झाला. ज्यांचा तास होता ते शिक्षक गैर हजर होते आणि आता शाळेच्या कामानिमित्त बाहेर जावे लागणार असल्या कारणाने वर्ग शिक्षकांना ही वर्गात थांबणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी आमच्या प्राध्यापकांना विनंती केली की ते परत येई पर्यंत आम्हा शिक्षक  विद्यार्थ्यांनी त्यांचा  वर्ग शांत  करावा.
आमचे प्राध्यापक आम्हाला म्हणाले , "आता आपले लगेच तास नाहीतच मग शिक्षकांच्या खोलीत बसण्यापेक्षा या वर्गात जावून बसू तेवढीच त्यांना मदत होईल आणि पाठ टाचण नसतांनाही वर्ग कसा हाताळायचा याचा अनुभव तुम्हाला मिळेल ".
खरं तर मी आणि माझे दोन सहकारी आम्ही तिघही गणित आणि विज्ञान पद्धती स्वीकारलेले बी एड चे विद्यार्थी . तास ज्या शिक्षकांचा होता ते इतिहास आणि मूल्यशिक्षण हे दोन विषय शिकवायचे.
माझे पुढचे टाचण तयार होते पण मुल ऐकेना. त्यांना मी शिकवावे असे वाटत तर होते पण पुन्हा गणित सोडवण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. माझ्या सहकाऱ्यांनी तयारी नाही सांगून हात झटकले. तेव्हा आमचे प्राध्यापक मला म्हणाले, " बोध कथा सांगून मूल्यशिक्षणाचा तास घेता येईल . तुम्ही प्रयत्न करा. नोकरी लागल्यावर असे  अनेक  प्रसंग येतात ".
मला कथा वाचायला आवडतात पण सांगायची वेळ येते तेव्हा एकही कथा आठवत नाही. वर्गात गोंधळ वाढत चालला तसे मी माझ्या प्राध्यापकांकडे  फार आशेने बघितले . मला वाटलं ते मला वर्गातली मुलं शांत करण्यासाठी मदत करतील . पण त्यांनी," मी इथे नाही असच समजा" असं घोषीत केले . माझ्या सहकाऱ्यांनी लगेच पुढाकार घेऊन मुलांना शांत करण्याचे काम सुरू केले . सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. बाजूच्या वर्गातले शिक्षकही आता आमच्या वर्गात आले . शेवटी मी धीर करून डस्टर माझ्या समोरच्या टेबलावर आपटले . सगळे एकदम शांत झाले. मी लगेच वर्गाचा ताबा घेत म्हणाले , " आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे . तुम्ही सगळे शांत राहिलात तरच मला हे शक्य आहे".
सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला की कथेचं नाव काय ?
मला काही केल्या कथेचं नाव आठवत नव्हते. मग मी एक युक्ती केली . मी सांगून टाकलं की, "या कथेची एक गंमत आहे . आधी मी तुम्हाला कथा सांगणार . त्यातून तुम्हाला काय बोध झाला हे विचारणार . तुम्हाला जो बोध होईल त्याप्रमाणे तुम्हीच मला कथेसाठी एक छानस नाव सुचवायचे. ज्याचं नाव सगळ्यात छान तेच नाव या कथेला देण्यात येईल.
आता तर काय वर्ग अधिकच शांत झाला. मीही कथेला सुरुवात केली," फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे . एका  गावात खूप तेजस्वी असा एक साधू असतो.  त्याचे प्रवचन ऐकायला दुरून दुरून लोक येत असतात. त्याच गावात एक श्रीमंत व्यापारी रहात असतो . त्याच्या मनात येतं की या साधूला एकदा तरी आपल्या घरी जेवायला बोलवावे. त्यांच्या सारख्या महान साधूने आपल्या घरी जेवायला आल्यावर  गावात आपला मान अधिक वाढेल असे वाटून तो साधूला रोज घरी येण्यासाठी विनवत असतो. अनेक दिवस टाळून झाले तरी व्यापारी पिच्छा सोडत नाही म्हंटल्यावर साधूने त्याच्या घरी जेवायला जायचे ठरवले. व्यापाऱ्याला खूप आनंद झाला त्याने जय्यद तयारी केली. साधूचे स्वागत दणक्यात करण्यात आले. त्याची ही तयारी बघून साधूला व्यापाऱ्याविषयी प्रेम वाटू लागले. व्यापारी जेवतांना साधूला आग्रह करून करून वाढू लागला. साधूनेही सगळ्याच पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. तांदळाची खीर तर साधूला इतकी आवडली की त्याने ती वारंवार खाल्ली.
          जेवण झाल्यावर साधू व्यापाऱ्याशी गप्पा मारत बसला.  व्यापारी लगेच साधूच्या पायाशी बसून त्याचे पाय चेपू लागला. साधूला आश्रमात परतायचे होते. पण भरपेट जेवण आणि सुरू असलेली सेवा याने त्याला झोप यायला लागली.  व्यापाऱ्याने आज माझ्याकडेच मुक्काम करा असा आग्रह धरला. साधूला त्याची ही विनंतीही टाळता आली नाही. साधूला एका खास खोलीत नेण्यात आलं.  झोपेमुळे साधूने त्या खोलीचे फारसे निरिक्षण केले नाही. साधू लगेच झोपी गेला. पहाटे जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने सभोवती नजर टाकली तर ती एक फारच सुंदर खोली होती. पलंग तर मऊ मऊ गादीचा होता. शेजारीच पाण्यासाठी चांदीचा तांब्या पेला ठेवलेला. खिडक्या .... पडदे.... सामान..... सगळंच खूप सुंदर . पण का कुणास ठाऊक साधूला चांदीचा पेला फारच आवडला . हा पेला आपण झोळीत टाकून घेवून गेलं तर कोणाला काय कळणार असा विचार त्याच्या मनात सुरू झाला. शेवटी न राहवून त्याने पेला झोळीत टाकला. व्यापाऱ्याचा निरोप घेऊन तो आश्रमात परतला.
        इकडे व्यापाऱ्याच्या घरात साधूच्या खोलीतला चांदीचा पेला गायब झाला म्हणून एकच गहजब उडाला. व्यापाऱ्याने सगळ्या नोकरांना बोलावून चौकशी सुरू केली. सगळ्यांना विचारूनही कोणी कबुल होईना तेव्हा व्यापाऱ्याने सगळ्यांनाच चाबकाचे फटके मारण्याचा निर्णय घेतला.
इकडे साधू रोजच्या सारखं साधनेला बसला . त्याचे चित्त मात्र एक सारखे झोलीतल्या चांदीच्या पेल्याकडेच लागले.
आता तर तो फार बेचैन झाला. त्याला कळेना की आपण हा पेला का उचलून आणला? आपल्या तर तो काहीच कामाचा नाही. आपल्या गरजाही फार कमी आहेत . मग ह्या पेल्याचा आपल्याला येवढा मोह का झाला?  चोरी करणे वाईट असे आपण आपल्या प्रवचनात सांगतो पण मग आज आपणच का चोरी केली? खूप खूप विचार केल्यावर त्याच्या मनात एक शंका आली आणि त्या शंकेच निरसन फक्त व्यापारीच करू शकतो असा विचार त्याच्या मनात आला . केलेली चूक वेळीच सूधारायला हवी असे वाटून त्याने ताबडतोब पेला घेतला आणि व्यापाऱ्याचे घर गाठले.
        तिथे व्यापाऱ्याने सगळ्या नोकरांना एका रांगेत उभे केले होते . त्यातल्या एका नोकराला चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली होती. तो नोकर कळवळून सांगत होता की," मी चोरी नाही केली ".
हे दृश्य पाहून साधू दुःखी झाला. त्याने पुढे होवून चाबूक अडवला आणि चांदीचा पेला झोळीतून काढून व्यापाऱ्याच्या हातात दिला. "यांना मारू नकोस चोरी मी केली होती" अशी कबुलीही दिली.
     व्यापाऱ्याला वाटले साधू महान आहे . नोकरांना वाचवण्यासाठी स्वतःवर चोरीचा आळ घेतोय. त्याने साधूला विचारले , "  मागितला असता तर यापेक्षा मोठा आणि छान पेला मी तुम्हाला दिला असता . हे तुम्हाला माहिती आहे .तुम्ही चोरी का कराल? तुम्ही या नोकरांना वाचवण्यासाठी असे खोटे का बोलताय? "
     साधू ने सांगितले ," मी खोटे बोलत नाही. मलाही हाच प्रश्न पडला आहे की मी चोरी का केली ? याचे उत्तर शोधण्यासाठीच मी इथे आलो आहे. मला सांगा काल मी जी खीर आवडीने खात होतो तिचे सामान तु कसे मिळवले आहेस?
      यावर व्यापारी एकदम गडबडून गेला . साधूने पुन्हा विचारले ," खिरीसाठीचे तांदूळ आणि साखर तु कसे मिळवले आहेस?"
त्यावर व्यापाऱ्याने घाबरातच सांगितले की , " राजाकडून जे धान्य ... सामान लोकांना वाटण्यासाठी माझ्या दुकानात पाठवण्यात येतं त्यातले  तांदूळ आणि साखरचे पोते मी सैनिकांच्या चोरून माझ्या घरी घेवुन येतो . त्यातल्याच तांदळाची आणि साखरेची खीर मी तुम्हाला खावू घातली .  मला माफ करा पण माझ्या या चोरीचा तुम्ही नेलेल्या पेल्याशी काय संबंध?"
    त्यावर साधू उत्तरला ," कंद मुळे खाणारा मी ... सत्याच्या मार्गाने जाणारा मी ..... स्वतः चे पोट भरण्यासाठी कष्ट करणारा मी ......  खीर छान लागली म्हणून भरपेट खाल्ली. चोरीच्या सामनापासून बनवलेल्या खीरीने मलाही चोरी करायला उदुक्त केले. मी चोरी केली पण मी रोज असे चोरीचे  अन्न  खात नाही म्हणून चोरी कबुल करण्याची बुध्दी झाली . तुम्ही रोज रोज चोरीचेच   अन्न   खाता त्यामुळे तुम्हाला रोज रोज चोरीची बुध्दी होते आणि त्यामुळेच चोरी करणे वाईट आहे हे ही तुम्ही विसरून गेलात. आता एकच कर की , इथून पुढे कधीही मला तुझ्या  घरी जेवायला बोलावू नकोस ".
त्यांचे हे बोलणे जवळ उभा असलेला एक नोकर ऐकत होता. त्याने लगेच साधूचे पाय पकडले आणि मोठमोठ्याने रडू लागला. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की , ' व्यापाऱ्याच्या या चोरीच्या सामानातले थोडे सामान तोही त्याच्या मुलासाठी  चोरून नेत होता .  अजून त्याचा मुलगा लहान आहे पण जाईल तिथे चोरी करतो . त्याचे भविष्यही या चोरीच्या अन्नामुळे धोक्यात आले . त्याला सुधारण्यासाठी आता काही उपाय असेल तर तो सांगावा'.
त्याचे रडणे बघून साधूने सांगितले ," रडू नकोस ... अजून वेळ गेली नाही . चोरीचं सामान गरजूंना देवून टाक . घरातल्या सगळ्या गरजा फक्त स्वतःच्या कष्टाच्या कमाईने पूर्ण करायला सुरुवात कर. गरजा भागात नसतील तर कष्ट वाढव पण पुन्हा चोरी करू नकोस . हळू हळू तुला कष्ट करतांना   बघून तुझा मुलगाही चोरी करणे सोडून देईल".
त्या दिवशी नोकराला आणि व्यापाराला आपली चूक कळली. त्यांनी त्या दिवसानंतर कधीच कोणत्याही प्रकारची चोरी केली नाही.
गोष्ट संपली तरी वर्गात शांतता होती . काय बोध घेतला हे विचारलं तर ," चोरी करणे वाईट " या मतावर सगळेच आले होते.
मग मी कथेचे स्पष्टीकरण दिले ते असे ....
" यापुढे जावून ही कथा अनेक बोध देते ते म्हणजे ,
  वाईट मार्गाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही आलात तर तुमच्याही नकळत तुम्ही वाईट गोष्टीच्या आहारी जाता.
 तुमची सद् सद् विवेक बुध्दी जागृत असेल तरच तुम्ही चांगले काय.... वाईट काय यातला भेद ओळखू शकता.
चूक सुधारण्यासाठीची संधी ही एक मात्र अशी संधी आहे जी कधीच निघून जात नाही.
चूक लक्षात आल्यावर ती झाकून न ठेवता मोठ्या मनाने स्विकारायला तर हवीच पण भविष्यात ती टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

कष्टाची कमाई ..... कष्टाची सवयच तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवते.
मुख्य म्हणजे लोभाचे अनेक क्षण आयुष्यात येतील पण त्यावेळी  मोहाच्या आहारी न जाता सद् मार्गाची निवड करता यायला हवी.
खरं तर ही कथा खूप विचार करायला लावणारी आहे. तसेच
मूल्यशिक्षण हा विषयच  असा आहे की तो फक्त शिकायचा नसतो तर प्रत्यक्ष आपल्या वागण्यात तो अवलंबायचा देखील असतो. प्रत्यक्ष आयुष्यात इतर विषय कच्चे राहिले तर त्याने तुमच्या आयुष्यावर फारसा गंभीर परिणाम होत नाही  पण मूल्यशिक्षण जर घेतलेच नाही तर माणूस म्हणून तुम्ही १०० टक्के अपयशी ठरता. ही गोष्ट मात्र फक्त तुमच्याच आयुष्यावर नाही तर समाजावर ही वाईट परिणाम करू शकते.
कथा एक पण त्यातून बोध घेतले तर अनेक आहेत. कथेला काय नाव द्यायचं या पेक्षा कथेतून काय बोध घेतला हे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही या कथेला देवू शकता .  तसंही शेक्सपियर सांगून गेलेत ," नावात काय आहे".

असं बोलून मी माझी कथा संपवली.
वर्गातली मुल तर आनंदी झालीच पण आमच्या प्राध्यापकांनी .... सहकारी मित्रांनी आणि शेजारच्या वर्गातले शिक्षक जे आता वर्ग येवढं शांत कसा झाला हे बघायला आले होते त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझे कौतुक केले.

मूल्यशिक्षण हे आजही खूप गरजेचे आहे. कळत नकळत घेतलेले मूल्यशिक्षण आयुष्यात  माणूस म्हणून जगतांना खूप उपयोगी पडते. आजकाल  बोधकथा वाचायच्या म्हणून वाचल्या जातात . त्यातून घेतलेला बोध प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबला जात नाही. किंबहुना तशी शिकवणच  दिली जात नाही. मग नंतर आपणच चर्चा करतो की आजकाल सगळ्यांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. नैतिक मूल्यांचा ह्रास होत चालला आहे. पण आपणच पुढाकार घेऊन ही मूल्ये जपायला हवी आणि वारसा म्हणून पुढच्या पिढीला द्यायला हवी. याचा विचार करणारी माणसं आज फारच थोडी आहेत . आता गरज आहे ती आपण   सर्वांनीच मूल्यशिक्षणाची पुन्हा नव्याने उजळणी करण्याची.
आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच ..... आपल्याला हवा असलेला सामाजिक बदल हा हळू हळू का होईना घडणार हे नक्की .
माझ्या आयुष्यात मी शिकलेले मूल्यशिक्षण वर्गात शिकवण्याचा केलेला पहिला प्रयत्न.... ," ज्या प्रसंगाने अनेक चांगल्या गोष्टींची  सुरुवात केली. ज्या प्रसंगाने माझ्यातला आत्मविश्वास वाढवला.    " तो प्रसंग येथे सांगत आहे .
कथा आवडल्यास ..... नक्की कळवा ..... अजूनही खूप छान छान बोध कथा आहेत ..... तोपर्यंत ," खूप वाचा ..... जे आवडेल ते स्वीकारा ....नाहीतर सोडून द्या".



No comments:

Post a Comment